Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स

  • Home
  • India
  • Mumbai
  • Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स

Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स शिवशौर्य संस्कृतीचं जतन व्हावं, संवर?

आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या शिवशौर्य संस्कृतीचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं या साठी ही सर्व धडपड आहे. म्हणूनच आम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचं नाव म्हणजेच शिवशौर्य हे नाव धारण केलं.

शिवशौर्य ट्रेकर्स परिवाराकडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा...!!!
20/10/2025

शिवशौर्य ट्रेकर्स परिवाराकडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा...!!!

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "किल्ले इंद्राई आणि राजधेर"मोहीम क्रमांक - १५८दिनांक - ११ आणि १२ ऑक्टोंबर २०२५सदस्य संख्या - २४...
18/10/2025

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "किल्ले इंद्राई आणि राजधेर"
मोहीम क्रमांक - १५८
दिनांक - ११ आणि १२ ऑक्टोंबर २०२५
सदस्य संख्या - २४
मोहीम प्रमुख - उन्मेष खैरे
मोहीम कार्यवाह - योगेश शिरसाठ

महाराष्ट्रातील स्वर्गरूप सह्याद्रीचा उत्तरेकडील भाग हा जणू या सह्याद्रीच्या माथ्यावरील सुंदर असा मुकुटच आहे आणि याच माथ्यावरील प्रांत नाशिक जिल्ह्याच्या विभागामध्ये मोडतो, येथून निघणारी सातमाळ डोंगररांग महाराष्ट्राला मध्यप्रदेशच्या सातपुडा पर्वतरांगेपासून वेगळेपण निर्माण करून देते. यात कणखर, कातळ दगडांच्या महीम भक्कम डोंगर रांगेत लपलेल्या अनेक गडरत्नांपैकी यंदाच्या मोहिमेतील दोन किल्ले, इंद्राई आणि राजधेर या भक्कम गिरीदुर्ग प्रकारात मोडणाऱ्या किल्ल्यांची मोहीम हाती घेण्यात आली.
नाशिक प्रांतातील वर्षा ऋतू ओसरल्यानंतरचे हे वातावरण स्वच्छ आणि लांब वरील डोंगररांगा स्पष्ट दिसाव्या यासाठी अनुकूल ठरते. वेळेवर मोहिमेची पूर्वतयारी झाली. मोहिमेचा दिवस ठरला. दिवसा मागून दिवस लोटता ऑक्टोबर महिन्याची दहा तारीख येऊन ठेपली. मुंबईवरून ठरल्याप्रमाणे 10 ऑक्टोंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास बस नाशिकसाठी रवाना झाली. वाटेत ठिकठिकाणी ठरल्याप्रमाणे थांबा घेत सर्व सैन्य अखेर एकत्रित जमले आणि बस नाशिकच्या दिशेने रात्रीच्या अंधारात सुसाट धावू लागली. नाशिकला पोहोचून तेथील मावळ्यांना घेतलं. पुढे 65 किमी अंतरावर असलेला चांदवडचा थांबा आमची वाट बघत होता. अकरा तारखेच्या पहाटे चांदवडच्या इच्छापूर्ती गणपती मंदिराकडून ३ किलोमीटरवर असलेल्या इंद्राई किल्ल्याच्या पायथ्याकडील गाव इंद्राईवाडी मध्ये पोहोचते झालो.
