23/01/2026
भावनिक शेती नको व्यवसाईक शेती हवी - श्री. पांडूरंग आव्हाड
कृषि तंत्रज्ञान महोत्सव 2026 ची सांगता
भावनीक शेती नको व्यवसाईक शेती करा असे प्रतिपादन रांजणीचे नॅचरल शुगर लि. चे उपाध्यक्ष श्री. पांडूरंग आव्हाड यांनी कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर येथे कृषि तंत्रज्ञान महोत्सव-2026 च्या दुस-या दिवशीच्या तांत्रिक चर्चा सत्रात बोलताना केले. पुढे बोलताना ते म्हणाले ऊस उत्पादनात वाढ करावयास योग्य बेणे निवड, रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतांची जोड द्यावी लागेल. सातफुटावर सरी, एक डोळा लागवड, टक्कर पध्दत बंद करा, पाचट हे ऊस पिकातील सोने आहे ते जाळू नका ते कुजवा त्यापासुन उत्तम प्रकारचे एकरी 2.5 टन सेंद्रिय खत जमिनीत मिसळते त्यातून सेंद्रिय कर्ब वाढतो. या प्रकारचे तंत्रज्ञान वापरल्यास ऊस पिकामध्ये उत्पादनात वाढ झालेली दिसुन येईल.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कृषि विज्ञान केंद्र, सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र, सोलापूरचे प्रधान शास्त्रज्ञ डॉ. रंजनकुमार सिंग उपस्थित होते. प्रमुख व्याख्याते म्हणून फायलो कंपनीचे ऊस पिकातील कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मा. डॉ. श्रीयोग नोरलावार उपस्थित होते. यावेळी नाबार्ड, सोलापूरचे डी.डी. एम. श्री. नीतीन शेळके, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. देवेन्द्र ढगे, तालुका कृषि अधिकारी, उत्तर सोलापूर श्री. आर. एस. माळी इ. मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलताना प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे यांनी चांगले तंत्रज्ञान देण्यामध्ये कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर आग्रही राहते. तसेच सेंद्रिय भाजीपाला उत्पादनासाठी जीजाई नॅनो किचन युनिट उत्कृष्ठ असुन त्या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रंजनकुमार सिंग यांनी मातीच्या सुपिकतेवर भर देणे गरजेचे असुन मातीला सुपिक केल्यास जमिनीच्या / पिकाच्या अनेक समस्या कमी होतील असे प्रतिपादन केले. फायलो कंपनीचे डॉ. श्रीयोग नोरलावार यांनी ए. आय. च्या वापराने पाणी, खते, औषधे, मजुरी यामध्ये बचत होते पण त्याही पुढे कीड, रोग ही कमी होतात. तसेच ड्रोन सारखे तंत्रज्ञानाचा अवलंब ही फायदेशिर असल्याचे सांगीतले. नाबार्ड, सोलापूरचे डी. डी. एम. श्री. नितीन शेळके यांनी नाबार्डच्या विविध योजनां विषयी माहिती दिली. श्री. देवेन्द्र ढगे यांनी कृषि विभागाच्या विविध योजना सांगितल्या. यावेळी शेतक-यांनी विशेषत्वाने ड्रोन व्दारे फवारणी विषयी, ए. आर. चे संयत्र इत्यादी कसे कार्य करते याबाबत सखोल अशी माहिती घेतली. हत्तुरे ऍग्रो सायन्ससेस शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्री. संगमेश्वर हत्तुरे व त्यांचे संचालक मंडळ, लोकमंगल कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. या व्यतिरीक्त भागातील शाळा यानींही या कार्यक्रमानंतर भेटीसाठी येणार असल्याचे कळविले आहे. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. अमोल शास्त्री तर आभार प्रदर्शन डॉ. प्रकाश कदम यांनी केले. यावेळी प्रगतशील शेतक-यांचे सत्कार करण्यात आले.