17/12/2023
आज १७ डिसेंबर. आजपासून थोर राष्ट्रवादी विचारवंत प्रा. डॉ. स. ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आरंभ होत आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी हा परिचयपर लेख –
‘सह’जीवन
लेखक : भूषण देशपांडे, अकोला
स. ह. देशपांडे यांचा जन्म महाराष्ट्रात शिरवळ येथे इ.स. १९२४मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरवळातच झाले. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर तेथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवीनंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात त्यांनी एम.ए. केले. पुढे डॉक्टरेट मिळवली. विद्यापीठातच कृषि-अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाची नोकरी करून इ.स. १९८४ साली ते निवृत्त झाले.
राष्ट्रवाद हा सहंच्या अभ्यासाचा आणि जीवनभरच्या चिंतनाचा विषय होता. हिंदुत्वाच्या संकल्पनेची व्यापक फेरमांडणी करणारे ‘धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीतून हिंदुत्वविचाराची फेरमांडणी’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असणारे स. ह. पुढे संघाशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे संघातून बाहेर पडले. दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या ‘हिंदू संस्कृतीतील आशय कोणता?’ ‘सावरकर प्रणीत हिंदुत्वविचाराचा पारमार्थिकांनी केलेला पराभव’, ‘मुस्लिम प्रश्न’ या लेखांतून त्यांचे ‘सावरकर ते भाजप : हिंदुत्वविचाराचा चिकित्सक आलेख’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक साकारले. याशिवाय ‘संघातले दिवस आणि इतर लेख’, ‘किबुट्झ : नवसमाज निर्मितीचा एक प्रयोग’ आदी पुस्तके त्यांनी लिहिली. समाजप्रबोधन पत्रिकेचे संपादनही त्यांनी चार वर्ष केले.
स. ह. देशपांडे यांनी भारतीय एकात्मता केंद्र, ज्ञानप्रबोधिनी पुणे या संस्थेचे प्रमुखपद काही काळ भूषविले. सातव्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ते अध्यक्ष होते. ‘ग्रामायन पुणे’ या संस्थेचे ते एक संस्थापक सदस्य होते. सहंनी आपले कार्यक्षेत्र केवळ लेखन-वाचनापुरते मर्यादित न ठेवता ठाणे जिल्ह्यातील आदिवासींना, मिरजमधील दलितांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळवून देऊन सहकारी शेतीचा प्रयोग राबवला. याशिवाय त्यांनी मराठी विश्वकोशात कृषीविषयक लेखन केले. ‘भारतीय शेती’ हा त्यांचा आणखी एक अभ्यासपूर्ण ग्रंथ. ‘शारद्वत आणि इतर व्यक्तिचित्रे’ या पुस्तकातून त्यांनी अत्यंत चित्तवेधक अशी व्यक्तिचित्रणे लिहिली.
तार्किक मांडणीचा दिग्गज, सौम्य, शांत वावर असणारा तरीही कडक, ठाम विचारवंत अशी स. ह. देशपांडे यांची ओळख होती. ग्रामीण विकासासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते साहित्यातल्या अनेक दिग्गजांनी देशपांडे यांचा प्रेमळ सहवास अनुभला असेल. शांतपणे तार्किक मांडणी करत एखाद्या समस्येची उकल करणाऱ्या, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे साक्षीदारही अनेक जण झाले असतील. कोणत्याही कामात झोकून द्यायचे, या एकाच वृत्तीने स. ह. देशपांडे यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले. याच झोकून देण्याच्या वृत्तीने अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी शिक्षणाची वाट धरली ती अखेरपर्यंत. नित्य चिंतन, लेखन, मनन करण्यात ते गुंतलेले असत. याच अभ्यासूपणाने त्यांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात काम केले. त्याच समरसतेने अध्यापनही केले. कोणत्याही वेळी विद्यार्थी त्यांच्याकडे अडचणी घेऊन येत. ज्येष्ठ विचारवंत डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांच्या अभ्यासगटात सहंचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. याच अभ्यासगटातून द. मा. मिरासदार, शंकर वैद्य, अर्जुनवाडकर, सरोजिनी वैद्य यांसारखी व्यक्तिमत्त्वे घडली. आपल्या गुरुंचा वारसा सहंनी त्याच नेटाने पुढे चालविला. विद्यार्थ्यांना ग्रामीण विकासात सहभागी करून घेण्यासाठीचा अभिनव उपक्रम त्यांनी मुंबई विद्यापीठात सुरू केला. या विषयावर त्यांनी अनेक कार्यशाळा घेतल्या. विविध सामाजिक कार्यांमध्ये त्यांनी समरसून सहभाग घेतला. खेड्यांच्या विकासासाठी विविधांगांनी झटणारे कार्यकर्ते त्यांनी उभे केले. ग्रामीण विकासाच्या संदर्भात त्यांनी विपुल लेखन केले. या माध्यमातून लोकांपर्यंत खेड्यांच्या विकासाचा प्रश्न जावा अशी त्यांची कळकळीची भावना होती. मधुकर देवलांच्या सांगलीतल्या म्हैसाळ येथील प्रकल्पातही त्यांचा मोलाचा वाटा होता. दलित समाजाला सहकारी शेती तत्त्वातून सुस्थितीत आणायला हवे असे विचार केवळ मांडून न थांबता त्यासाठी हिरीरीने ते काम करत राहिले. ग्रामायन, महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था, ग्राममंगल यांसारख्या संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. हिंदुत्व आणि राष्ट्रवाद हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय. या आवडीच्या विषयांवर भान हरपून बोलणाऱ्या त्यांना ज्यांनी ऐकले ते भाग्यवान ठरावेत. मराठीप्रमाणेच इंग्रजी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व होते. मराठी भाषेचे संशोधक स. गं. मालशेही त्यांच्या विद्यार्थ्यांना भाषाभ्यासाकरता सहंचे लेख वाचायला देत असत.
