07/01/2025
🚩प्राचीन भारताचे प्रभावी व्यवस्थापन🚩
अनेक ठिकाणी मला भारतीय ज्ञान परंपरेवर बोलायला जावं लागतं. त्या प्रत्येक ठिकाणी मी प्रोफेसर अंगस मेडिसन यांचा आवर्जून उल्लेख करतो. या ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञाने, जागतिक अर्थव्यवस्थेवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. या पुस्तकात त्यांनी अनेक संदर्भ देऊन, आकडेवारीने हे सिद्ध करून दाखवलंय की भारत हे एकेकाळी जगातलं सर्वात श्रीमंत राष्ट्र होतं. जगाच्या एकूण व्यापाराचा एक तृतीयांश व्यापार, भारतीय करायचे आणि जगाच्या संपत्तीच्या तीस टक्क्यांपेक्षा जास्त संपत्ती ही एकट्या भारताजवळ होती.
विदेशी आक्रांता भारतात येण्यापूर्वी आपण किती संपन्न आणि समृद्ध होतो, याचा हा खणखणीत पुरावा आहे.
हे सर्व वाचताना एक लहानसा प्रश्न पडतो. आपण जगात सर्वात जास्त व्यापार करायचो. आपली जहाजं ही अक्षरशः लॅटिन अमेरिकेपर्यंत जायची. आपल्या वस्तूंचा दर्जाही उच्च कोटीचा होता. आपण तयार करत असलेली वस्त्रं विकत घ्यायला देशोदेशींच्या राजे - महाराजांच्या उड्या पडायच्या. आपण मानवी कौशल्य थक्क होईल अशी मंदिरं, महाल आणि राजप्रासाद बांधले. अत्यंत सुरेख असे जगातले सर्वात मोठे प्रार्थना स्थळ (अंगकोर वाट हे मंदिर) उभारले. अनेक धातूंचा शोध लावला. तंत्रज्ञानात आघाडी घेतली.
मग आपण हे सर्व 'मॅनेज' कसं करत असू..?
आपल्या पूर्वजांनी व्यवस्थापनाचं (मॅनेजमेंटचं) अधिकृत शिक्षण घेतलं होतं का? की पूर्वी तक्षशिला, आणि नंतर नालंदा, उड्डयंतपुर सारख्या विद्यापीठांमधून व्यवस्थापन (प्रबंधन) हा विषय शिकवायला होता ? असे अनेक प्रश्न. अत्यंत काटेकोर, चोख, उत्कृष्ट असं काम आपण केलं, हे तर नक्की. मग हे कसं करता आलं? आज जसं 'बिझिनेस स्कूल' किंवा 'मॅनेजमेंट इंस्टीट्यूट्स' मधून शिकून आलेलेच तरुण-तरुणी काम सांभाळू शकतात, चांगल्या प्रकारे कंपनी चालवू शकतात, तसंच त्या काळात काही होतं का?
एक मात्र नक्की की प्राचीन शिक्षण पद्धती बद्दल जी काय माहिती मिळाली आहे, त्यात व्यवस्थापन (प्रबंधन) असे वेगळे विषय नव्हते. व्यवस्थापन शिकवणाऱ्या वेगळ्या संस्था नव्हत्या. आणि तरीही आपले पूर्वज, जगात भव्य-दिव्य असं साकारत होते. त्या काळातली सर्वात मोठी गलबतं, जहाजं तयार करून इतर देशांना विकत होते. नवनवीन शोध लावत होते. आणि चोख व्यापारही करत होते.
हे ते कसं करत होते, हे समजून घ्यायचं असेल, तर आजचा 'मॅनेजमेंटचा' चष्मा काढून त्या संपूर्ण प्रक्रियेला बघायला हवं.
त्या काळात 'व्यवस्थापन' हा विषय म्हणून सरळ - सरळ शिकवला जात नव्हता. व्यवस्थापनाच्या सर्व गोष्टी या अप्रत्यक्षपणे, परंतु अत्यंत प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या.