प्रातः विधी आटोपून तथा तयार होऊन सूर्याच्या पहिल्या किरणाचा प्रकाश गडमाथ्याला स्पर्श करताच सर्वांनी हर हर महादेव चा जयघोष करत उत्साहात किल्ले इंद्राईच्या पहिला टप्प्याला सुरुवात केली. पायथ्या पासून गडाच्या माथ्याकडे बघताना कमी वाटणारे अंतर व उंची हळूहळू गड सर करताना अधिक वाटू लागली समुद्रसपाटीपासून 1320 मीटर उंचीवर असणारा इंद्राई किल्ला अतिशय बलाढ्य व भक्कम आहे. एका मागून एक छोट्या टेकड्या सर करत चढत जाताना शारीरिक क्षमतेचा कस लागतो. त्यामध्ये यंदाच्या मुसळधार पावसामुळे व गडावरील हिरवेगार उंच गवत यामुळे पायवाटा मळलेल्या अजूनही दिसत नव्हत्या. त्यात गडावर जाणारी दक्षिण पूर्वेकडील दुर्गम वाट आम्हा गड वेड्यांसाठी अधिक अवघड होती. परंतु सैन्याचा उत्साह आणि दृढनिश्चयी मनोबल यासोबत अखेर जवळपास पावणे दोन तासाच्या चढाईनंतर इंद्राई किल्ल्याच्या दक्षिणेकडील कातळातील कोरीव पायऱ्यांपाशी पोहोचलो. तिथून गडाचा दिसणारा घेरा तसेच राखणदार मारुतीरायाचे दर्शन घेऊन पायऱ्यांवरच सोबत आणलेला नाष्टा करण्याचे प्रयोजन ठरले. मग काय सर्वांचा नाश्त्यासाठी खाऊचा डबा उघडला आणि बहारदार गप्पांनी रंगत असलेल्या माहोल मध्ये सर्वांनी नाश्ता करून गडाच्या माथ्याकडे कुच केली. महिम भक्कम अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या व त्याजवळील पारशी भाषेतील एक शिलालेख याचे निरीक्षण करून किल्ल्याची ऐतिहासिक तथा भौगोलिक माहिती घेऊन सर्व सैन्य गडाच्या माथ्याकडे रवाना झाले. सातवाहन युगापासूनचा हा किल्ला अनेक साम्राज्य उदयास येताना व नष्ट होतानाचा साक्षीदार आहे. गडावरील अतिजीर्ण वाड्यांचे अवशेष प्राचीन लेण्या, तसेच महादेवाचे सुंदर मंदिर बघून गडाच्या पुढील भागाच्या भ्रमंतीसाठी उत्साहाने लोक निघाले.
गडाचा घेरा प्रचंड आहे, तसेच गडमाथ्यावरून दुसऱ्या दिवशीचा किल्ला, किल्ला राजधेर दिमाखात उभा दिसला. या दुर्गम सह्याद्रीचे डोळे भरून दर्शन घेऊन सैन्य गड उतार झाले. आता आस लागली ती दुपारच्या जेवणाची भुकेने कासावीस झालेले सैन्य पटापट गड उतार होऊन गडाच्या पायथ्याशी असलेल्या आजोबांच्या घरी जेवणासाठी जमले. झणझणीत उसळची भाजी आणि बाजरीची भाकरी वर पद्धतशीर ताव मारून त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन सर्वजण चांदवड पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्दडी या गावातील प्राचीन शनीमंदिराला भेट देण्यासाठी निघाले. तेथील विक्रमादित्य राजाची पौराणिक कथा ऐकून व शनि महाराजांचे दर्शन घेऊन सर्वजण माघारी चांदवडच्या किल्ल्याच्या पोटामध्ये असलेल्या चंद्रेश्वरी या प्राचीन महादेव मंदिराकडे आले. त्या भव्य आणि सुंदर प्राचीन मंदिराच्या गाभाऱ्यातील विराजमान महादेवाचे दर्शन घेऊन सैन्याने घटकाभर विश्रांती घेतली. मावळत्या सूर्याकडे बघत सुंदर अशा वातावरणामध्ये चांदवड शहराचे उंचावरून निरीक्षण करत चंद्रेश्वरी च्या घाटावरून आमची बस पुन्हा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावाकडे म्हणजेच मुक्कामाच्या ठिकाणी रवाना झाली. पुढील थांबा राजधेर किल्ल्याच्या पायथ्याचे असलेले राजधेरवाडी गाव हे होते. तेथील ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये सैन्याच्या राहण्याची व्यवस्था होती. तेथेच छोटासा क्रिकेटचा डाव रंगवून सर्व मंडळी रात्रीच्या जेवणासाठी जमली. काळ्या मसाल्याची पातोड्याची भाजी आणि वरण-भात या रुचकर जेवणावर ताव मारून मनभर व पोटभर जेवण करून दिवसभर