22/04/2026
उरमोडी धान्य महोत्सवाला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाचे औचित्य साधून तसेच शाश्वत कृषी विकास अभियानांतर्गत अवॉर्ड संस्थेतर्फे आयोजित उरमोडी धान्य महोत्सवाला सातारा व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात सेंद्रिय व विषमुक्त शेतीमालाची समृद्ध रेलचेल पाहायला मिळाली.
महोत्सवाचे उद्घाटन सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले व पंचायत समिती सदस्या शोभाताई लोटेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संस्थेच्या सचिव ॲड. नीलिमा कदम, बिजमाता निर्मला चव्हाण, अशा कदम व वैशाली शिंदे उपस्थित होत्या.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला थेट ग्राहक मिळावा आणि ‘शेतकरी ते ग्राहक’ अशी सशक्त विक्रीव्यवस्था निर्माण व्हावी, या उद्देशाने हा महोत्सव सन २०१८ पासून सातारा येथे नियमितपणे आयोजित केला जात आहे. महोत्सवात इंद्रायणी, काळीसाळ, आंबेमोहर यांसारखे तांदूळ; लोकवण, खपली, केदार, सरबती गहू; दगडी व मालदांडी ज्वारी; शाळू, कांदा, देशी लसूण तसेच विविध कडधान्ये आणि ताज्या भाज्यांची विक्री करण्यात आली.
यासोबतच ‘फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडी येथील विविध फळे, तसेच ‘नाचणीचे गाव’ कुसुंबी येथील नाचणी व त्यापासून तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, पापड, गावरान लोणची, हळद यांनाही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विक्रीसाठी आणलेला जवळपास सर्व शेतीमाल विकला गेल्याने सहभागी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले, तर एकाच छताखाली विषमुक्त शेतीमाल उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्राहकांनीही आनंद व्यक्त केला.
दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात एकूण सुमारे रुपये ६.५० लाखांचा शेतीमालाची विक्री झाली.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रकल्प संचालक किरण कदम, समन्वयक शैलेश भोसले, सुनीता बनसोडे, समृद्धी घडशी, आणि शरद कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.