14/05/2026
भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे “सक्षम नागरिक मोहीम” अंतर्गत “रोजनिशी उपक्रम” (मार्गदर्शक – डॉ. अनिल काकोडकर) आणि “आत्मनिर्भर युवक उपक्रम” (मार्गदर्शक – लेफ्टनंट जनरल (डॉ.) दत्तात्रय शेकटकर) हे उपक्रम महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये सुरू आहेत. हे उपक्रम यशस्वी होण्याचं श्रेय सर्व शिक्षकांना जातं. त्यांच्या परिश्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक सकारात्मक बदल दिसून येत आहेत.
प्राथमिक शाळा, नृसिंहवाडी, ता. शिरोळ, जिल्हा – कोल्हापूर येथील शिक्षिका श्रीमती रुपाली शेळके यांनी “रोजनिशी उपक्रम” संदर्भातील एक मनाला स्पर्श करून जाणारा अनुभव सांगितला आहे.
त्या सांगतात की, मुलं रोजनिशीमध्ये विविध विषयांवर मनमोकळेपणाने व्यक्त होतात. शाळेत येताना-जाताना त्यांनी काय पाहिले, कोणते अनुभव घेतले, हे लिहिण्यास सांगितल्यामुळे मुलांची निरीक्षण क्षमता वाढते आणि त्यांचा भावनिक विकास घडतो.
एकदा शाळेत येताना काही विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या कडेला पडलेले मेलेले चिमणीचे पिल्लू पाहिले. त्याची आई जवळच बसली होती. अनेक लोक तिथून ये-जा करत होते, परंतु कोणाचेही त्याकडे लक्ष गेले नाही. हा प्रसंग पाहून मुलांना खूप वाईट वाटले. शाळेत आल्यानंतर त्यांनी हा अनुभव सांगितला. त्यावेळी श्रीमती शेळके यांनी त्या पिल्लाला आणण्यास सांगितले आणि शाळेच्या बागेतील जास्वंदाच्या झाडाखाली त्याचे दफन करण्यात आले.
या छोट्याशा कृतीतून मुलांमध्ये संवेदनशीलता, जाणीव, सहानुभूती आणि मानवता यांसारखी मूल्ये रुजली. CHAMPS मध्ये सांगितलेली ६ कौशल्ये मुलांना सक्षम करण्यासाठी आवश्यक आहेत आणि रोजनिशी उपक्रमातून ही कौशल्ये प्रभावीपणे विकसित होत आहेत.
मुलांना पाढे, गणित किंवा स्वाध्याय कधी कधी कंटाळवाणे वाटतात; परंतु रोजनिशीमध्ये ते आनंदाने आणि उत्साहाने लिहितात. त्यामुळे त्यांचा भावनिक, मानसिक आणि सर्जनशील विकास घडतो. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे तळागाळातील मुलांमधील सर्जनशीलता विकसित करण्याचे स्वप्न या उपक्रमातून प्रत्यक्षात साकार होताना दिसते. या उपक्रमाची माहिती तालुका समन्वयक श्रीमती काझी मॅडम यांनी शाळांमध्ये दिली असून त्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला एक नवी दिशा मिळत आहे.