यात 'उपनिषद' हे एक महत्त्वाचं माध्यम होतं. किमान ४,००० ते ७,००० वर्षांपूर्वी, आपल्या पूर्वज ऋषी-मुनींनी साधारण १०८ उपनिषदं लिहिली. यातील १० प्रामुख्याने शिकली जायची / शिकवली जायची. आज आपण उपनिषद, गीता, भागवत वगैरे गोष्टी म्हणजे निवृत्ती नंतर अभ्यासाच्या धार्मिक गोष्टी, असं समजतो. पण पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी धर्माचा अर्थही वेगळा होता. कर्मकांड कमी होती. एक चांगली, उच्च आदर्शांनी प्रेरित असलेली उदात्त जीवनशैली म्हणजेच धर्म होता. मुलं - मुली शिकायला गुरुकुलात जायची. तिथेच त्यांची ओळख उपनिषदांशी करून दिल्या जायची. उपनिषद म्हणजे क्लिष्ट संकल्पनांचं 'बोअरिंग' बाड नव्हतं, तर गोष्टी वगैरे असलेले, लहान - लहानसे ग्रंथ होते. मात्र त्यातून मिळालेला संदेश, ही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा असायची.
आधुनिक 'मॅनेजमेंट'चं वारं हे प्रामुख्याने अमेरिकेतून सुरू झालं. अमेरिका हा तसा पूर्णपणे व्यापारी देश. त्या देशाची मूळ संस्कृती, तिथल्या 'नेटिव्हांची' संस्कृति, ही युरोपातून आलेल्या लोकांनी पार गाडून टाकली. त्यामुळे युरोपातून, व्यापारात बंपर फायदा मिळवायला निघालेल्या लोकांचा मंत्र हा 'पैसा' असणार, हे स्वाभाविकच होतं. म्हणून, अमेरिकेत, 'मॅनेजमेंट' मध्ये ज्या कोणाला थोडंफार यश मिळतं, त्या लोकांच्या मागे अमेरिकन समाज मेंढरांसारखा धावतो.
साठ - सत्तर च्या दशकात अमेरिकेत 'डेल कार्नेगी' च्या व्यवस्थापन पद्धतीची लाट होती. त्याची How to Win Friends and Influence People सारखी पुस्तकं लाखोंनी खपत होती. ट्रांजेक्शन अनॅलिसिस (TA), I am Ok, You are Ok, अगदी आताचे शिव खेडा... ही सर्व मंडळी आणि त्यांच्या व्यवस्थापनाच्या पद्धती, त्या - त्या काळात खूप गाजल्या. त्या सर्व मंडळींनी मानवी स्वभावाच्या कंगोऱ्यांना खूप महत्त्व दिलंय.
गंमत म्हणजे या सर्व गोष्टी, अगदी वेगळ्या पद्धतीने, आपल्याकडे चार-सहा हजार वर्षांपूर्वीच ऋषि-मुनींनी लिहून ठेवल्या आहेत.
या सर्व उपनिषदांचा किंवा गीतेतील शिकवणीचा आधार हा 'नैतिकता' किंवा 'सचोटी' आहे. सचोटी हे फक्त आदर्श तत्व नव्हतं, की जे आदर्श तर आहे, पण व्यवहारात शक्य नाही. नैतिकता, सचोटी ही जीवनमूल्यं होती. त्यामुळे व्यापारात आणि व्यवहारात लबाडीला स्थान नव्हतं.
मांडुक्य उपनिषदातला शांतीमंत्र आहे -
ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः।
भद्रं पश्येमाक्षभि: यजत्राः।।
अर्थात, जे मंगलकारी आहे, कल्याणकारी आहे, तेच आमच्या कानांवर पडू देत. आमचे कान, आमचे मन नेहमी निर्मळ राहो. यात 'यजत्रा' हा शब्द वापरला आहे. यजत्रा म्हणजेच यज्ञ करणारे लोक. मात्र उपनिषदकार सांगतात, अग्नीकुंडात अग्नी प्रज्वलित करून जे करतात, तोच फक्त यज्ञ नाही. यज्ञ हा बुद्धीचा हवा. ज्ञानाचा हवा. कर्माचा हवा. आम्हाला समज आल्यानंतर, समाज कल्याणसाठी जे काय करतो तो यज्ञ..!
किती स्पष्ट सांगितलंय...
