06/06/2026
🚩*श्रीशिवराज्याभिषेक दिन*
निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनासी आधारू । अखंडस्थितीचा निर्धारू ।
श्रीमंत योगी ।।
परोपकाराचिया राशी ।
उदंड घडती जयाशी ।
तयाचे गुण महत्त्वासी ।
तुळणा कैची? ।।
यशवंत कीर्तिवंत ।
सार्मथ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत ।
जाणता राजा ।।
आचारशीळ विचारशीळ ।
दानशीळ धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ ।
सकळा ठाई ।।
या भूमंडळाचे ठायी ।
धर्म रक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हांकरिता ।।
कित्येक दुष्ट संहारिला।
कित्येकास धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला l शिवकल्याण राजा l
- समर्थ रामदास स्वामी
प्रचंड तू, शिवाजी तू, प्रचंड शिवस्वरूप तू l
मान महाराष्ट्र तू, स्वराज्य जाग दिलीस तू ll
कण कण सह्याद्रीचा कणखर त्याचे मन तू l
सजग समर सह्याद्री सिंह नरसिंह तू ll
अजिंक्य तू अभेद्य तू प्रचंड शिवस्वरूप तू l
एक एक मावळ्याचा श्वास श्वास श्वास तू l
तोरण गडी बांधले तोरण महाराष्ट्र तू ll
वार प्रतीवार अतिवार सखोल तू l
धार, तलवार, भवानी एक घाव तू ll
युक्ती नीती बुद्धीचे सामर्थ्य बलाढ्य तू l
प्रचंड तू, शिवाजी तू, प्रचंड शिवस्वरूप तू l
- जीवन धर्माधिकारी
हिंदवी स्वराज्य संस्थापक, शककर्ते, हैंदव धर्मोद्धारक, गडपती, गजअश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्नश्रीपती, अष्टावधानजागृत, अष्टप्रधानवेष्टित, न्यायलंकारमंडित, शस्त्रशास्त्रपारंगत, राजनीतिधुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्रीशिवाजी महाराज की जय...
क्षणभर फक्त विचार करून बघूया की पुण्यश्लोक श्रीशिव छत्रपती महाराज नसते, तर.. आजचा इतिहास काय म्हणून लिहिला गेला असता?
क्षणात कापरं भरून - डोकं भणभण करू लागेल, मस्तक फुटायची वेळ येईल, जागच्या जागीच अंगाला दरदरून घाम फुटेल, कुणी कल्पनेनेच गलितगात्र होईल...
पण भानावर राहून, तर्काच्या कसोटीवर घासून 'ऐतिहासिक सत्याला' यथावत् स्वीकारू शकणाऱ्या आपल्यासारख्या डोळस व्यक्तींचा - आपल्या 'जाणत्या' शिवकल्याण राजाच्या पराक्रमाने ऊर भरून येईल.
असा खरा शिवधर्म पाळणारे लेखक, कवी, नाटककार, शिक्षक, समाजातील आदरणीय, ज्येष्ठ - श्रेष्ठ व्यक्ती, सर्वजण महाराजांचा खरा पराक्रम आणि आदर्श मांडण्यासाठी आपापल्या परीने सरसावतील...
अनेक शतकं उत्तरेतील एकापेक्षा एक क्रूर आक्रमणं पाहून देखील अनेक साम्राज्ये शेवटपर्यंत बेसावध राहिली. क्षात्रतेजविहीन राजे आणि त्यांच्यातील कर्तव्यबोधाचा, शत्रुबोधाचा अभाव यामुळे ती कालौघात नष्ट होत गेली.
८व्या शतकाच्या सुरुवातीला अतिशय क्रूर, बळजबरीने धर्मपरिवर्तन, अगणित संपत्तीची लूट, माता-भगिनींचा शीलभंग करून जनानखान्यात किंवा तोहफा म्हणून, तर मुले - युवक यांना बाजारात विक्रीसाठी गुलाम म्हणून नेले जाणे.. यासाठी केलेली दुष्ट - यावनी आक्रमणांची अखंड मालिका आपल्या मातृभूमीने अनुभवली.
मोहंमद बिन कासिमपासून सुरू झालेली ही टोळधाड पुढे वेगवेगळी महान् ??? नावे घेऊन येतच राहिली.
असाच, तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीनंतर देवगिरीच्या यादवांच्या पराभवाबरोबर महाराष्ट्रभूमीवर यावनी टोळधाडीचा अंमल सुरू झाला. आणि तिथून पुढे अनेक शतकं कुठे 'स्वराज्य' हा शब्द उच्चारायची देखील सोय राहिली नाही.
