DISHA Social Foundation Pimpri chinchwad

DISHA Social Foundation Pimpri chinchwad Disha social foundation organise for people

03/08/2026
अपयशाची भीती बाळगू नका, सकारात्मक विचार करा,नक्कीच यश मिळेल – सिध्दार्थ जाधवपिंपरी, पुणे (दि. ३ ऑगस्ट २०२६) जीवनात कधीही...
03/08/2026

अपयशाची भीती बाळगू नका,
सकारात्मक विचार करा,
नक्कीच यश मिळेल – सिध्दार्थ जाधव

पिंपरी, पुणे (दि. ३ ऑगस्ट २०२६) जीवनात कधीही न्यूनगंड आणि अपयशाची भीती बाळगू नका. नेहमी प्रयत्नशील रहा, धाडसी बना. कोणतीही कृती पूर्ण क्षमतेने, समर्पण भावनेने आणि सकारात्मक विचाराने केल्यास नक्कीच यश मिळेल, असा सल्ला सुप्रसिध्द मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याने तरूणाईला दिला.
चिंचवड येथे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि दिशा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिद्धार्थ जाधवशी दिलखुलास गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात सिध्दार्थने विद्यार्थ्यांशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरेही दिली.
यावेळी प्रतिभा इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव दीपक शहा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे, दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर यांच्यासह राजेंद्र करपे,गोरख भालेकर,सचिन साठे,नाना शिवले,संतोष बाबर,
ॲड.अविनाश ववले,नंदकुमार कांबळे,संतोष चांदेरे, गणेश लंगोट आदी उपस्थित होते.
सिध्दार्थ म्हणाला की, मला माझ्या दिसण्याचा न्यूनगंड होता. स्वतःमध्ये आहे. ते प्रथम स्वीकारावे आणि स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे. मला माझा 'आरसा' देखील प्रेरणा देतो. स्वतःच्या क्षमता ओळखता आल्या पाहिजे. कोणतीही कृती करताना सर्वस्व झोकून दिले द्या व समर्पण भावनेने करा. ते तुमच्यासाठी सर्वोत्तमच असेल. जीवनात आपण नेहमी दुसऱ्यांच्या विचारांनुसार वागू लागतो, ते चुकीचे आहे.
सिध्दार्थ म्हणाला, जगात तुमचे आई-वडील हेच तुमचे ‘बेस्ट फ्रेंड’ आहेत. त्यांना कधी ‘इमोशनल ब्लॅकमेल’ करू नका. त्यांच्याशी नेहमी आदरयुक्त संवाद ठेवा. माझे आई-वडील माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. महाराष्ट्र शासनाने मला व्यसनमुक्तीचा ‘ब्रँड अँबेसिडर’ केले, हा माझ्या आई-वडिलांचा व त्यांनी माझ्यावर केलेल्या संस्काराचा सन्मान होता, असे मी मानतो.
सर्वच क्षेत्रात अपयश असते, परंतु ते कायमस्वरूपी नसते, त्यातून निराश व्हायचे नाही. दारू, सिगारेट सारख्या व्यसनांपासून दूर राहायचे आणि नैराश्यात कधीही आत्महत्येचा विचार करायचा नाही, असे तो म्हणाला.
रूप, सौंदर्य हे नश्वर आहे. आपल्या कर्तुत्वातून आपले वलय निर्माण करावे. मला एफटीआयआय किंवा ललित कला केंद्रात प्रवेश मिळाला नाही. मला द्रोणाचार्य मिळाले नाहीत. मात्र, मी अनुभवाच्या जोरावर एकलव्य होऊ शकलो, अशा भावना सिध्दार्थने व्यक्त केल्या.
प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले. सूत्र संचालन डॉ. रवींद्र निरगुडे यांनी व आभारप्रदर्शन सुरेखा कुंभार यांनी मानले.

--------चौकट-------------
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना "माणूस" म्हणायचे का ?

