30/01/2026
दि. 28 जाने 26 ला आनंदाश्रमात झालेल्या स्नेह मिलन सोहळ्यात , आनंदाचे आधारस्तंभ व देणगीदार यांचा सत्कार करण्यात आला . याच कार्यक्रमात माझ्या पुस्तकाचे प्रकाशन व मला प्राप्त झालेल्या " समाजभूषण पुरस्कारा " निमित्त माझाही सत्कार झाला. या सत्कारा साठी मी दिलेले धन्यवादपर भाषण.
***********************************************************************
आनंदाश्रम – सत्कार सोहळा २८ जानेवारी २६
माता कन्यकेला विनम्र अभिवादन. मंचावरील आदरणीय मान्यवर, आर्य वैश्य ज्येष्ठ नागरिक मंडळ व आनंदाश्रम परिवाराचे सर्व सदस्य, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व बंधु भगिनीनो. आपल्याच घरात होत असलेला हा सत्कार व कौतुक माझ्या साठी फार मोठी गोष्ट आहे. बाहेरच्या लोकांनी कितीही कौतुक केलेले असले तरी घरच्या लोकांनी दिलेली शाबासकी ही माणसाला वेगळीच ऊर्जा देऊन जाते. मला ही गोष्ट मुद्दाम सांगणे जरुरी वाटते आहे की, आज मला जे प्राप्त होत आहे त्याचे महत्वाचे कारण आनंदाश्रम आहे.
मला प्राप्त झालेले सन्मान हे आनंदाश्रम परिवार व आर्य वैश्य ज्येष्ठ नागरिक मंडळा मुळे प्राप्त झाले आहेत. आज मी हे सारे सन्मान आनंदाश्रम व माझ्या आर्य वैश्य ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सहकाऱ्यांना अर्पण करतो आहे. पुस्तक लिहिण्याची प्रेरणा इथलीच. मला एवढ्या उंचीवर नेणारे लोकही हेच आहेत, तेंव्हा याचे सारे श्रेय तुम्हा लोकांना आहे.
माझे पुस्तक, आत्मचरित्र “भरारी “ याचा, त्याचे प्रकाशन, आनंदाश्रम निर्मितीतील सहभाग, त्याची पूर्णता व त्या निमित्ताने मिळालेला समाज भूषण पुरस्कार या साऱ्या एकमेकांशी निगडीत गोष्टी आहेत. आत्मचरित्रात सुरवातीला आम्ही कसे घडत गेलो हे असले तरी, आयुष्याच्या उतरार्धात आनंदाश्रम निर्मिती प्रकल्प हे उदात्त कारण सापडले. यात आमची मेहनत, आमचा वेळ सत्कारणी तर लागलाच व त्या सोबतच इतर ज्येष्ठ लोकांसाठी, पुढील पिढी साठी आनंदाश्रमा सारखा भव्य प्रकल्प साकारता आला. आमच्याही आयुष्याचे सोने झाले. avjnm व आनंदाश्रम परिवारा सोबत घालविलेला काळ हा नेहमीच उत्कृष्ट काळ राहला आहे. आता avjnm व आनंदाश्रम परिवार या सर्वा सोबत अतूट नाते जुळले आहे. हीच माझी खरी भरारी आहे. या साऱ्या गोष्टीसाठी avjnm व आनंदाश्रम परिवाराचा मी सदैव ऋणी आहे.
हेमालकसा इथे डॉ प्रकाश आमटे व डॉ सौ मंदाकिनी आमटे या महामानवांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचे प्रकाशन झाले ,तसेच मला समाज भूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. आर्य वैश्य समाज गडचिरोली यांनी सुद्धा जीवन गौरव पुरस्काराणी सन्मानित केले आहे. हे सारे घडवून आणण्यास श्री बालाजी सरोज भाव काव्य प्रतिस्थानाच्या सौ सरोज अंदणकर या करणीभूत आहेत, यांचाही मी आभारी आहे.
यापुढे ही आमच्या हातून चांगल्या गोष्टी घडाव्यात, नेहमी चांगल्याचीच निर्मिती व्हावी या साठी आपला सर्वांच्या सदिच्छा, आशीर्वाद पाठीशी असावे, हीच सर्वांना प्रार्थना आहे. नमस्कार.
विजय गुंडपवार