05/01/2024
आज पर्यंत आपल्या कट्ट्यावर अनेक प्रथितयश, उदयोन्मुख, पूर्वायुष्यात खूप कष्टांनी कीर्तिमंत झालेले असे अनेक कलाकार, आपले अनुभव, आपली कला सादर करून गेले. आज आपल्या कडे आलेल्या स्नेहल दामले, हे एक अनोखे व्यक्तिमत्त्व आहे. स्नेहल ताई गाण्याच्या कार्यक्रमात असतात पण गायिका नाहीत. नृत्याच्या कार्यक्रमात स्टेजवर येतात पण नृत्यांगना नाहीत. थोर सामाजिक, राजकीय वक्त्यांबरोबर, नट नट्यांबरोबर स्टेजवर पोडियमच्या मागे उभ्या असतात पण वक्ता नाहीत आणि नटी सुद्धा नाहीत. मग आता सगळ्यांना प्रश्र्ण पडला ना? ह्या आहेत तरी कोण?
त्या आहेत वीस वर्षांपूर्वी, आयुष्यात एक अनोखा प्रवास सुरू केलेल्या विविध कार्यक्रमांचे संचालन करण्यात वाकबगार अशा सूत्र संचालक/निवेदक. त्या स्वतःच स्वतःला भाग्यवान म्हणतात कारण या क्षेत्रात येण्यासाठी त्यांना कोणाचाही कधीच कुठल्याच प्रकारे विरोध झाला नाही. छोटसं गाव सातारा जिल्ह्यातील जामगाव. त्यातील भोळी भाबडी माणसं आणि गावाची लाडकी झालेल्या या आपल्या ताईंचं त्या सगळ्यांना खूप कौतुक. आहेच ही ताई सर्वगुण संपन्न. मग विरोध का करायचा?
सातारा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांपैकी कोणाच्या तरी लग्नासाठी माननीय शिवेंद्र महाराज आणि उदयन राजे भोसले येणार होते. दोघंही सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. त्यांच्या स्वागतासाठी म्हणून, या लग्नात, ताईंना निवेदिकेचे काम दिले गेले. दोघांचं आगत स्वागत करून झालं. लगेच निघून जाणं योग्य नाही. लग्न लागेपर्यंत थांबायचे म्हणून ताई एका बाजूला मोबाईल वर काही बघत उभ्या होत्या. तेवढ्यात एक गावकरी त्यांना शोधत ओरडत आला. त्यनी ताईंनाच विचारलं, 'त्या पुकारणाऱ्या बाई कुठे गेल्या? आहेराची नावे पुकारायला स्टेजवर जायचं आहे.' ताईंनी हे ऐकलं. 'बापरे! म्हणजे मी फक्त पुकारणारी बाई. एवढीच माझी किंमत?' आणि त्या क्षणी ताईंनी तिथल्या तिथे ठरवलं 'लग्न मुंज सारख्या कार्यक्रमात निवेदन करण्याच्या या कामावर कायमची फुली. मला पुकारणारी बाई व्हायचच नाही.' त्यांनी हा नियम आतापर्यंतच्या आयुष्यात अगदी काटेकोर पणे पाळला आहे.
एकदम पटलं ना हे? बरोबरच आहे. इतकं चांगलं काम करणारी मोठमोठ्या श्रेष्ठ व्यक्तींमधे वावरणारी ही ताई. पुकारणारी बाई कशी होईल?
कितीही शिस्तबद्ध असला तरी ऐनवेळी स्टेजवर काहीही गडबड होऊ शकते. ती टाळण्यासाठी कुठलाही कार्यक्रम सूत्र निवेदनाशिवाय यशस्वी होत नाही. कार्यक्रमाचा धागा इकडचा तिकडे होऊ न देता योग्य मार्गावर कार्यक्रम नेण्यात यशस्वी झालेल्या आपल्या ताई एकदम नावाजलेल्या संचालक आहेत. ही हुशारी त्यांच्यात जन्मजात आहे. पण ती काही कौटुंबिक वारसामुळे नाही स्वकष्टार्जित आहे. सातारा जिल्ह्य़ातील एका छोट्याशा शाळेत शिकलेली शेतकरी कुटुंबातील मुलगी गौरी शिक्षकी पेशाच्या कुटुंबात स्नेहल बनून आली. तिच्या कष्टांबरोबर घरातील सर्वांचं पाठबळ आणि कितीही वेळा माती खावी लागली तरी कामाबद्दलची तिच्या मनातील खरी आवड तिच्या बरोबरच होती. खूप नोकऱ्या सोडल्या पण तिने ह्या कामावरचं प्रेम कधीच सोडलं नाही. वेगवेगळे कार्यक्रम तिला मिळत गेले. उमेदवारीच्या काळात अनेक अडथळे पार करत ती ते काम यशस्वीपणे करत राहिली.