सिध्दार्थ जाधवने "ॲनिमल" नाटकातील काही संवाद व प्रसंगांचे यावेळी सादरीकरण केले. याविषयी तो म्हणाला की, आई, वडील आणि गुरुजनांकडून आपल्यावर वेळोवेळी संस्कार होत असतात. मात्र, काही लोक मानवाचा जन्म मिळून देखील जनावराप्रमाणे वर्तणूक करतात. चार वर्षाच्या बालिकेपासून ते म्हाताऱ्या महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना "माणूस" म्हणायचे का ?, असा सवाल त्याने केला.
"ॲनिमल" या नाटकात याच ज्वलंत विषयावर आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा आशय मांडण्यात आला आहे, असे सांगून हे नाटक सर्वांनी सहकुटुंब पाहून बोध घेतला पाहिजे, असे आवाहन त्याने केले.

------चौकट------

रौप्यमहोत्सवी वर्षांत मागे वळून पाहताना....

चित्रपट क्षेत्रातील माझे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. मागे वळून पाहताना उराशी बाळगलेली अनेक स्वप्नं पूर्ण झाल्याचे समाधान आहे, असे सिध्दार्थ म्हणाला.
माझे वडील बीएमसीमध्ये कामाला होते. मुंबईत घर घेणे म्हणजे दिवास्वप्नं होते. परंतू कष्टाने वयाच्या २६ व्या वर्षी 'रामचंद्र जाधव' यांच्या नावाची पाटी लावून नवीन घरात गृहप्रवेश केला. तसेच "ताराराम" या नावाने निर्मिती संस्था स्थापन करून "ॲनिमल" नाटक सुरू केले.
भरत जाधव, केदार शिंदे, अंकुश चौधरी, महेश मांजरेकर, अमित भंडारी व इतर अनेक मित्रांचे, हितचिंतकांचे माझ्या आयुष्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. दिग्दर्शकांनी माझ्याकडून उत्कृष्ट काम करून घेतले. प्रत्येकांकडून मला खूप शिकायला मिळाले, अशा भावना सिध्दार्थने यावेळी व्यक्त केल्या.
-------------------------------

31/07/2026

मनमानी कारभार
‘सेटलमेंट’चा बाजार

‘खोटं बोल पण रेटून बोल’!

पिंपरी-चिंचवड महापालिकेत कशाप्रकारचा अनागोंदी कारभार सुरू आहे, याविषयी बोलण्यासारखे काहीही शिल्लक राहिलेले नाही. भ्रष्ट कारभाराचा कळस गाठलेला असतानाच 'हम करे सो कायदा' आणि 'खोटं बोल, पण रेटून बोल'चा खाक्या जणू या कारभाराचा अधिकृत मंत्रच बनला आहे.
सत्ता मिळाली म्हणजे नियम, कायदे आपल्या सोयीने बदलायचे, जनतेचे प्रश्न दुर्लक्षित करायचे आणि त्यावर प्रश्न, शंका उपस्थित करणाऱ्यांनाच खोटे पाडायचे, अशी धोकादायक मानसिकता पालिकेच्या कारभाऱ्यांची झाली आहे.
लाखो शहरवासीयांच्या मूलभूत प्रश्नांपेक्षा सत्तेचे आणि टक्केवारीचे राजकारण, धंदेवाईकपणा, मांडवली, तोडपाणी हेच अधिक महत्त्वाचे ठरते आहे.

संततधार पावसांत पिंपरी-चिंचवड शहर पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचा भयावह अनुभव शहरवासीयांनी नुकताच घेतला. मानवनिर्मित चुकांमुळे विशेषत: नद्यांचा गळा घोटण्यात आल्याने, नाले बुजवण्यात आल्यामुळे लाखो शहरवासीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्या पुराच्या पाण्यातच शहरविकासाचा दावा बुडून मेला. त्या संकटातून सावरण्यापूर्वीच इतर समस्या पिंपरी-चिंचवडकरांसमोर आ वासून उभ्या ठाकल्या आहेत.

शहरभरातील रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाल्याचा विदारक अनुभव शहरवासीय दररोज घेत आहेत.
पावसामुळे शहरात असा एकही रस्ता शिल्लक राहिला नसेल, ज्या ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची वाट लागलेली नाही.

थोडा पाऊस पडला तरी रस्त्यांवरचे डांबर उखडते, कधी वाहून जाते. रस्ताभर खडी अस्ताव्यस्त पसरलेली असते. सर्वत्र चिखल साचलेला असतो. रस्ते निसरडे बनल्याने दुचाक्या घसरतात. खोल खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते. त्यातून वाहने नेताना तारेवरची कसरत करावी लागते. कित्येक वाहनस्वारांचे अपघात होतात, अनेकांना शारीरीक हानी पोहोचते. वाहतुकीचा खोळंबा होतो. मोठी वाहने तासनतास कोंडीत अडकून पडतात. हजारो-लाखो लोकांचे हाल होत आहेत. मात्र, त्याचे कोणालाही सोयरसुतक नाही.