पायपीट केलेले सैन्य अखेर निवांत आरामासाठी गेले. तसेच सचिन भंगाळे सरांचा वाढदिवस साजरा केला. पहाटे लवकर उठण्याचे लक्ष गाठण्यासाठी झोपी जाणे आवश्यक होते. दुसऱ्या दिवशीचा गडाचा टप्पा तितकाच कणखर व अवघड असल्याने सर्वजण लवकर झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी पहाटेच सारे सोपस्कार आटोपून मावळे चढाईला तयार झाले. दुसऱ्या दिवशीचा किल्ला देखील तितकाच बलाढ्य होता. सैन्याला आज सर करायचा होता किल्ले राजधेर. हा गड इंद्राई प्रमाणेच उंच आणि भक्कम किल्ला आहे. ज्याची उंची 1280 मीटर अंदाजे सांगितली जाते. रुचकर पोह्यांचा नाश्ता आटोपून सर्वजण गडाच्या वाटेने निघण्यासाठी सज्ज झाले. गावाच्या पश्चिमेकडून किल्ल्यावर चढण्याचा मार्ग आहे.
उत्साह आणि जोश पूर्ण वातावरणात, हर हर महादेव चा गजर करत सैन्य किल्ल्याच्या दिशेने निघाले. एका मागून एक टेकडी सर करून किल्ल्याच्या बुरुजाजवळील माचीपाशी उंच गवतामध्ये येऊन घटकाभर विश्रांती घेत, उंचावरील दिसणाऱ्या रम्य आणि भव्य सह्याद्रीचा नजारा बघत सगळ्यांनी फलाहार केला. तसेच या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्याच्या तासलेल्या कड्यामध्ये कोरलेल्या कातळातील पायऱ्या. ज्यांचे काही अवशेष इंग्रजांनी सुरुंग लावून उडविले, तिथेच सध्या लोखंडी शिडी बसविली असल्याने किल्ल्यावर जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे.
हा किल्ला सर करून माथ्यावरील काही प्राचीन अवशेषांचे निरीक्षण केले. तसेच एक सुंदर असे पाण्याचे तळे बघावयास मिळाले. कालच्या दिवशी सर केलेला इंद्राई किल्ल्याचे रौद्र आणि भयावह रूप हे आजच्या राजधेर किल्ल्यावरून दिसत होते. उंचावरून उत्तरेकडील दिसणाऱ्या काही डोंगर रांगा व सप्तशृंगी गड व मार्कंडेय डोंगराचे अंधुक दर्शन घेऊन साऱ्यांची थोडक्यात ओळख परेड झाली. साऱ्यांनी आपापले अनुभव कथन केले, गडमाथ्यावरच्या या बैठकीला मावळ्यांसोबत वानरसेनेचीही छोटीशी साथ लाभली.
किल्ला उतरताना समूह फोटो घेतला. किल्ल्याच्या पूर्वेकडील ताशीव कोरलेला भक्कम कडा ही किल्ल्याची शेवटची आणि मनमोहक मुख्य आकर्षण असलेली वास्तू. जवळपास किल्ल्यावरील उपलब्ध सर्वच वस्तूंची पाहणी करून सैन्य अखेर दुपारच्या जेवणासाठी गड उतार झाले. हसत खेळत गप्पागोष्टी करत सर्वजण गडाच्या पायथ्याशी एकत्रित जमले. खाली गावात सर्वांनी रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला. आणि घड्याळाच्या काट्याला पण दम देणाऱ्या आमच्या नियोजनबद्ध ट्रेकचा निरोपाचा क्षण जवळ येऊ लागला. मुंबईकडील प्रवाशांचे ट्राफिकचे कारण लक्षात घेता वेळेवर माघारी रवाना करणे तितकेच आवश्यक असल्याने सर्वांचा निरोप घेऊन या दोन दिवसीय ट्रेकचा समारोप केला. या मोहिमेत मुख्य धारेपासून दुर्लक्षित असणाऱ्या दोन महत्त्वाच्या किल्ल्यांना भेट देण्याचे लक्ष साध्य झाले तसेच सातमाळा रांगेतील बलाढ्य अशा डोंगर रांगांचे अक्राळ विक्राळ रूप बघावयास मिळाले. नाशिक प्रांतातील ऐतिहासिक तथा धार्मिक घटकांचा मागोवा घेणारी ही मोहीम उत्तमरित्या पार पडली त्यासाठी सर्व सभासदांना मनस्वी शुभेच्छा.

