05/08/2026
ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्या 'आनंदी शिक्षण' प्रकल्पांतर्गत सांगली येथे दोन दिवसीय फॅसिलेटर प्रशिक्षण यशस्वी
सांगली, दि. ३ ऑगस्ट : ग्रामीण व वंचित पार्श्वभूमीतील मुलांमध्ये मूलभूत साक्षरता, गणितीय कौशल्ये, भाषा विकास आणि शिकण्याची आवड निर्माण करण्यासाठी ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांनी विकसित केलेल्या 'आनंदी शिक्षण' प्रकल्पाच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यात कार्यरत फॅसिलेटर्ससाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. २ व ३ ऑगस्ट रोजी महात्मा गांधी वाचनालय, सांगली येथे करण्यात आले.
हे प्रशिक्षण ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये सेवाध्यास फाउंडेशन, सांगली आणि विद्योदय मुक्तांगण, इचलकरंजी या संस्थांमार्फत कार्यरत असलेल्या एकूण १५ फॅसिलेटर्सनी सहभाग घेतला. या फॅसिलेटर्सद्वारे तासगाव, सांगली आणि इचलकरंजी परिसरातील विविध केंद्रांमध्ये आनंदी शिक्षण प्रकल्प राबविला जात आहे.
प्रशिक्षणाचे उद्घाटन वुमन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. लताताई देशपांडे आणि ज्येष्ठ विधिज्ञ व करसल्लागार श्री. किशोर लुल्ला यांच्या हस्ते झाले. समारोप प्रसंगी श्री. प्रकाश कराळे उपस्थित होते. या वेळी ज्ञानप्रबोधिनीचे कार्य सांगलीमध्ये पोहोचविण्यासाठी योगदान देणारे अॅड. शैलेंद्र केळकर यांचीही उपस्थिती लाभली.
दोन दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये फक्त अध्यापन पद्धतीवर भर न देता, "फॅसिलेटर हा मुलांच्या शिकण्याचा प्रवास घडवणारा मार्गदर्शक आहे" या संकल्पनेवर आधारित विविध अनुभवाधारित सत्रांचे आयोजन करण्यात आले.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी सहभागींची ओळख, समूहनिर्मिती आणि प्रेरणादायी पद्यांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्यात आली. त्यानंतर संवाद कौशल्य आणि प्रभावी गोष्ट सांगण्याचे कौशल्य या विषयांवर सत्र घेण्यात आले. मुलांशी विश्वासाचे नाते कसे निर्माण करावे, गोष्ट निवडताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात आणि गोष्टीच्या माध्यमातून मूल्ये, भाषा आणि विचारशक्ती कशी विकसित करता येते याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर मूलभूत साक्षरतेतील गणित या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले. गणितातील मूलभूत संकल्पना, विचारशक्ती (Thinking Skills), शाब्दिक गणिते, कृतीआधारित गणित आणि मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्याच्या विविध पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.
दिवसाच्या शेवटच्या सत्रात चित्रभाषा या प्रभावी अध्यापन साधनाद्वारे मुलांचे निरीक्षण कौशल्य, वाचनपूर्व तयारी, लेखनपूर्व कौशल्ये आणि भाषिक अभिव्यक्ती कशी विकसित करता येते, याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.
दुसऱ्या दिवशी एकाच वर्गात विविध स्तरांवरील मुलांसोबत अध्यापन या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याच्या वेगवेगळ्या पातळ्या लक्षात घेऊन अध्यापनाचे नियोजन कसे करावे, मागे पडलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात कसे आणावे आणि सक्षम गटाची उभारणी कशी करावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर अक्षर पायऱ्या या संकल्पनेद्वारे मुलांना टप्प्याटप्प्याने वाचन आणि लेखनाकडे कसे नेले जाते याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
प्रशिक्षणातील सर्वाधिक सहभागात्मक सत्रामध्ये प्रत्येक फॅसिलेटरने पद्य, गाणी, गोष्टी आणि खेळ यांचा वापर करून प्रत्यक्ष अध्यापनाचे सादरीकरण केले. या माध्यमातून आनंदी वातावरणात शिक्षण कसे घडवावे, मुलांचा सक्रिय सहभाग कसा वाढवावा आणि शिकणे अधिक परिणामकारक कसे करावे याचा अनुभव सहभागीांना मिळाला.
शेवटच्या सत्रामध्ये सराव पत्रकांचा प्रभावी वापर, अध्यापन नियोजन, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे निरीक्षण आणि केंद्रनिहाय कृती आराखडा तयार करण्यावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक फॅसिलेटरने आपल्या केंद्रासाठी पुढील कामाचे नियोजन तयार केले.
या प्रशिक्षणामध्ये संवाद कौशल्य व चित्रभाषा या विषयांवर सुरज रसाळ, मूलभूत गणित या विषयावर जयंत पाठक, सक्षम गट व्यवस्थापन व अक्षर पायऱ्या या विषयांवर सचिन खारवे, पद्य, गाणी, गोष्टी व खेळ या सत्रामागील शैक्षणिक उद्दिष्टे स्पष्ट करून सराव पत्रके व नियोजन या विषयावर सुरज रसाळ यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी सहभागी फॅसिलेटर्सनी आपले अनुभव मांडले. प्रशिक्षणातून मिळालेल्या नव्या संकल्पना, कृतीआधारित अध्यापन पद्धती आणि मूलभूत साक्षरतेसाठी आवश्यक कौशल्यांचा आपल्या केंद्रांमध्ये प्रभावी वापर करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
ज्ञानप्रबोधिनीच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला 'आनंदी शिक्षण' उपक्रम हा केवळ मुलांना शिकविण्यापुरता मर्यादित नसून, त्यांच्या शिकण्यातील आनंद, आत्मविश्वास, भाषिक विकास, गणितीय विचारशक्ती आणि सामाजिक कौशल्यांचा सर्वांगीण विकास घडविणारा उपक्रम आहे. या प्रशिक्षणामुळे सांगली जिल्ह्यातील विविध केंद्रांमध्ये कार्यरत फॅसिलेटर्सना एकसमान दर्जाचे प्रशिक्षण मिळाले असून, त्याचा थेट लाभ शेकडो विद्यार्थ्यांना होणार असल्याचा विश्वास प्रशिक्षणाच्या समारोपावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेवाध्यास फाउंडेशन, विद्योदय मुक्तांगण, सहभागी संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि सर्व फॅसिलेटर्स यांचे सहकार्य लाभले. प्रशिक्षणासाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल महात्मा गांधी वाचनालय, सांगली यांच्या पदाधिकाऱ्यांचे ज्ञानप्रबोधिनीतर्फे आभार मानण्यात आले.
#ज्ञानप्रबोधिनी ERC Jnana Prabodhini Pallavi Sane-Paradkar