रस्ते निर्मितीसाठी मुळातच करोडो रूपये खर्च करण्यात आलेत. त्यात पुन्हा दुरूस्तीच्या नावाखाली करोडो रूपये ‘स्वाहा’ झालेत. पालिकेला खड्ड्यात घालण्याची एकही संधी सोडली जात नाही. ते महान कार्य राजकारणी, अधिकारी, ठेकेदारांच्या अभद्र युतीमार्फत सुरूच आहे.
ज्या करदात्या नागरिकांच्या पैशांवर हा ऊतमात होतोय, ते पिंपरी-चिंचवडकर उघड्या डोळ्यांनी आणि हतबलपणे हा सारा तमाशा पाहत असून प्रचंड त्रासही भोगत आहेत.

पालिकेने यावर तातडीने उपाययोजना करायला हवी. त्याऐवजी भलतेच कारनामे सुरू आहेत. निगरगट्ट पातळीवर पोहोचलेले बहुतांश अधिकारी वातानुकुलित कक्षात बसून शहरवासीयांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. शहरात दीडशेच खड्डे आहेत, पाचशेच खड्डे आहेत, अशाप्रकारे जाहीर केली जाणारी खड्ड्यांची खोटी आकडेवारी अत्यंत संतापजनक आहे.
वस्तुत: शहरात लाखोंच्या संख्येने खड्डे आहेत. एकेका चौकात पाचशे खड्डे असू शकतील. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे, हे कळायला मार्ग नाही, अशी परिस्थिती जवळपास सगळीकडेच आहे. खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या पिंपरी-चिंचवडकरांच्या या मरणयातना सहन करण्यापलीकडे गेल्या आहेत.
‘खड्ड्यांचे शहर’ असा लौकिक प्राप्त करू पाहणाऱ्या या शहरात सगळेच रस्ते सुस्थितीत असल्याचे धादांत खोटे दावे करणाऱ्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी खरंतरं जोड्याने मारले पाहिजे.

२४ तास पाणीपुरवठा करण्याची घोषणा महापालिका अनेक वर्षांपासून करत आहे. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे पुरेसे पाणी अजून देता आले नाही.
सध्या संपूर्ण शहरात पाण्याची टंचाई आहे. आवश्यकता नसतानाही २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तीन महिने प्रायोगिक तत्वावर पाणीकपात करू. आवश्यकतेनुसार पुढे वाढवू, असे आश्वासन तेव्हा देण्यात आले होते. प्रत्यक्षात, साडेसहा वर्षानंतरही पाणीकपात सुरूच आहे.
सद्यस्थितीत पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण पूर्णपणे भरलेले आहे. तरीही जून महिन्यात लागू केलेली वाढीव पाणीकपातही लागू आहे.
पाणीकपातीबरोबरच अपुऱ्या व अनियमित पाण्यामुळे हैराण झालेल्या शहरवासीयांना आता गढूळ आणि दुषित पाणी मिळत आहे. याकडे कोणाचे लक्ष नाही. सर्वांचे लक्ष आहे, ते केवळ निविदा कधी काढायच्या, टक्केवारी किती मिळणार याकडे.

पिंपरी-चिंचवडकरांच्या दृष्टीने महत्वाच्या अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष करून महापालिकेत सेटलमेंट’च्या धंदेवाईक विषयांना प्राधान्य देण्याचे काम सुरू आहे.
महापालिकेतील मुख्य अभियंता पद निरस्त करून एकाच वेळी शहर अभियंता पदासाठी तीन पदे निर्माण करण्याचा अजब निर्णय, हा त्यापैकीच एक आहे. तीन शहर अभियंता करू पाहणारी पिंपरी पालिका ही संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव महापालिका असेल.

सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी मूळ विषय दुसराच होता. मात्र, सुसंगत उपसूचनेच्या नावाखाली ‘खोक्यांचे रेटकार्ड’ असणारा हा वादग्रस्त विषय घेण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
शांताराम गराडे यांच्यापासून ते एकनाथ उगीले, महावीर कांबळे, राजन पाटील ते अगदी अलीकडे मकरंद निकम यांच्यापर्यंत या महापालिकेने एकच शहर अभियंता पाहिला आहे.
निकम यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. तेव्हापासून रिक्त राहिलेल्या शहर अभियंता पदाच्या खुर्चीसाठी बरेच अर्थकारण रंगले होते. लिलावाप्रमाणे मोठी ‘बोली’ लागली होती. पडद्यामागे ‘तोडपाणी’ची बोलणी सुरू होतीच.
त्याचाच पुढचा अंक म्हणून ‘शहर अभियंता १’, ‘शहर अभियंता २’ आणि ‘शहर अभियंता ३’ अशी पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव २७ जुलैच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

प्रशासनाकडून मांडलेला मूळ प्रस्ताव असा होता की, ‘सहशहर अभियंता’ या पदावर किमान तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी धारण केलेल्या अधिकाऱ्याला सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नती द्यायची होती. या निकषात मनोज सेठीया बसत होते. पालिकेच्या पदोन्नती समितीने त्यांचीच शिफारस केली.
त्यानुसार, आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या संमतीने सेठीया यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सभेसमोर मांडण्यात आला. मात्र, उपसूचनेच्या नावाखाली काहीही घुसडण्याची परंपरा कायम ठेवून सत्ताधाऱ्यांनी शहर अभियंता पदाचे तीन तुकडे करणारी उपसूचना मांडली.
‘शहर अभियंता १’ साठी प्रमोद ओंभासे, ‘शहर अभियंता ३’ साठी मनोज सेठीया यांना पदोन्नती देण्यात आली.
‘शहर अभियंता २’ चा निर्णय राखून ठेवण्यात आला. ते पद पिंपरी पालिकेतील वादग्रस्त ठरलेले ‘पर्यावरण’ अधिकारी संजय कुलकर्णी यांच्यासाठीच रिक्त ठेवण्यात आले.
मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेत नऊ निष्पाप कामगारांचा बळी गेल्याप्रकरणी जबाबदार धरून संजय कुलकर्णी यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले, त्याच कुलकर्णी यांना शहराचे भाग्यविधाते म्हणविणाऱ्या, प्रत्यक्षात शहराचे वाटोळे करू पाहणाऱ्यांकडून शहर अभियंता पदावर बढती दिली जाणार आहे.

सुरूवातीला शहर अभियंता पदाच्या विषयाला सभेत मंजुरी देण्यात आली. यावरून फारच बोभाटा होऊ लागला. गंभीर आरोप होऊ लागल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी पलटी घेतली. अगदीच न पटणारे फुटकळ दावे करत सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

या विषयामागचे खरे कारण म्हणजे, संजय कुलकर्णी पर्यावरण विभागाचे प्रमुख आहेत. नदी सुधार प्रकल्पांसारखे हजारो कोटींचे प्रकल्प या विभागामार्फत राबवण्यात येणार आहेत. अब्जावधींच्या निविदा अंतिम प्रक्रियेत आहेत. याशिवाय, बरेच धंदेवाईक विषय त्यांच्या अधिकारकक्षेत आहेत. या अर्थकारणात अनेक दिग्गज, माननीय छुपे लाभार्थी आहेत. अशा बिनभांडवली धंद्यात नुकसान होऊ नये, किंबहुना झाला तर फायदाच व्हावा, यासाठी पट्टीतले अधिकारी मोक्याच्या पदावर हवे असतात.
त्यामुळे कुलकर्णी यांचे निलंबन मागे घेण्यासाठी, त्यांना शहर अभियंता पदावर बसवण्यासाठी लाभार्थ्यांचा कमालीचा आटापिटा सुरू आहे.

मुळात शहर अभियंता सारख्या सर्वोच्च पदनिर्मितीचा विषय उपसूचनाद्वारे मंजूर करण्याचे कारणच काय, हा प्रयत्न देखील संशयास्पद ठरतो. संपूर्ण शहराची धुरा ज्या हातात जाणार आहे, त्या पदावर बसणारे काय लायकीचे असावेत, हे तपासून पाहण्याबरोबरच या महत्त्वाच्या विषयावर साधकबाधक चर्चा झालीच पाहिजे.
शहराचे प्रतिनिधीत्व करण्यासाठीच १२८ नगरसेवक निवडून दिले आहेत, त्यांची काहीतरी मते असूच शकतात. त्यांचे म्हणणे किमान ऐकून घेण्याचे सौजन्य मनमानी कारभार करणाऱ्या मूठभरांनी दाखवले पाहिजे होते.