ट्रेक करत रहा, भ्रमंती करत रहा, भ्रमंती ही सत्याच्या जवळ असते.

जय भवानी जय शिवाजी
जय हिंद
ll वीर भोग्य वसुंधरा ll

02/10/2025

सह्याद्रीतील बावनकशी सोनं लुटण्यासाठी सीमोल्लंघन करत रहा.

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
🚩🚩🚩

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "मराठवाडा मोहीम"दिनांक : १३ आणि १४ सप्टेंबर २०२५मोहीम क्रमांक : १५७सदस्य संख्या : २१मोहीम प्रमु...
25/09/2025

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "मराठवाडा मोहीम"
दिनांक : १३ आणि १४ सप्टेंबर २०२५
मोहीम क्रमांक : १५७
सदस्य संख्या : २१
मोहीम प्रमुख : अनिकेत भुजबळ
मोहीम कार्यवाह : श्रीनिवास कऱ्हाडकर

यावेळी नांदेड, लातुर आणि धाराशिव जिल्ह्यातील अपरिचित पण ऐतिहासिक अशा ठिकाणांसह शिवशौर्य ट्रेकर्सने मराठवाड्यातील किल्ल्यांची सफर करण्याचा निर्णय घेतला. मोहिमेसाठी उदगीर, कंधार, औसा, नळदुर्ग आणि सोबत प्रसिद्ध अशा श्री सिद्देश्वराचे आशीर्वाद घेण्याचे ठरले. १३ आणि १४ सप्टेंबर या तारखा निश्चित करून दोन महिने आधीच येणाऱ्या सदस्यांची रेल्वेची तिकिटे आरक्षित केली गेली. १३ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास सगळे म्हणजेच १५ मावळे उदगीर रेल्वे स्थानकात उतरले त्यांना स्वतःच्या वाहनाने आलेले पनवेलचे ६ मावळेदेखील सामील झाले. फ्रेश होऊन, चहा घेऊन ताजेतवाने झाल्यावर मोहिमेचे नियम, खबरदारी व आवश्यक सूचना दिल्या गेल्या आणि स्थानकाबाहेरच उभ्या असणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने मार्गक्रमणा सुरु झाली.

पहिलं ठिकाण होतं उदगीर किल्ला. पायथ्याशी पोहोचल्यावर सूचना देताच स्थानिक गाईडसोबत किल्याची भटकंती सुरु झाली. १० वाजेपर्यंत उदगीर किल्ला पाहून सर्वांनी पुढचे ठिकाण अर्थात कंधार किल्ला गाठला. कंधारला काही मूर्तीचे अवशेष आणि पंचधतुच्या तोफा पाहायला मिळाल्या. दोन्ही ठिकाणं भटकून झाल्यावर तेथून पुढे सोलापुरी मेजवानीचा सर्वांनी पोटभर समाचार घेतला. नंतर जवळपास १२० किलोमीटर अंतर पार करून चारच्या सुमारास औसा किल्ला येथे पोहोचलो. स्थानिक गाईड श्री. अनिल गायकवाड यांच्या सहकार्याने किल्ल्याची पहाणी वेळ संपलेली असूनसुद्धा त्यांनी संपूर्ण किल्ला दाखवून चांगली माहिती सांगितली. किल्ल्याचे विशेष आकर्षण म्हणजे राणीमहाल जो जमिनीच्या खाली आहे. महाल पाहून मस्त चहा आणि आणलेल्या खाऊचा आस्वाद घेऊन, पुढे मुक्कमी म्हणजेच श्री बालाजी मंदिराच्या परिसरात असणाऱ्या हॉल मध्ये पोहोचलो. फ्रेश होऊन सगळे हॉल मध्ये निवांत बसले कारण दमदार पावसाने हजेरी लावली होती. साधारण ८.३० वाजता श्री बालाजी भगवंताचे दर्शन घेऊन सर्वांची ओळखपरेड होऊन जेवणाचा आस्वाद घेतला गेला आणि दिवसाची सांगता झाली.