स्थूलमानाने हिंदुत्ववादी विचारवंत असलेले स. ह. संघ आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांवरही टीकास्त्र सोडण्यास कचरत नसत. बुद्धीप्रामाण्य की संस्थागत निष्ठा असा प्रश्न समोर आला की ते अत्यंत निर्भीडपणे बुद्धीप्रामाण्यवादी भूमिकेला अग्रक्रम देत आणि त्यापायी निष्ठावान लोकांचा विरोध झेलण्याची त्यांची तयारी असे. कुठल्याही इझमशी अनावश्यक निष्ठा न बाळगता राष्ट्रवादाला प्राधान्य देऊन स्वतंत्र बुद्धीने समीक्षा करणारे जे फारच थोडे लेखक झाले त्यात सहंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
सहंविषयी त्यांचे प्रकाशक दि. ग. माजगावकर लिहितात, “ते हाडाचे अभ्यासक होते. म्हणूनच ऐन तारुण्यात रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असूनही त्या विचारसरणीच्या कुंपणात ते बंदिस्त झाले नाहीत. किंवा त्या विचारप्रणालीच्या कार्यक्षेत्राच्या मर्यादा जाणवल्यावर उलट्या टोकाला जाऊन दुसऱ्या विचारप्रणालीच्या आहारी गेले नाहीत; कारण प्रत्येक प्रणालीची आपापली बलस्थाने असतात आणि मर्यादाही असतात, हे ते जाणून होते. डाव्या-उजव्या विचारप्रणालीतील योग्य तत्त्वांचा ते मेळ घालू इच्छीत होते. त्यांच्या मनात रा. स्व. संघ परिवाराचे मुखपत्र ‘विवेक’ आणि समाजवादी परिवाराचे ‘साधना’ या दोन्हींबद्दल समान आस्था होती. दोन्ही ठिकाणी ते अधूनमधून लिहीत असत. या पलीकडे आणखी म्हणजे ते संगीताचे जाणकार होते. संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास त्यांनी केलेला होता. नृत्य, चित्र, शिल्प या अभिजात कलांचे ते उत्तम निरीक्षक होते.
मुळात अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक असलेले स. ह. उत्तरायुष्यात ‘भारतीय राष्ट्रवादा’च्या तत्त्वज्ञानाची मांडणी करण्यात आकंठ बुडाले. धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे आपले तत्त्वज्ञान मांडताना, मुस्लिम समाजाची कडवी धर्मनिष्ठा राष्ट्रवादाच्या आड येते आणि याची बीजे त्यांच्या धर्मात आहेत, असे ते निःसंदिग्धपणे म्हणत असत. पण म्हणून हिंदूंनी कडवे धर्मनिष्ठ होणे, हा त्या समस्येवरचा उपाय नाही; हेही ते तितकेच ठासून सांगत असत. रूढ असलेल्या डाव्या-उजव्या कोणत्याच विचारसरणीच्या चौकटीत त्यांची ही मांडणी बसत नव्हती. त्यामुळे कोणत्याच बाजूकडून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला नाही. तरीही खुर्चीचा मानसन्मान, निरनिराळी पदे, कशाच्याही मोहात न गुंतता ते आपली धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची भूमिका ठामपणे, अखंडपणे जनमानसात रुजविण्याच्या प्रयत्नात राहिले.”
थोर सावरकर अभ्यासक आणि साक्षेपी विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी आपला ‘विचारकलह : भाग २’ हा ग्रंथ सहंनाच अर्पण केला आहे. अर्पणपत्रिकेत ते लिहितात, ‘वेगळ्या वाटेने व कोणाच्याही मार्गदर्शनाविना आम्ही एकटेच चालत निघालो. ती वाट योग्य दिशेने चालली आहे हे ज्यांच्यामुळे आम्हाला कळाले व पुढची वाटचाल सुलभ झाली ते प्रकांडपंडित व बुद्धिवादी विचारवंत डॉ. स. ह. देशपांडे यांना हा ग्रंथ अर्पण.’
साहित्यिक म्हणून सहंनी विविध प्रकारचे लेखन केले. परंतु भारतीय राष्ट्रवाद हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय होता. हिंदुत्वविचाराची नव्याने फेरमांडणी करण्याचे शिवधनुष्यही त्यांनी उचलले. त्यांनी लिहिलेली ‘काही आर्थिक, काही सामाजिक’, ‘विश्वनाथ खैरे यांचा संमतविचार आणि नवी भारतविद्या’, ‘हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व’, ‘व्यक्ती आणि प्रकृती’, ‘Polity, Society and Economy’, ‘अमृतसिद्धी : पु. ल. समग्र दर्शन’, ‘संघाच्या इतिहासातला एक अल्पज्ञात अध्याय’ ही पुस्तके गाजली.
असे विविधांगी लेखन करणाऱ्या या प्रतिभासंपन्न लेखक, मर्मज्ञ रसिक आणि बुद्धिवादी विचारवंताचे २९ जुलै २०१० रोजी निधन झाले. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस माझे विनम्र अभिवादन!
*****