मोशी प्रकरणात नऊ जणांचा जीव गेल्यानंतरही आयुक्त विजय सूर्यवंशी यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्यात आली. तेव्हा वरिष्ठांसमोर तोंडघशी पडलेल्या आणि म्हणूनच कठोर झालेल्या आयुक्तांनी दोषी संजय कुलकर्णी यांच्यावर कारवाईची ठाम भूमिका घेतली. अन्यथा, सत्ताधाऱ्यांच्या आर्शिवार्दाने कुलकर्णींची ‘क्लीन चीट’ ठरलेली होतीच. आता त्याच आयुक्तांनी राजकीय दबावाखाली किंवा अन्य आमिषाला बळी पडून निर्णय घेतल्यास कुलकर्णी यांचे पुर्नवसन ठरलेले आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.

मोशी दुर्घटना प्रकरणात पालिकेच्या अग्नीशामक दलाचे अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनाही निलंबित करण्यात आले. कचरा डेपोत ढासळलेल्या इमारतीचे दोन मजले अनधिकृत होते. त्याची स्थळ पाहणी न करता ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) देण्यात आले. त्याची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनी कारवाई केली.
मात्र त्याचवेळी, कचरा डेपोतील प्रकल्प चालवणाऱ्या ‘अँटोनी लारा’ कंपनीच्या प्रमुखांना मोकाट सोडण्यात आले. कंपनीकडून ‘बळीचा बकरा’ म्हणून पुढे केलेल्या दोन जणांवरच कारवाई करण्यात आली. खरे दोषी नामानिराळेच राहिले.
शहरातील कोट्यवधी रूपयांची कंत्राटे मिळवणाऱ्या या कंपनीचे आणि पालिकेतील अनेक माननीयांचे, अधिकाऱ्यांचे छुपे आर्थिक संबंध आहेत. त्यांच्यातील ‘देवाणं-घेवाण’ किंवा ‘साटेलोटे’ पाहता, नऊ निष्पापांचे जीव गेले असले तरीही कंपनी प्रमुखांवर कसलीच कारवाई होणार नव्हतीच, अगदी तसेच झाले.

शहरातील नागरिकांना सुरक्षित रस्ते, स्वच्छ-पुरेसा-नियमित पाणीपुरवठा, सक्षम जलनिस्सारण व्यवस्था, लोकाभिमुख प्रशासन हवे आहे. निर्णयप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि प्राधान्यक्रमातील विसंगती त्यात खोडा घालू शकते. सत्ता सोय नसून जबाबदारी आहे. त्या जबाबदारीची जाणीव असायला हवी. 'विकास' हा शब्द केवळ भाषणांपुरताच राहू नये. तो प्रत्यक्षात दिसायला हवा.
'हम करे सो कायदा' या एकाधिकारशाही दर्शवणाऱ्या मानसिकतेची किंमत सामान्य नागरिकांनाच मोजावी लागते, हे लक्षात घेतले पाहिजे. मनमानी कारभार आणि ‘सेंटलमेंट’चा बाजार, असे सध्याचे सत्तेचे उन्मत्त स्वरूप आहे, वास्तविक तसे असता कामा नये, याविषयी सत्ताधाऱ्यांनी आत्मचिंतन करायला हवे.
***
(३१ जुलै २०२६)
--

22/07/2026
22/07/2026
दिशा सोशल फाउंडेशनचे सन्माननीय संचालक, तसेच ऑल इंडिया बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे खजिनदार.श्री.राजेशजी सावंत आपणास वाढदिवसा...
22/07/2026

दिशा सोशल फाउंडेशनचे सन्माननीय संचालक, तसेच ऑल इंडिया बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे खजिनदार.
श्री.राजेशजी सावंत आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आगामी वर्ष आपणास सुख समृद्धी आरोग्यदायी यशदायी जावो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना 💐💐🎂🎂
शुभेच्छुक.. दिशा सोशल फाउंडेशन परिवार पिंपरी चिंचवड शहर 💐🙏💐🙏

30/06/2026

तिजोऱ्या फोडल्याच, ठेवीही मोडल्या !
उधळपट्टीत चढाओढ, 'श्रीमंती'ला ग्रहण !