१४ सप्टेंबर उजाडला, मोहिमेची उत्सुकता एवढी की काहीजण पहाटे ३.३० वाजल्यापासून उठून आवरत होते. सकाळी ७.३० पर्यंत चहा आणि नाष्टा करून निघालो ते ९.३० वाजता नळदुर्ग किल्ला येथे पोहोचून श्री वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ला पाहायला सुरवात केली. पाणीमहाल हा त्या किल्लातील उत्तम अशी कारागिरी केलेला बघण्याचा मुख्य स्पॉट. सोबत नर आणि मादी धबधबा बघून आश्यर्य नाही वाटल तर नवलच. तिथल्या सर्वात मोठया बुराजवरून किल्ल्याचा रमणीय नजारा बघणे म्हणजे एक अविस्मरणीय क्षणच. त्याच बुरुजावर दोन मोठया तोफा बघायला मिळतात. किल्ला बघुन झाल्यावर काहींनी तिकडच्या मार्केटमध्ये मसाले विकत घेतले आणि पुढे दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली. जेवणाचा आस्वाद घेऊन पोहोचलो ते सोलापूरचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी. किल्ला बघुन तिथेच शेजारी असणाऱ्या श्री सिद्देश्वर मंदिरात दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झाले. आता वेळ झाली होती निरोपाची, बॅग स्टेशनवर ठेवून शॉपिंग आणि जेवणं झाली. मोहिमेच्या सुखद आठवणी मनात कायमस्वरूपी साठवत काही मावळे सोलापूर स्टेशनवरून स्वतःच्या गाडीने रवाना झाले तर बाकी मावळे सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले.

त्या भागातील किल्ला पाहण्याच्या वेळा सकाळी ९ ते ५ अशा मर्यादित असल्याने दोन दिवसांच्या अविस्मरणीय मोहिमेत वेळेचे हे बंधन काटेकोरपणे पाळत सगळ्या मावळयांनी साथ दिल्यामुळे ठरलेली ठिकाणे बघणे शक्य झाले. त्यासाठी सगळ्या मावळ्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार.

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचं १७ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यात निधन झालं.शिवचरित्र आणि...
18/09/2025

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचं १७ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यात निधन झालं.

शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्लिशमध्ये खूप मोठे ग्रंथ लिहिले आहेत, जे आज इतिहास क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेत. फारसी, मोडी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. शिवाजी झाला नसता तर, टिपू ॲज अ वॉर, शिवाजी लाईफ अँड टाईम, शिवचरित्र, मराठ्यांचे आरमार अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. इतिहासाचं वेड लागल्या शिवाय इतिहासाकडे पाहता येत नाही आणि इतिहासाचं वेड लागलेलीच माणसं इतिहास लिहितात. सरांच्या पुस्तकरूपी खजिन्यातून येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आपल्या इतिहासाची जाणीव आणि प्रेरणा मिळत राहो हीच आशा !

