SFI - अभ्यास व संघर्ष...!
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ही भारतातील सर्वात मोठी संघटना असून देशातील सर्व विद्यार्थ्यांना सक्तीचे, मोफत, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व रोजगाराभिमुख शिक्षण मिळाले पाहिजे.शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण, व्यापारीकरण बंद झाले पाहिजे.या मागणीसाठी SFI अविरत संघर्षरत आहे.
एसएफआय : अभ्यास, संघर्ष व त्यागाची ५० वर्षे
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या क्रांतिकारी विद
्यार्थी संघटनेची स्थापना ३० डिसेंबर १९७० रोजी तिरूअनंतपुरम (केरळ) येथे संघटनेच्या पहिल्या अखिल भारतीय अधिवेशनात झाली.
'एसएफआय' च्या क्रांतिकारी व प्रेरणादायी संघर्षाचा इतिहास :
३० डिसेंबर,१९७० रोजी एसएफआय ची स्थापना झाली होती.'एआयएसएफ' या विद्यार्थी संघटनेत १९६५ नंतर शैक्षणिक बदल घडविण्यासाठीच्या आंदोलनात्मक भूमिकेवरून वैचारिक संघर्ष निर्माण झाला.त्यानंतर विविध राज्यात वेगवेगळ्या स्टुडंट्स फेडरेशन या नावाने संघटना काम करू लागल्या.काही काळानंतर पं.बंगाल,केरळ,आंध्रप्रदेश,पंजाब इत्यादी राज्यातील विद्यार्थी नेत्यांनी एकत्र येण्याचे ठरविले. १९७० च्या उन्हाळ्यात डमडम (कोलकाता) येथे त्यांची एक बैठक झाली.आणि विचारांती त्यांनी 'एआयएसएफ' पासुन वेगळी विद्यार्थी संघटना स्थापन करण्याचे ठरविले.या बैठकीने २७ ते ३० डिसेंबर,१९७० मध्ये केरळ राज्यात तिरूअनंतपुरम येथे पहिले अखिल भारतीय अधिवेशन घेतले आणि 'एसएफआय' ची स्थापना झाली.या अधिवेशनाने सी.भास्करन (केरळ), बिमान बसू (पं.बंगाल), यांची 'एसएफआय' चे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष व सरचिटणीस म्हणून निवड करण्यात केली.या अधिवेशनाला महाराष्ट्रातून प्रा.डॉ.विठ्ठल मोरे, विप्लव मेश्राम, मदन भगत, आर.बी.पाटील, अशोक निकम हे पाच जण उपस्थित होते.
'एसएफआय' राज्यभरात नेण्यासाठी ११ ते १२ जानेवारी,१९७५ रोजी कळंब जि.उस्मानाबाद येथे संघटनेचे पहिले महाराष्ट्र राज्य अधिवेशन संपन्न झाले.
विठ्ठल मोरे व सोनवणे यांची राज्य अध्यक्ष व सरचिटणीस म्हणून निवड झाली.
पर्यायी शिक्षण व्यवस्थेसाठी लढा :
'एसएफआय' ने आपल्या स्थापनेपासून प्रचलित शिक्षण व्यवस्थेतील दोष व दुर्दशा लक्षात घेऊन पर्यायी शिक्षण व्यवस्थेसाठी लढा सुरू केला आहे.
स्वातंत्र्य, लोकशाही, समाजवाद हे ब्रीदवाक्य व राष्ट्रीय,एकात्मता, धर्मनिरपेक्षता, विज्ञान, शांतता, भातृभाव, समता ही मुल्ये आणि अभ्यास व संघर्ष हा लढ्याचा मार्ग 'एसएफआय' ने स्वीकारला.
सर्वांना शिक्षण - सर्वांना काम या घोषणे अंतर्गत शिक्षण व कामाचा हक्क घटनेत मूलभूत हक्क म्हणुन समाविष्ट करावा.सार्वत्रिक सक्तीचे व मोफत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण द्यावे, मुलींना पदवीपर्यंतचे मोफत शिक्षण द्यावे, व्यावसायिक, तांत्रिक आणि उच्च शिक्षणाच्या सोयी वाढवाव्यात,अभ्यासक्रम शास्त्रशुद्ध बदल करावेत, एकशिक्षकी शाळा बहुशिक्षकी कराव्यात, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना इ.बी.सी.सवलतीची उत्पन्न मर्यादा वाढवावी, प्रवास सवलत ७५ टक्के द्यावी, शिक्षणातून विनाअनुदानित तत्व रद्द करावेत, शिक्षणावरील खर्च राष्ट्रीय गूंतवणूक मानून केंद्र सरकारने एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्के तर राज्य सरकारने आपल्या उत्पन्नाच्या ३० टक्के खर्च हा शिक्षणावर करावा, शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण, व्यापारीकरण व धर्मांधीकरणाला विरोध, शिक्षण क्षेत्रातील फी वाढ व कंत्राठीकरणाला आळा घालावा.वस्तिगृहे, ग्रंथालये, क्रिडा, सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना सोई उपलब्ध करुन द्याव्यात,या व इतर अनेक प्रश्न व मागण्यांचा त्यात समावेश होता.
एसएफआय एक दिपस्तंभ :
वरील प्रश्न व मागण्यांसाठी 'एसएफआय' ने देशभर असे असंख्य लढे लढवले आहेत.त्यातून अनेक मागण्या मिळविण्यात यश प्राप्त केले आहे. विद्यार्थी वर्गाच्या शैक्षणिक प्रश्नांबरोबरच देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता, समाजवाद, सामाजिक न्याय, इत्यादी मूल्यांच्या संरक्षणाचीही लढाई तितक्याच जोमदारपणे लढवली आहे.तसेच धर्मांध व फूटीर शक्तीचा सर्वसामर्थ्यानिशी मुकाबला केला आहे.त्यासाठी 'एसएफआय' व तिचा भातृभावी संघटना 'डीवायएफआय' या संघटनांच्या हजाराहून अधिक कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणांचे मोल दिले आहे.
राष्ट्रीय मूल्यांच्या जपवणुकीसाठी शिक्षण व रोजगाराच्या हक्कासाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी एवढा मोठा त्याग देशातील कोणत्याही विद्यार्थी संघटनेनी स्वातंत्र्योत्तर काळात केलेला नाही.म्हणुनच 'एसएफआय' ही भारतीय विद्यार्थी आंदोलनातील एक दिपस्तंभ ठरली.
यासोबतच शैक्षणिक प्रश्नांवर लढत असताना शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, अशफाकउल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, या क्रांतिकारकांना प्रेरणास्थानी ठेवून आपले आदर्श मानते.शिक्षण सुधारणेच्या लढाईतील महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांची स्वतःला वारसदार मानते.सर्व पुरोगामी, लोकशाहीवादी, समाजवादी महापुरुषांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात महत्वपुर्ण कामगिरी बजावली.त्यांच्या या कार्याचा व विचारांचा वारसा 'एसएफआय' पुढे नेण्यास कायम कटिबद्ध आहे.
- एसएफआय नांदेड.
सर्वांना शिक्षण - सर्वांना काम मिळालेच पाहिजे!