पिंपरी-चिंचवड महापालिका ही महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक संपन्न अशा महापालिकांपैकी एक मानली जात होती. हजारो कोटी रुपयांचा राखीव निधी, हे या ‘श्रीमंत’ पालिकेचे वैशिष्ट्य होते. मात्र, ती संपन्नता आणि त्या श्रीमंतीचा रूबाब आता राहिला नाही.

गेल्या काही वर्षांत पिंपरी पालिकेला भ्रष्ट कारभाराचे ग्रहण लागले आहे. पालिकेच्या तिजोरीवर संगनमताने वारंवार दरोडे टाकण्यात आले. विकासकामांच्या गोंडस नावाखाली वारेमाप उधळपट्टीचा सपाटाच लावण्यात आला.
हे कमी होते म्हणून की काय, आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून राखून ठेवलेल्या कोट्यवधी रूपयांच्या ठेवी सतत मोडल्या जाऊ लागल्या.
अशा अनागोंदीमुळे, भ्रष्ट आणि नियोजनशून्य कारभारामुळे पिंपरी पालिकेच्या ‘श्रीमंती’ला तडे गेले असून भिकेचे डोहाळे लागले आहेत.

पाणीयोजनेसाठी पिंपरी पालिकेकडून ५५० कोटी रूपयांच्या ठेवी मोडण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे ठेवींच्या अर्थकारणाची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली.
ठेवी मोडण्याची पिंपरी पालिकेची ही पहिलीच वेळ नाही. ‘कोणते ना कोणते’ कारण पुढे करून यापूर्वी अनेकदा ठेवी मोडण्याचा नाकर्तेपणा पालिकेने दाखवला आहे. पालिकेच्या कथित ‘श्रीमंती’मुळे आतापर्यंत तो विषय फारसा चर्चिला जात नव्हता.
मात्र, प्रशासकीय काळात ‘अति तेथे माती’ झाल्याने आणि प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजय खोराटे यांच्या अंदाधुंद कारभारामुळे पालिकेची पुरेपूर वाट लागली, तिजोरीत खडखडाट झाला, तेव्हा सगळ्यांचे डोळे खाडकन उघडले.

पिंपरी पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नांचे स्त्रोत मर्यादित असतानाही सातत्याने उधळपट्टी होत राहिली. पालिका कर्जबाजारी झाली. ठोस नियोजन नसताना ढीगभर प्रकल्प सुरू करण्यात आले, त्यासाठी पैसे नाहीत म्हणून कोट्यवधींच्या ठेवी मोडाव्या लागल्या. त्यानंतर ठेवी मोडण्याचा पायंडाच पडला, तो अजूनही कायम आहे.

महापालिकेने ‘हरित कर्ज’ म्हणून २०० कोटींचे रोखे काढले आहेत. ‘मनपा कर्जरोखे’ म्हणून २०० कोटी रूपये काढले आहेत, जागतिक बँकेकडून १६० कोटी रूपये कर्ज घेतले आहेत. सर्व मिळून ४६० कोटी रूपयांचे कर्ज काढले, त्यापैकी कर्जाची काही रक्कम फेडण्यात आली असली तरी, ३३७ कोटींचे कर्जाची परतफेड बाकी आहे.

ठेवींचे सांगायचे म्हटल्यास...
सध्या पालिकेकडे निधीस्वरूपातील १,५५० कोटींच्या ठेवी आहेत. इतर राखीव निधी ४,२१८ कोटी आहेत. सर्व मिळून ५,७६८ कोटींच्या ठेवी आहेत.
ही पालिकेकडून जाहीर झालेली आकडेवारी असल्याने ती फसवी किंवा खोटी असू शकते. कर्जाची रक्कम व मोडलेल्या ठेवींची रक्कम यापेक्षा कितीतरी जास्त असू शकते.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, पिंपरी पालिकेच्या ठेवी आणि कर्जबाजारीपणाच्या मुद्द्यावरून वेळोवेळी सत्ताधाऱ्यांची ‘कुंडली’ काढून पिंपरी पालिकेच्या कारभाराचा ‘पंचनामा’ केला होता.