मेहेंदळे सरांना शिवशौर्य ट्रेकर्स परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली...🙏🏻💐

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "किल्ले विश्रामगड (पट्टा किल्ला)"मोहीम क्रमांक - १५५दिनांक - ०३ ऑगस्ट २०२५सदस्य संख्या - ३५मोही...
13/09/2025

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "किल्ले विश्रामगड (पट्टा किल्ला)"
मोहीम क्रमांक - १५५
दिनांक - ०३ ऑगस्ट २०२५
सदस्य संख्या - ३५
मोहीम प्रमुख - उन्मेष खैरे
मोहीम कार्यवाह - विजय हरचंदे

दुर्गांमध्ये लपलेला एक योद्धा शंभर आक्रमकांना भारी ठरतो, तर शंभर योद्धे दहा हजारांबरोबर लढू शकतात.
तसं पहायला गेलं तर महाराष्ट्र हा खूप भाग्यवान आहे कारण महाराष्ट्राला इतिहासाबरोबर भूगोलाचीही जोड आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगात ठिकठिकाणी बांधलेल्या दुर्गांमुळे या पर्वतांचे दुर्गमत्व अधिकच वाढले आहे. अश्याच दुर्गांपैकी काही दुर्ग शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झाले आहेत. त्यातील एक गड म्हणजे विश्रामगड (पट्टा किल्ला).

यावेळी संस्थेने मोहीम क्रमांक १५५ आखली ती किल्ले विश्रामगड भ्रमंती करण्यासाठी.
बघता बघता मोहिमेचा दिवस उजाडला. शनिवारी ०२ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई येथून ३५ जण बसने रात्रौ १०:३० वाजता निघाले. असं म्हणतात ना काळ आला पण वेळ न्हवती, असंच काहीस आमच्या बाबतीत घडलं. मध्यरात्री साधारण ०२:४५ च्या सुमारास खर्डी गावाजवळ आमच्या बसला अपघात झाला. आमचं नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने कुणाला फार काही ईजा झाली नाही. सर्वांची विचारपूस करता सगळे सुखरूप होते. अपघातामध्ये बसच नुकसान झालं होत आणि ती बस आता पुढे नेता येणार न्हवती. आता इथून पुढे कस जायचं हा पेच सर्वांच्या मनात निर्माण झाला होता. एखादी गोष्ट करण्याची ईच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच ही म्हण तंतोतंत इथे लागू झाली. अश्यातच संस्थेचे अनुभवी सदस्य अमित दादा, गौतम दादा, अजित यांच्या पुढाकाराने पुढील प्रवास हा जीपने करण्याचे ठरले. तसे नियोजन करून आम्ही कसाऱ्यावरून जीप मागविण्याची तयारी केली. साधारण साडेचार वाजता आम्ही सर्वजण जीपने विश्रमगडाकडे रवाना झालो आणि पट्टावाडी गावात पोहोचलो.

