31/10/2023
*मुक्ती कोन पथे?*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर*
भाग ७
अस्पृश्यांतील संघटना आणि धर्मांतर
अस्पृश्यतानिवारणाची आज जी चळवळ चालू आहे त्या चळवळीवर अशी टीका करण्यात येते की, अस्पृश्यवर्गात ज्या निरनिराळ्या जातींचा समावेश झालेला आहे, जातीत परस्परांतील व्यवहारामध्ये जातिभेद पाळण्यात येतो, नव्हे अस्पृश्यता पाळण्यात येते. महार-मांग एकमेकांच्या हातचे खात नाहीत. दोघेही भंग्यासारख्या जातीला शिवत नाहीत व त्यांच्याशी अस्पृश्यता पाळतात. परस्परांत जातिभेद व अस्पृश्यता पाळणाऱ्या लोकांना वरच्या जातींना 'तुम्ही जातिभेद मोडा, अस्पृश्यता मानू नका.' असे म्हणण्याचा काय अधिकार आहे, असा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो. तुम्ही आपसातील जातिभेद व अस्पृश्यता नाहीशी करा, मग आमच्याकडे दाद मागण्यास या, असा साळसूदपणाचा सल्ला त्यांना देण्यात येत असतो. या टीकेच्या मुळाशी असलेल्या कथेत सत्य आहे हे आपल्यापैकी सर्वांना कबूल करावे लागेल. पण त्या टीकेत केलेला आरोप मात्र खोटा आहे. अस्पृश्य वर्गात समाविष्ट झालेले लोक जातिभेद पाळतात व काही अस्पृश्यता पाळतात या गोष्टीचा इन्कार करता येणे शक्य नसते. या गोष्टी मान्य करणे प्राप्त असले तरी या अपराधाला ते कारणीभूत आहेत असे म्हणणे निखालस खोटे आहे. जातिभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम वरिष्ठ वर्गाच्या हिंदूच्या हातून झालेला आहे. जातिभेदाचा व अस्पृश्यतेचा पायेडा त्यांनी पाडला आहे. जातिभेद व अस्पृश्यता पाळण्याचा धडा वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी घालून दिलेला आहे. ही गोष्ट जर सत्य असेल तर जातिभेदाच्या व अस्पृश्यतेच्या रूढीची जबाबदारी स्मृश्य वर्गावरच पडते, अस्पृश्य वर्गावर ती पडू शकत नाही. अस्पृश्य वर्गाचे लोक जातिभेद व अस्पृश्यता पाळताना वरच्या लोकांनी दिलेला धडा गिरवीत आहेत. तो धडा जर खोटा आहे तर त्याचे पाप ज्यांनी तो धडा दिला त्यांच्यावरच येऊन पडते, ज्यांनी गिरवला त्यांच्यावर येऊन पडू शकत नाही. हे उत्तर जरी समर्पक असले तरी त्या उत्तराने माझे स्वतःचे समाधान होऊ शकत नाही. ज्या कारणामुळे अस्पृश्यता व जातिभेद हो आपल्यामध्ये शिरली त्या कारणाला आपण जरी जबाबदार नसलो, तरी आपल्यामध्ये जो जातिभेद व जी अस्पृश्यता नांदत आहे तिचा धिक्कार न करणे, ती आहे तशीच चालू देणे आपल्याला इष्ट नाही. अस्पृश्यतेचा व जातिभेदाचा शिरकाव करण्यास जरी आपण जबाबदार नसलो तरी ती घालविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ही जबाबदारी आपण सर्वांनी ओळखली आहे याबद्दल मला समाधान वाटते. माझी खात्री आहे की, महार जातीत असा कोणीही पुढारी नाही की, जो जातिभेद पाळावा असे म्हणतो. तुलनाच करावयाची झाली तर ती पुढाऱ्यांमध्येच केली पाहिजे. महारांतील 'शिकला-सवरलेला वर्ग जर घेतला आणि ब्राह्मणातील शिकला-सवरलेला वर्ग घेतला व दोहोंची तुलना जर केली तर अस्पृश्य वर्गातील सुशिक्षित वर्ग जातिभेद मोडण्याला जास्त अनुकूल आहे ही गोष्ट कोणासही कबूल करावी लागेल. इतकेच नव्हे, तर ती गोष्ट कृतीनेही सिद्ध करून देता येईल. महारांतील सुशिक्षित वर्गच या सुधारणेला अनुकूल आहे. इतकेच नव्हे, तर महारांतील अडाणी जनतादेखील या गोष्टीला अनुकूल आहे हे सिद्ध करून देता येईल. आज महारांमध्ये एकही मनुष्य सापडणार नाही की, जो महारा-मांगात रोटीव्यवहार व बेटीव्यवहार व्हावा याच्याविरुद्ध असेल! आपल्यातील जातिभेद मोडण्याची आवश्यकता तुम्ही ओळखता या गोष्टीबद्दल मला मोठे समाधान वाटते व मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो. परंतु अस्पृश्यांतील जातिभेद मोडण्याचा प्रयत्न कसा यशस्वी करता येईल, याचा तुम्ही विचार केला आहे काय? सहभोजने केल्याने किंवा क्वचितप्रसंगी सहविवाह केल्याने जातिभेद मोडू शकत नाही, जातिभेद ही एक मानसिक स्थिती आहे. कारण हिंदू धर्माची ही शिकवण आहे. आपण जातिभेद पाळतो, अस्पृश्यता पाळतो याचे मुख्य कारण ज्या हिंदू धर्मात आपण आहोत तो धर्म तसे करावयास सांगतो. वस्तू कडू असेल तर ती गोड करता येईल, खारट असेल, तुरट असेल तर तिची रुची बदलता येईल, पण विषाचे अमृत करता येणार नाही. हिंदू धर्मात राहून जातिभेद नष्ट करू असे म्हणणे म्हणजे विषाचे अमृत करू असेच म्हणण्यासारखे आहे.
अर्थात ज्या धर्मात माणसाची घाण माणसाने मानली पाहिजे अशी शिकवण देण्यात येत आहे, त्या धर्मात आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपल्या मनातील जातिभेदाची भावना कदापि नष्ट होणार नाही. अस्पृश्यांतील जातिभेद व अस्पृश्यता नाहीशी करावयाची असल्यास त्यांनी धर्मांतर करणे हा एकच रामबाण उपाय आहे.