विकासकामांसाठी ठेवी मोडाव्या लागल्या, हे कारण ‘बकवास’ आहे. महापालिकेच्या अर्थकारणात सर्वच पातळीवर उधळपट्टी करण्यातील चढाओढ पाहता, ते कारण बिलकूल पटण्यासारखे नाही.

‘मोठे घास’ खाण्याच्या हेतूने विकासयोजना, प्रकल्पांच्या आखणीचा डाव संगनमताने रचला जातो. अशा प्रकल्पांचे लाभार्थी उच्चपदस्थ असतात. त्यामुळे खर्चाच्या आकड्यांनी कितीही कोटींची उड्डाणे घेतली तरी आणि जनहिताच्या दृष्टीने उपयुक्तता असली-नसली तरीही त्या गोष्टी मार्गस्थ होतात.
विकासकामांना थेट विरोध करता येत नाही किंबहुणा तो केला जात नाही. त्यामुळे विकासाच्या नावाखाली काहीही करायला सगळेच मोकळे असतात.

केवळ ठेवी मोडून आणि अव्वाच्या सव्वा खर्च करून विकास साध्य होत नाही. त्यासाठी कृतीशील कार्यक्रम आणि सातत्यपूर्ण कामगिरी अपेक्षित आहे. प्रत्यक्षात तसे काही होताना दिसत नाही.

एकीकडे बचतीचे दावे करायचे, दुसरीकडे सर्वांनी मिळून लूटमार करायची. उत्पन्न वाढवण्याची भाषा करायची आणि उधळपट्टीचे निर्णय घ्यायचे, ही विसंगती बाराही महिने दिसून येते.
यादृष्टीने अगदी अलीकडचे उत्तम उदाहरण देता येईल.
शहराचे महापौर आणि पालिका आयुक्तांसाठी लाखो रूपये खर्च करून नव्या मोटारी खरेदी करण्यात येणार आहेत. सध्याच्या चांगल्या मोटारी दिमतीला असताना नव्या मोटारींचा अट्टाहास कशासाठी ?
आयुक्तांच्या मोटारीसाठी १२ लाख, महापौरांच्या मोटारीसाठी २० लाखांची खर्चमर्यादा शासनाने घालून दिलेली आहे. तरीही या मोटारी त्यापेक्षा दुपटीहून अधिक खर्चाच्या आहेत. याखेरीज, पदाधिकाऱ्यांसाठी नव्याने १८ मोटारी खरेदी करण्यात येणार आहेत.
त्यात भरीस भर म्हणून मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या, बड्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. त्याकरिता लाखो-करोडो रूपयांचा चुराडा केला जात आहे.

एकीकडे आर्थिक चणचण आहे, निधीची कमतरता आहे, प्रभागातील आवश्यक कामांसाठी पैसे नाहीत, अशी ओरड करायची. दुसरीकडे, अनावश्यक कामांसाठी कोट्यवधींची लयलूट करायची, हे जनतेला मूर्खात काढण्याचे काम आहे. विविध उपक्रमांच्या, कार्यक्रमांच्या नावाखाली लाखो रूपये खर्च होतच आहेत, याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली जात आहे.

उत्पन्नवाढीच्या नावाखाली सर्वसामान्यांवर बोजा टाकण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नेहमीच 'स्वर्गीय आनंद' मिळतो. त्यापेक्षा पालिका भवनातील दलालीला, एकूणच टक्केवारीच्या राजकारणाला आवर घातल्यास पालिकेची अब्जावधी रूपयांची बचत होऊ शकते. मग, कोणतीही करवाढ करायची आवश्यकता भासणार नाही की रहिवाशांवर जप्तीच्या मोहिमेची गरज पडणार नाही.
मात्र, असे काहीही होणार नाही. पैसे खाणे कोणीही थांबवणार नाही. संधी मिळेल तिथे हात धुवून घेण्याची वृत्ती इतक्या सहजपणे जाणार नाही.