मुंडकोपनिषदात एक श्लोक आहे -
सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः I
क्रमंत्यृषयो ह्याप्तकामो यत्र तत्सत्यस्य परमं निधानम् II
अर्थात, नेहमी सत्याचाच विजय होतो. मिथ्या किंवा असत्य हे कधीच जिंकू शकत नाही. आपण २६ जानेवारी १९५० ला, या श्लोकातील 'सत्यमेव जयते' ला आपल्या देशाचं घोषवाक्य किंवा आदर्श वाक्य म्हणून जाहीर केलं आहे.
नारायण उपनिषदाच्या चौदाव्या मयूरवात एक श्लोक आहे -
धर्म इति धर्मेण सर्वमिदं परिगृहीतम् I
धर्मांन्नातिदुशाश्चरं तस्माध्दर्मे रमन्ते II ६II
यात सांगितलंय की स्वधर्माचं आचरण हे अतिशय उत्तम असं साधन आहे. सदाचार, संन्नीती, सचोटी ही सर्व धर्माची अंग आहेत. शास्त्रावर श्रद्धा असणं हा धर्माचा प्राण आहे.
या सर्व गोष्टी गुरुकुलाच्या माध्यमातून, विद्यापीठातून, घरातील संस्कारातून खालपर्यंत झिरपत गेल्याने, प्रामाणिकपणा,सचोटी ही आवश्यक अशी जीवनमूल्यं होती. या सर्वांचा प्रभाव व्यापारातही दिसायचा. आणि म्हणूनच जगभरातले ग्राहक, राजे-राजवाडे, व्यापारी हे भारतीयांवर डोळे झाकून विश्वास ठेवायचे. भारताचा व्यापार, वस्तूंच्या गुणवत्ततेमुळे तर भरभराटीला आलाच, पण त्याला अजून एक महत्त्वाची जोड होती, आणि ती म्हणजे प्रामाणिकपणाची, विश्वासाची..! आजच्या व्यवस्थापनाच्या भाषेत 'इथिकल कोड ऑफ कंडक्ट'.
ईशवास्योपनिषदातला दुसरा श्लोक आहे-
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः।
एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ॥
या श्लोकाचा अर्थ असा आहे, की कोणाही व्यक्तीला जर या धरातलावर शंभर वर्ष जगायचं असेल, तर त्याने कर्म करत राहिलं पाहिजे. ती व्यक्ती, कार्यमग्न असायला हवी. आणि कर्म ही कसं ? तर 'कुर्वन्नेवेह'. अर्थात निश्चित ठरलेलं कार्य आणि तेही चांगल्या प्रकारे करायचं.
याच उपनिषदातला पुढला श्लोक आहे-
असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाSSवृता:।
तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जना:।।
म्हणजे जे चांगल्या प्रकारे काम करत नाहीत, जे कुशलतेने काम करत नाहीत, ते 'असूर्य' लोकात जातात. अंधकारात जातात. अर्थात नरकात जातात !
कामाचं आणि कष्टाचं महत्त्व सांगण्यासाठी श्वेताश्वतर उपनिषदात (ब्राह्मोपनिषदात) पहिल्या अध्यायात एक श्लोक आहे -
तिलेषु तैलं दधनीव सर्पिरापः स्त्रोतः स्वरणीषु चाग्निः ।
एवमात्मात्मनि गृह्यतेऽसौ सत्येनैनं तपसा योऽनुपश्यति ॥
तिळामध्ये तेल असते, पण ते काढण्यासाठी तिळाला घाण्यात घालून ते पिळून काढावे लागते. दह्यातून तूप मिळवण्यासाठी दही घुसळून, लोणी काढून ते कढवावे लागते. अरणीचे मंथन करून अग्नी चेतवावा लागतो. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या पोटात पाणी निश्चित असते. मात्र त्यासाठी खोल खणावे लागते. कधी लवकर पाणी लागते, तर कधी खडक, दगड लागले तर त्यांना फोडावे लागते.
एकुणात काय, कष्ट करत राहिले पाहिजे. यश नक्कीच मिळेल.