आया - बहिणी - लेकी - बाळी - सुना - लेकरं - गाई - गुरं - शेती - जमीनजुमला - सोनं नाणं, जड जवाहीर, ऐश्वर्य - मानमरातब कशाची कशाची म्हणून शाश्वती राहिली नाही. कोण, कुठून, कधी, कसा येईल, कशाला आणि काय म्हणून ओरबाडून घेऊन जाईल, याची काहीच शाश्वती नव्हती.
खरोखर, महाराजांच्या जन्माच्या वेळेस असलेली अतिशय विपरीत परिस्थिती, त्यात धैर्यवान राजमाता जिजाऊ मांसाहेब यांची दूरदृष्टी, त्यांनी महाराजांची शस्त्रशास्त्रसंपन्नता वाढवली, घडवली.. यातून रायरेश्वर महादेवाच्या साक्षीने - 'स्वराज्य' श्रींचे राज्य निर्माण व्हावे, हा संकल्प आणि वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी सवंगड्यांसह तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं जाणं.. सर्व काही अतर्क्य वाटणारं सत्य!
आदिलशाही, निजामशाही, मुघल, बरीदशाही, इमामशही , कुतुबशाही, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज अशी अनेक गिधाडं आणि जोडीला कुठे पिढ्यान् पिढ्या खचलेले, पिचलेले तर कुठे कर्तव्यशून्य आणि स्वार्थाने लडबडलेले 'स्वकीय' या सर्वांचा विरोध.
प्रस्थापित सर्व कल्पना - मान्यता मोडून काढत, आपल्या अनेक निष्ठावंत मावळ्यांसोबत मोहिमा फत्ते करत, स्वराज्याचा वारू चौफेर दौडवत हा 'रयतेचा राजा - जाणता राजा' झाला, तो दि. ६ जून १९७४ या दिवशी. राज्याभिषेक - धर्ममान्यतेसह छत्र, चामर, तख्त - सिंहासनधारी हिंदूपतपातशहा झाले, छत्रपती श्रीशिवराय!
आत्मविस्मृत, स्वाभिमानशून्य जनतेला आयुष्यभरासाठी अखंड प्रेरणा स्त्रोत झाले, छत्रपती श्रीशिवराय!
पुढच्या येणाऱ्या पिढ्यान् पिढ्यांसाठी नुसतं नाव नाही तर recognition - ओळख, स्थान मिळवून दिलं राजांनी.
यानंतर काही वर्षातच दक्षिण दिग्विजयानंतर वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी महाराजांनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला.
महाराज गेले; पण त्यांनी स्वराज्याला दिला 'छावा'. सोबत, मन - मनगटात नव्हे, तर प्रत्येकाच्या रक्तात दिला आपल्या पराक्रमाचा 'अक्षय वारसा'.
म्हणून, ज्यांच्यामुळे आपण सुखाने भोजन करू शकतो आहोत, त्या आपल्या शिवछत्रपतींचे पुढील प्रमाणे स्मरण करूयात, ज्यामुळे हा वारसा जाणीवपूर्वक आणि समर्थपणे पुढच्या पिढी पर्यंत पोहोचेल -
महामंत्र आहे नव्हे शब्द साधा|
जयांच्या स्मृतीने जळे म्लेंछ बाधा||
नुरे देश अवघा जयांचे अभावी|
शिवाजी जपू राष्ट्र मंत्र प्रभावी||६||
( - शिवसूर्यहृदय )
खरोखर, महाराज म्हणजे तीर्थ शिवराय.. देव शिवराय..
भाग्य महाराष्ट्राचे शिवराय....
प्रत्येकाच्या मनामनातील दैवत आहेत छत्रपती श्रीशिवराय. केवळ DJ, lights, गाणी, धांगडधिंगा, जल्लोष, मिरवणुका, पुतळे आणि महाराजांसारखं केवळ बाह्य स्वरूप धारण करण्या इतकीच आपली 'शिवभक्ती' सीमित राहायला नको.
छत्रपती श्रीशिवरायांच्या पराक्रमाच्या कथा, एकन् एक प्रसंग, त्यातील महाराजांचे आणि मावळ्यांचे अनेक गुणविशेष यांचे लहानांपासून थोरांपर्यंत सर्व स्तरात वारंवार चिंतन - अवगाहन, आचरण होणे तितकेच आवश्यक. सोबतीने धर्मकार्यासाठी उपयुक्त असे शरीरसौष्ठव प्राप्त करून राष्ट्रसेवेसाठी - शिवकार्यासाठी सदा समर्पित राहण्याचा संकल्प करणे, हीच पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त त्यांच्या चरणी खरी आदरांजली...🙏🏻🙏🏻🌹🌹🚩