एवढ्यासाठी यशस्वीपणे म्हणाले, कारण कार्यक्रम कुठलाही असेल तो पूर्णपणे व्यवस्थित बसल्याशिवाय प्रत्यक्ष सादर केला जात नाही. एवढं करूनही आयत्या वेळेस काही तरी गडबड होतेच, अडचणी येतातच. त्यांच्यावर मात करून कार्यक्रम सुरळीतपणे एका लयीत कुठेही कंटाळवाणा होणार नाही अशी काळजी घेत, तो पुढे नेणे ही संचालकाची/निवेदकाची जबाबदारी. निवेदकाने नेहमी कमीतकमी शब्दात कार्यक्रम रसभरीत करून तो कंटाळवाणा कसा होणार नाही ही काळजी घयायची असते. ताईंनी नेहमीच हे काम समर्थपणे पार पाडले. उमेदवारीच्या काळात खूप वेळा पाय खेचणारे निराश करणारे अपमानित व्हावे लागणारे अनुभव आले. आता पुकारणारी बाई अजिबात व्हायचे नव्हते. त्यामुळेच ताईंनी ठरवले, वाढदिवस लग्न मुंजी सारखे खासगी कार्यक्रम घेणे पूर्ण बंद. मोठमोठ्या राजकीय कार्यक्रमात सुद्धा त्यांना असे अनेक अनुभव आले. त्यांनी अनेकदा या कार्यक्रमांवरही फुली मारायचं ठरवलं होतं.
पण मा. अजीतदादा पवारांच्या कार्यक्रमासाठी काही त्यांना नाही म्हणताच आलं नाही. वाईट माती चारणारे असे खूप सारे अनुभव आले तरी ताईंनी कधीही हार मानली नाही. आपण नेहमी म्हणतो केलेलं चांगलं काम आवश्यक ठिकाणी पोचतच पोचतं आणि त्याची पोचपावती सुद्धा कधी ना कधी मिळतेच. तसंच झालं. सात पिढ्या अनुभवतील, कौतुकाने मिरवतील असा त्यांच्या कामाचा प्रसाद ताईंना मिळाला. स्वप्नातही विचार येणार नाही अशी संधी त्यांच्याकडे फोनवरून चालत आली. आपले परम आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या कार्यक्रमाचे संचालन ताईंना मिळाले. दस्तुरखुद्द ताईंच्या तोंडून सगळं वर्णन ऐकतांना आपल्या सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तर मग प्रत्यक्ष अनुभवतांना स्वतः ताईंना काय वाटलं असेल? फोनवरून हा कार्यक्रम मिळणार, हे ऐकल्यावर ताईंचा ऊर अभिमानाने आणि डोळे आनंदाने भरून आले. कार्यक्रमाच्या दिवशी वेगळ्याच अडचणी आल्या. अनेक प्रोटोकाॅल सांभाळण्यात आयत्या वेळी आलेल्या अडचणींवर मात करून मित्र मैत्रिणींकडून मिळवलेला जामानिमा करून ताई दोन तास आधी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर होत्या.
परंतू एक क्षण असा आला की, स्टेजवर जाण्याऐवजी आता सगळा कार्यक्रम नुसताच बॅरिकेड पलीकडे बसून बघावा लागेल की काय अशी भीति निर्माण झाली. दुपारचे दोन वाजले तरी ताईंचं आयकार्ड त्यांच्या हातात आलं नाही. प्रोटोकाॅल प्रमाणे स्टेजवर जाण्यासाठी ते आवश्यकच होतं. गळ्यात ते असल्या शिवाय बॅरिकेडच्या आत प्रवेशच मिळत नाही. आता काय करावं. संतापून चालणार नव्हतं आणि निराशेने गालावर ओघळणारे अश्रू, भर सभेत असल्यामुळे, महत्प्रयासाने आडवावे लागले होते. अगदी शेवटच्या क्षणी आयकार्ड हातात आलं आणि मा. मोदीजी पोचायच्या काही क्षण आधी ताई स्टेजवर हजर झाल्या. हा कार्यक्रम इतका यशस्वी झाला की पंतप्रधान मोदीजींबरोबर आणखी चार ऑनलाईन कार्यक्रम ताईंना मिळाले. हा कार्यक्रम म्हणजे ताईंना मिळालेली एक मोठ्ठी सुवर्ण ढाल आहे. या यशाचं कौतुक त्यांच्या मामंजींनी मुद्दाम केलेल्या एका छोटेखानी कौटुंबिक पार्टीत रुपये एक लाखाचा धनादेश देऊन केलं. हा सगळा चित्त थरारक अनुभव प्रत्यक्ष स्नेहल ताईंच्या तोंडून ऐकायला मिळाला.
एखाद्या मैत्रिणीशी बोलावं तसं त्यांच्याशी बोलायला मिळालं. शेजारी उभं राहून त्यांच्या बरोबर फोटो काढता आले खूप छान वाटलं.
Thank you ताई.
शैलजा फाटक
स्नेहधाम उर्जा कट्टा
आपटे रोड
कोहीनूर एक्झीक्यूटीव शेजारी