सकाळचे सोपस्कार आटपून चहा-नाश्ता झाल्यावर सर्वांची ओळख परेड झाली आणि साधारण आठ वाजता मोहिमेला सुरुवात झाली. एका तासाच्या चढाईनंतर आम्ही पहिल ठिकाण गाठलं ते त्रिंबक दरवाजा. थोडं फोटोसेशन करून पुढे पट्ठाई देवीच्या मंदिराजवळ आलो. देवीला नतमस्तक होऊन पुढील वाटचालीला सुरुवात केली. अंगाला झोबंणारा थंडगार वारा अधूनमधून पावसाचे पुष्कळसे पाणी बरोबर घेऊन येत होता. निसर्गाने आपल्यासमोर एक वेगळीच चित्रकला सादर केल्याचा भास होतो. धुक्यातून वाट शोधत आम्ही शिवकालीन बंधाऱ्याजवळ पोहोचलो. समोर पाण्याचा डोह बघता आमच्यातल्या काही मंडळींना मोह आवरता आला नाही आणि क्षणाचाही विलंब न लावता लगोलग त्यांनी त्या डोहात उड्या मारल्या. मनसोक्त भिजण्याचा आनंद घेऊन झाल्यावर पुढच्या वाटचालीला सुरुवात झाली. थोडे अंतर चालून आम्ही अंबरखान्याजवळ आलो. अंबरखाना अजूनही सुस्थितीत आहे. अंबरखान्यात प्रवेश केला. छत्रपतींचा सहवास लाभलेल्या वास्तूत प्रवेश केल्यानंतर अंगात एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. अंबरखान्यात मराठ्यांच्या शौर्याचे दाखले देणारी काही चित्र भिंतीवरती कोरली आहेत. महाराजांना मानवंदना देऊन संस्थेचे आजीव सदस्य आणि इतिहास ज्ञात असलेले आमचे विजय विखरणकर काका, यांनी गडाबद्दल माहिती दिली. माहिती ऐकून झाल्यावर शिवगर्जना देऊन आम्ही अंबरखान्यातून बाहेर पडलो आणि पुढील ठिकाणाच्या दिशेने आगेकूच केली. थोडे अंतर चालून झाल्यावर गडावर असलेल्या गुहेजवळ आलो. गुहेला लागूनच पुढे पाण्याची बारा टाकी आहेत. गुहा आणि टाके बघून झाल्यावर गड उतरायला सुरुवात झाली. साधारण एका तासात गड उतरून गडाच्या पायथ्याला असलेल्या पट्टावाडी गावात पोहोचलो. तिथे श्री. पोपट खोकले यांच्याकडे दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती. सर्वजण फ्रेश झाले आणि जेवणाची पंगत बसली आणि रुचकर अश्या जेवणाचा आस्वाद घेतला गेला.
जेवण करून टाकेद येथील श्री जटायू मंदिराला भेट दिली. जटायू ही कथा रामायणातील एक प्रसिद्ध कथा समजली जाते. माता सीतेचे अपहरण करून रावण तिला आकाशमार्गे घेऊन जात असताना गिधाड असलेला हा जटायू पक्षी रावणाच्या मार्गात आडवा आला आणि त्याने रावणाला विरोध केला.bरावणाने त्याचे पंख कापुन टाकले तेव्हा जटायू जमिनीवर कोसळला आणि रामचंद्राची वाट पाहत थांबला होता. सीतेला शोधत प्रभू रामचंद्र इथे आले असता त्याने प्रभू रामांना ही सीताहरणाची घटना सविस्तर सांगितली. प्रभु रामचंद्रानी याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून निर्माण झालेले पाणी जटायूला पाजले. ते प्यायल्यावर जटायूने आपले प्राण रामाच्या मांडीवरच सोडले. रामायणातली ही जटायूची कथा ज्या ठिकाणी घडली आहे ते स्थान म्हणजे टाकेदतीर्थ.

जटायूच दर्शन घेऊन झाल्यावर आता प्रवास सुरु होणार होता आपापल्या घरट्याकडे परतण्याचा...दिवसभराची आठवण घेऊन सर्व मावळे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आणि मोहिमेची सांगता झाली…!!!

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित पन्हाळा ते पावनखिंड शिवमृत्युंजय पालखी मोहीमदिनांक : १० आणि ११ जुलै २०२५मोहीम क्रमांक : १५३सदस्...
12/09/2025

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित पन्हाळा ते पावनखिंड शिवमृत्युंजय पालखी मोहीम
दिनांक : १० आणि ११ जुलै २०२५
मोहीम क्रमांक : १५३
सदस्य संख्या : ८४
पालखी प्रमुख : श्रीनिवास कऱ्हाडकर

शिवशौर्य ट्रेकर्सची सुरुवात झाली तीच कोणीही न केलेल्या पालखी मोहिमेने. सन २०१० सालापासून संस्थेच्या मोहिमेला सुरुवात झाली आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी तिथीप्रमाणे पावनखिंडीतल्या युद्ध भूमीला नतमस्तक होण्यासाठी शिवशौर्यची ही महामोहिम होतच असते आणि दर पाच वर्षानंतर पालखी मोहीम होत असते.

