27/03/2026
प्रबोधक आणि वनशास्त्र महाविद्यालय, दापोली कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने "चंदन लागवड" कार्यशाळा यशस्वी पार पडली.
विद्यापीठातील प्रोफेसर, शास्त्रज्ञ शेतकर्यांना मदत करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात असा अनुभव मला नेहमी आहे. मागच्या मसाला पिके कार्यशाळेत सुद्धा गजभिये सर, भुवड सर आणि टीमचा मला असाच छान अनुभव होता.
यावेळेस सुद्धा वर्षअखेरचे प्रेशर होते, पण कार्यशाळेत कुठलीही कसूर राहिली नाही. वसई पासून सावंतवाडीपर्यंत शेती असलेले पण मुंबईत कामधंद्यासाठी राहणार्या, आणि कोकणातील जमिनीवर चंदन घेऊ इच्छिणारे, म्हस्के सरांच्या भाषेत पंधरा अर्बन शेतकरी सहभागी झाले होते.
मेश्राम सरांनी चंदन लागवड या विषयावर घेतलेले पहिले सत्र, लातूर येथील महाराष्ट्र चंदन कृषी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अमोल रोनगे यांचे अतिशय प्रॅक्टिकल सत्र, त्यानंतर म्हस्के सरांचे खैर वृक्ष लागवडीवरील बोनस सत्र, आणि जेवणानंतर दुपारच्या वेळेस नर्सरी आणि मग विद्यापीठाने केलेल्या चंदन लागवडीचे प्रक्षेत्र पाहणी असा अतिशय सुटसुटीत आणि माहितीने आणि प्रत्यक्ष अनुभवाने परिपूर्ण असा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची बांधणीचे आणि व्यवस्थापनाचे काम करणार्या शिल्पा राठोड मॅडमचेही आभार!!
प्रशिक्षणार्थीना बरीच माहितीही मिळालीच, उत्साह सुद्धा वाढला. अनेकांनी पहिल्यांदा किंवा खूप वर्षांनी विद्यापीठ पाहिले होते.
मुळात,हीच माझी मनीषा आहे. मुंबईस्थित कोकणवासीयांच्या जमिनी वापरात आल्या पाहिजेत. कोकणात अनेक जमिनी ओसाड पडलेल्या आहेत. त्या वापरात याव्यात. नुसत्या वापरात नाही, तर कोकणला श्रीमंत करणार्या पिकांची लागावड झाली पाहिजे.
हळद, मसाला पिके, चंदन, साग, खैर, बांबू ह्या पिकांचा मागोवा आता कोकणात राहणार्या शेतकर्यांनी आणि मुंबई पुणे स्थित कोकणी माणसांनी घेतला पाहिजे...
असे झाले, तर कोकणचा उत्कर्ष अटळ आहे...
होय महाराजा!!
हर्षद माने
प्रबोधक युथ फेडरेशनन