विकासकामांच्या नावाखाली लूट करणे, ही तर भ्रष्ट्राचाराची खरी ‘कार्यपध्दती’ आहे. आवश्यकता असो-नसो. कोट्यवधींची कामे काढायची. आपल्या ‘बगलबच्च्यांच्या’ किंवा पै-पाहुण्यांच्या नावाने ठेके घ्यायचे. चार आण्याचे काम चार रूपयांपर्यंत रेटून न्यायचे. ‘वाढीव’ म्हणून आणखी १०-२० टक्के रक्कम लाटायची. कधी निविदांमध्ये ‘रिंग’ करायची, तर कधी न केलेल्या कामांची बिले वसूल करायची. अशाप्रकारे वर्षानुवर्षे मिळून-मिसळून दरोडेखोरी सुरू आहे. सत्ता कोणत्याही पक्षाची असो, यात फरक पडलेला नाही.

पिंपरी पालिकेच्या प्रशासकीय काळात जितकी बेहिशेबी लूटमार झाली, ती आजपर्यंत कधीही झाली नव्हती. त्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीला किंबहुणा श्वेतपत्रिका काढण्याच्या मागणीला थेट केराची टोपली दाखवण्यात आली.
बोगस उपसूचनांच्या प्रकरणात ६० कोटींचा ‘गोलमाल’ करणाऱ्या प्रवीण जैन यांच्यावर कारवाई झालीच नाही. अशाप्रकारे ज्यांनी-ज्यांनी पालिका लुटली, धुवून खाल्ली. त्यांच्याकडून सदर रक्कम वसूल करून शहरातील विकासकामांना वापरायला हवी. मात्र, सजगतेचा अभाव असल्याने दृष्टीने पाठपुरावा होत नाही.

भ्रष्टाचारी कारभाराचा कांगावा करून अनेकांनी फक्त ‘बोलबच्चन’ केले, 'चमकोगिरी' केली, त्याचा काडीचाही उपयोग झाला नाही.
प्रशासकीय काळानंतर लोकप्रतिनिधी पर्वात वाढत्या खर्चावर, उधळपट्टीवर नियंत्रण आणण्याचे कोणतेही सशक्त प्रयत्न झालेले नाहीत. जी मनमानी प्रशासकीय काळात होत होती, थोड्याफार फरकाने त्याचीच पुनरावृत्ती सध्या सुरू आहे.

करोडो रूपये खर्च करून महापालिकेत निवडून आलेल्यांना काहीही करून तो ‘खड्डा’ भरून काढायचा आहे. त्यातील कित्येकजण फक्त ‘पैसे वसूल’ करण्याच्या मोहिमेला लागले आहेत. काही कर्जबाजारी आहेत, ते सकाळपासूनच ‘धंद्याला’ लागलेले दिसतात. प्रतिनियुक्तीचे जे अधिकारी मंत्रालयात पैसे चारून आलेत. ते वसुलीसाठी ‘जेसीबी’ लावून बसलेले असतात. तगडा ‘बकरा’ शोधतच असतात. अशा मंडळींना शहरहिताचे काही देणं-घेणं नाही आणि ‘वरकमाई’साठी कोणताही विषय वर्ज्य नाही. पालिकेला खड्ड्यात घालण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.

आवश्यक त्या विकासकामांसाठी निधी वापरणे चुकीचे नाही. मात्र, विकासाच्या गोंडस नावाखाली केवळ ‘खाबुगिरी’करिता जेव्हा राखीव निधी वापरला जातो. तेव्हा आर्थिक शिस्त बिघडते, नियोजन कोलमडते, भविष्यातील सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.
राखीव निधी कायमचा जपून ठेवण्यासाठी नसतो, हे खरे असले तरी तो सरधोपटपणे कसाही खर्च करून चालणार नाही. दूरदृष्टीने त्या निधीचा वापर झाला पाहिजे. शहराच्या प्रगतीसाठी खर्च करत राहणे आवश्यक आहे. परंतु तो खर्च पारदर्शक, व्यवहार्य असला पाहिजे.
ठेवींची मोडतोड करणे, हा केवळ आकड्यांचा खेळ नसून, शहराच्या भवितव्याचा आणि आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आजच्या विकासासाठी उद्याची आर्थिक सुरक्षितता धोक्यात येणार नाही, याची खबरदारी सर्वांनीच घेतलीच पाहिजे.
०००

Address

Pimpri Chinchwad
Pune
411018

Alerts

Be the first to know and let us send you an email when DISHA Social Foundation Pimpri chinchwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share