ही सर्व तत्वं, प्राचीन काळी गुरुकुलांमधून मुला-मुलींवर बिंबवली जायची. कार्यमग्न रहा आणि जे काय विहित काम आपल्या वाटेला आलेलं आहे, ते अत्यंत कौशल्याने करा. आणि म्हणूनच आपण 'परफेक्शनिस्ट' होतो. परिपूर्णतावादी होतो. त्यामुळेच आपले पूर्वज, कैलास लेण्यात कोरलेलं शिल्प साकारू शकले. लोहस्तंभातलं अद्भुत असं धातूकाम करू शकले. गणितीय संकल्पना मांडू शकले... असं बरंच काही.
(दुर्दैवानं इस्लामी आक्रांता आल्यानंतर, त्या कर्म सिद्धांतातली परिपूर्णता हळूहळू नाहींशी झाली. अन् आपल्यावर भोंगळ, निकृष्ट दर्जाचे सामान बनवणारे यासारखे शिक्के मारल्या गेले).
व्यवस्थापन शास्त्रात मानवी मनाचा फार सूक्ष्मतेने विचार केला जातो, कारण व्यवस्थापन हे शेवटी मानवी व्यक्तींद्वारेच राबवायचे असते. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर, जगभरात व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पद्धतींवर प्रभाव जाणवतो तो पीटर ड्रकर (Peter Drucker) यांचा. त्यांचा मुख्य सिद्धांत आहे - 'मॅनेजमेंट इज अबाउट ह्यूमन बिईंग'. आपल्या उपनिषदकारांनी या सर्व गोष्टींचा विचार, अक्षरशः सहा-सात हजार वर्षांपूर्वी करून ठेवलेला आहे.
केनोपनिषद आणि श्वेताश्वतर उपनिषदातला शांतीमंत्र आहे -
ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै ।
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ।।
साधारणत: अनेक घरांमध्ये हा 'भोजन मंत्र' या अर्थाने जेवणापूर्वी म्हटल्या जातो. याचा अर्थ आहे, 'आम्हा दोघांचे रक्षण करा. आम्हा दोघांचे पोषण करा.' हे 'दोघं' कोण आहेत? तर आपली दोन मनं. गुरु आणि शिष्य. कधी आपलं एक मन गुरु होतं, तर दुसरं त्याचा शिष्यत्व पत्करतं. तर कधी उलट होतं. अनेकदा आपल्या मनात अंतर्द्वंद्व चाललेलं असतं. हे करू, की नको करू? शेक्सपियरच्या भाषेत, To be or Not to be.
उपनिषदकारांच्या मते या दोनही मनांचं व्यवस्थित पोषण होणं आवश्यक आहे. आणि त्यातूनच I am Ok, You are Ok ही भावना निर्माण होईल. जर I am Ok, You are Not Ok ही भावना बळवली, तर आपल्यात श्रेष्ठत्वाची भावना, अहंगंड (Superiority Complex) येईल. जर I am Not Ok, You are Ok ही भावना बळवली, तर आपल्यात न्यूनगंड (Inferiority Complex) निर्माण होईल. जर I am Not Ok, You are Not Ok ही भावना निर्माण झाली, तर ती पूर्णतः नकारात्मक होईल. यातून काहीच कर्म होणार नाही. आणि म्हणूनच, I am Ok, You are Ok ही भावना निर्माण होणं आवश्यक आहे, ज्याद्वारे आपण समान पातळीवरून लोकांशी संवाद साधू शकू.
व्यवस्थापनाचं हे महत्त्वाचं तत्व, डॉक्टर थॉमस ए हॅरिस एमडी यांनी सन १९६७ मध्ये मांडलं. ते अक्षरशः जगभरात गाजलं. त्यांचं I am Ok, You are Ok हे पुस्तक आजही तुफान विकलं जातंय. मात्र आपल्या उपनिषदांमध्ये, आजपासून सहा - सात हजार वर्षांपूर्वी, हे सूत्र व्यापक स्वरूपात मांडलेलं आहे.
