09/01/2026
साहस अकादमीची दीपाजी राणे पदभ्रमण मोहीम उत्साहात
गोवा स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिवीरांची स्मृती जपणे आणि त्यांच्या बलिदानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, ही काळाची गरज असून त्यासाठी साहस अकादमी गोवा गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मोलाचे कार्य करत आहे. क्रांतिवीर दीपाजी राणे राष्ट्रीय पदभ्रमण मोहिमेच्या माध्यमातून युवकांमध्ये देशभक्ती, इतिहासाविषयी जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी निर्माण होत असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, शिव व्याख्याते व सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक ॲड. शिवाजी देसाई यांनी केले.
ते खोतीगाव, काणकोण येथे साहस अकादमी गोवाच्या राष्ट्रीय क्रांतिवीर दीपाजी राणे पदभ्रमण मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ॲड. देसाई म्हणाले की, सत्तरी तालुक्यातील ऐतिहासिक नाणूस किल्ल्यावर दरवर्षी २६ जानेवारी रोजी क्रांतिवीर दीपाजी राणे यांना गार्ड ऑफ ऑनर देण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला असून तो ऐतिहासिक आणि स्वागतार्ह आहे. क्रांतिवीर दीपाजी राणे व क्रांतिवीर दादा राणे हे गोवा मुक्ती संग्रामातील प्रेरणास्थान असून त्यांचा इतिहास गोव्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणे आवश्यक आहे.
नाणूस किल्ल्याचे पूर्ण संवर्धन करून तो पुरातन स्वरूपात उभारण्यात यावा आणि तेथे दीपाजी राणे, दादा राणे तसेच गोवा मुक्ती लढ्यातील सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मारक उभारण्यात यावे, असे नमूद करत त्यांनी सांगितले की, अशा उपक्रमातून सत्तरी तालुक्याच्या तसेच गोव्याच्या पर्यटन, सांस्कृतिक व ऐतिहासिक विकासाला मोठी चालना मिळू शकते.
ते पुढे म्हणाले की, सत्तरी इतिहास संवर्धन समितीने सुमारे १४ वर्षांपूर्वी नाणूस किल्ला चळवळ सुरू केली. याआधी ही चळवळ स्व. सदानंद ऊर्फ भाई तेंडुलकर यांनी सुरू केली होती; मात्र त्यांच्या निधनानंतर ती थांबली होती. अनेक अडचणी असूनही सरकारदरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या विषयाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आता किल्ल्याच्या संवर्धनाची जबाबदारी शासनाने प्रभावीपणे पार पाडावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
क्रांतिवीर दीपाजी राणेंच्या क्रांतीमुळे सत्तरी तालुक्याचे सांस्कृतिक संचित सुरक्षित राहिले, असे सांगत ॲड. देसाई म्हणाले की, सन १८५२ नंतर तब्बल ४० वर्षे पोर्तुगीजांना सत्तरीत मोठ्या प्रमाणात अत्याचार करता आले नाहीत. सत्तरीतील राणे समुदायाने जनतेला सोबत घेऊन तब्बल २२ वेळा पोर्तुगीजांविरोधात संघर्ष केला. परकीय सत्तेविरुद्ध उभे राहणे ही क्रांती असून, त्याला बंड म्हणता येणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
साहस अकादमी गोवाने आजवर ३४ वेळा क्रांतिवीर दीपाजी राणे राष्ट्रीय पदभ्रमण मोहीम राबवून युवकांमध्ये इतिहासाविषयी जाणीव निर्माण केली असून, हे कार्य अत्यंत प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला प्रभाकर माजीक, देवेंद्र गुरव, प्रज्योत साखळकर, उदय सावंत, सुजय साळकर, विकास हिंदे, सोनू मोरजे, बिंदिया नाईक, नीता मापारी, मेघा शिरोडकर, सोनिया ठाकूर, सुजाता वेरेकर, गोपीनाथ हिंदे, रवींद्र पोकळे, रोहन साखळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याआधी रवींद्र भवन, सांखळी येथे ॲड. शिवाजी देसाई यांच्या हस्ते झेंडा दाखवून पदभ्रमण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेत ४७ सहभागी युवक-युवतींनी भाग घेतला. पदभ्रमणात आवळी डोंगर, कुस्केम डोंगर व खोतीगाव अभयारण्य पादाक्रांत करण्यात आले. दररोज रात्री कॅम्प फायरमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन बिंदिया नाईक यांनी केले. यावेळी त्यांच्या हस्ते ॲड. शिवाजी देसाई यांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.