14/05/2026
🌿 सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प 🌿
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित
✨ आजी–माजी कार्यकर्ता स्नेह मेळावा ✨
दिनांक १० मे २०२६ रोजी सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्पाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित “आजी–माजी कार्यकर्ता स्नेह मेळावा” उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. सुमारे ८० कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा स्नेहसोहळा पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर एकात्मता स्तोत्र –
“रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीम् ।
ब्रह्मराजर्षिरत्नाढ्याम् वन्दे भारतमातरम् ॥”
यांच्या सामूहिक पठणाने वातावरण भारावून गेले.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. श्रीकांत मल्लारेडी (कार्यवाह, येरवडा भाग) यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नरेश करपे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमास उपस्थित संस्थेचे सर्व संस्थापक सदस्य आणि कोअर टीम सदस्यांचेही स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक सदस्य व संचालक मा. श्री. विजय शिवले सर यांनी केले. त्यांनी कार्यक्रमामागील उद्देश, संस्थेची २५ वर्षांची वाटचाल आणि पुढील दिशा याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यानंतर गेली २५ वर्षे संस्थेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणारे “जनसेवा ही ईश्वरभक्ती” हे पद्य श्री. दीपक सागर यांनी सादर केले. या माध्यमातून समाजकार्याच्या प्रवासातील अनेक आठवणी पुन्हा उजाळल्या गेल्या.
त्यानंतर संस्थेच्या २५ वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित चित्रफित (व्हिडिओ डॉक्युमेंटरी) श्री. निंगप्पा यातनूर यांनी सादर आली. या चित्रफितीद्वारे उपस्थित कार्यकर्त्यांना संस्थेच्या सुरुवातीच्या दिवसांपासून आजपर्यंतच्या प्रवासातील अनेक क्षण पुन्हा अनुभवता आले.
यानंतर सौ. सविता भांगरे ताई यांनी संस्थेचा २५ वर्षांचा प्रवास अत्यंत प्रभावीपणे मांडला. संस्थेची सुरुवात, त्यामागील संघर्ष, विविध सामाजिक उपक्रम आणि आजपर्यंत झालेली प्रगती यांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्या काळातील विविध घोषणाही देण्यात आल्या. “लाडी लाडी”, “हम तो सीताराम कहेंगे” यांसारख्या घोषणांमुळे जुन्या दिवसांची आठवण ताजी झाली आणि संपूर्ण वातावरण उत्साहाने भारावून गेले.
यानंतर संस्थेच्या विविध काळातील कार्यकर्त्यांच्या विशेष मुलाखती श्री. प्रशांत वाघ यांनी घेतल्या. यामध्ये सौ. यास्मिन शेख, श्री. रमेश रोडलबंडी, श्री. नेहल शिंदे, श्री. ललित साळुंखे, सौ. अश्विनी हेंद्रे आणि श्री. रुपेश देवरे यांनी आपल्या आठवणी, अनुभव, अडचणी, प्रेरणादायी प्रसंग आणि समाजकार्याच्या प्रवासातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले. या संवादातून सध्याच्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली.
यानंतर प्रमुख पाहुणे मा. श्री. श्रीकांत मल्लारेडी यांनी “पंच परिवर्तन” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी –
• कुटुंब प्रबोधन
• पर्यावरण
• नागरी कर्तव्य (शिष्टाचार)
• समरसता
• स्वबोध
या विषयांवर अत्यंत प्रभावी विचार मांडले.
त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नरेश करपे यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन केले. विशेषतः समाजकार्यामध्ये तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा प्रभावी वापर कसा करता येईल याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे संस्थापक सदस्य आणि कोअर टीम सदस्य मा. श्री. निलेश ओव्हाळ यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक सागर यांनी केले.
यावर्षी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सर्वांसाठी आमरस व स्नेहभोजनाचा विशेष बेत ठेवण्यात आला होता. सर्व कार्यकर्त्यांनी स्नेहभोजनाचा मनापासून आनंद घेत एकमेकांशी संवाद साधला.
सर्व कोअर कमिटी सदस्य, समन्वयक, शिक्षक आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
✨ “जुन्या आठवणी, नवी उमेद” या भावनेने संपन्न झालेला हा स्नेहमेळावा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला. ✨
#सुराज्य_परिवार #स्नेहमेळावा #रौप्यमहोत्सवीवर्ष #समाजसेवा #सुराज्य