व्यवस्थापनासाठी जी मूलभूत तत्वं आवश्यक असतात, ती उपनिषदांमध्ये सविस्तर सांगितलेली आहेत. उदाहरणार्थ - एकाग्रता. एकाग्रता असली की अनेक असाध्य गोष्टीही सहज साध्य होतात. लहानश्या भिंगातून आलेली सूर्यकिरणं, एकाग्र होऊन कागद जाळून टाकतात. त्याचप्रमाणे मनाची एकाग्रता करून, कठीण कामं करून घेण्याबद्दल वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये वर्णन आहे. काही उपनिषदांनी, (जसं श्वेताश्वतर उपनिषद आणि मैत्रोपनिषद) 'योग' हा एकाग्रतेचा पर्यायवाची शब्द वापरला आहे.
ऐतरेय उपनिषदाच्या तिसऱ्या अध्यायात, आत्म्याच्या शक्तीचं वर्णन केलेलं आहे. चेतना, ग्रहणशक्ती, मेधा (बुद्धी), दृष्टी - अंत:दृष्टी इत्यादी गोष्टींची, मनुष्य, वृद्धी करू शकतो. त्यांना वाढवू शकतो. आणि हे झालं की कृती शक्य होते. अर्थात, अत्यंत कठीण परिस्थितीतही हिमतीने उभे राहून परिस्थिती पालटता येऊ शकते.
मुंडक उपनिषदात (किंवा मंत्रोपनिषदात), व्यवस्थापनाचे काम करताना पाळायची 'साधन चतुष्टी' दिलेली आहे -
1. त्या कामाची, त्या व्यवसायाची सखोल माहिती. 'मी हे काम का करतोय, यातून मला नेमकं काय साधायचंय', या सर्वांची स्पष्टता. सम्यक ज्ञान.
2. सत्याच्या रस्त्यावर चालणं. सत्य म्हणजेच परमेश्वर. सचोटीने व्यापार करायचा. प्रामाणिकपणानं कामं करायची.
3. आपल्या कर्मावर दृढ श्रद्धा. जे काम हाती घेतलंय, जो व्यवसाय आपण चालवतोय, त्याबद्दल मनात अनुराग असायलाच पाहिजे. त्या कामावर प्रचंड श्रद्धा हवी. प्रेम हवं. आवड हवी.
4. दिलेलं काम करताना किंवा हाती घेतलेला व्यवसाय करताना, सर्व यम- नियमांचे काटेकोरपणे पालन.
ही साधन चतुष्टी जर प्रामाणिकपणे राबवली, तर हातात घेतलेलं कोणतंही काम नक्कीच यशस्वी होतं, असं मुंडक उपनिषदात वर्णन आहे. 'सत्यमेव जयते' चा उद्घोष याच उपनिषदात झालेला आहे.
कठोपनिषदाच्या पहिल्या अध्यायातील तिसऱ्या वल्लीतील १४ वा श्लोक प्रसिद्ध आहे -
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत।
क्षुरासन्नधारा निशिता दुरत्यद्दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति॥
स्वामी विवेकानंदांनी या श्लोकाचा अनेकदा उच्चार केलेला आहे. या संपूर्ण श्लोकाचा अर्थ आहे, 'उठा, जागे व्हा आणि जाणकार, विद्वान, श्रेष्ठ पुरुषांच्या संगतीत ज्ञान प्राप्त करा.' परंतु याच्या पहिल्या भागाचा उपयोग स्वामी विवेकानंदांनी अत्यंत कुशलतेने केलाय, की "उठा, जागे व्हा आणि आपल्या लक्ष्यासाठी, उद्दिष्टासाठी 'वेडे' व्हा". येथे 'वेडे' हा शब्द 'पॅशनेट' या अर्थाने वापरला आहे. आणि आजच्या भौतिक जगातही हेच दिसतं. स्टीव्ह जॉब्स, एलन मस्क, बिल गेट्स सारखे जे - जे आपले लक्ष्य, उद्दिष्ट मिळवण्यासाठी झपाटले गेले, ते जगात अत्यंत यशस्वी ठरले.
आणि म्हणूनच, चांगल्या व्यवस्थापनासाठी, कामावर श्रद्धा ठेवून, दिलेल्या लक्ष्याप्रति 'वेडं' होणं अपेक्षित आहे, जे आपल्या उपनिषदांनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितलं आहे. प्रशांत पोळ.🙏🚩🕉️