दिनांक १० जुलै रोजी महाराष्ट्रभरातून ८४ मावळे पन्हाळगडावरती एकत्र जमले. पन्हाळगड नगरपालिकेच्या मोरोपंत पिंगळे सभागृहात सर्वांचा डेरा पडला. सर्वांनी चहा नाश्त्याचा आस्वाद घेतला. पालखी प्रमुखांनी केलेल्या सूचनेनुसार सर्वजण पन्हाळगड फिरण्यास बाहेर पडले. त्यांच्याबरोबर होते इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत. शिवशौर्यचे हक्काचे इतिहास मार्गदर्शक. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्व मावळे दरवर्षी घेत असतात. डॉ. श्रीदत्त राऊत प्रत्येक मुर्त्या, अवशेष, स्तंभ, शिलालेख, देवळं, तटबंदी, बुरुज, दरवाजे या बद्दल इत्यंभूत माहिती देतात. पन्हाळगड हा शासनमान्य हिल स्टेशन जाहीर असल्यामुळे तेथे गडाचे अनेक अवशेष सुस्थितीत आहेत तरीही काळाचा घाला कधीकधी तटबंदीला, बुरुजाला नुकसान पोहोचवत असतो. तरीही सगळ्या इतिहास प्रेमींच्या दृष्टीने हा किल्ला बऱ्यापैकी बराच शाबूत आहे.

सायंकाळी शिवशौर्य ट्रेकर्सच्या अध्यक्षा सौ. नम्रता सावंत यांनी संस्थेची ओळख करून दिली आणि यापुढे संपूर्ण पालखीचे नियोजन सूचना नियम शंका निरसन हे पालखी प्रमुख श्री. श्रीनिवास कऱ्हाडकर उर्फ गुरुजी करतील असे जाहीर केले. श्रीनिवास कऱ्हाडकर यांनी मोहिमेची रूपरेषा सांगितली. या ८४ जणांमध्ये अधिक तर नवखे होते त्यांना या मोहिमेबाबत कमालीचे कुतुहूल होते. पालखी मोहीम काय असते? तो थरार कसा असतो? हे कसं होऊ शकते? एवढ्या रात्रीच्या अंधारात एखादा ट्रेक, एखादी मोहीम ह्या प्रचंड उत्सुकतेपोटी ते या मोहिमेत सामील झाले होते. प्रत्येकाला तो रात्रीचा क्षण अनुभवायचा होता. ही उत्सुकता व आनंद आणि जोडीला हलकसं टेन्शन सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं आणि पालखी प्रमुख त्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन करत होते. पालखी प्रमुखांनी मावळ्यांची तीन गटात विभागणी केली. त्यानंतर उपस्थित मावळ्यांची एकमेकांशी ओळख करण्यास सुरुवात केली. संस्थेच्या स्वयंसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपली ओळख करून दिली. श्रीदत्त राऊत यांनी स्वतःची ओळख करून दिली. आता वेळ होती इतिहासाच्या तासाची आणि श्रीदत्त सरांनी वर्गाचा ताबा घेतला. खरंतर तासात मोडणारा हा तास नव्हताच. इतिहासाचं दालनच खुलं झालं होतं. जेवण आलं म्हणून थांबवावं लागलं इतके सर्वजण त्यात मग्न झाले होते. इतिहासाचे अनेक कंगोरे उलगडत पावनखिंडीच्या इतिहासामध्ये स्वतःच अनेक प्रश्न समोरच्यांसमोर ठेवत इतिहासाचा कसा आणि कुठल्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा हेही त्यांच्या नजरेस आणून देत होते. एखाद व्याख्यान म्हटलं की समोरचा बोलत असतो आणि उपस्थित लोकं फक्त ऐकत असतात. अशाच पद्धतीची सर्व व्याख्याने असतात. पण श्रीदत्त सरांच तसं नाहीय. ते दुसऱ्यांना बोलत करायला, प्रश्न विचारायला लावणारे इतिहासाचे वक्ते आहेत. उपस्थित लोकांनी त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. त्यांना उत्तरे सुद्धा समाधानकारक मिळत होती. तत्पूर्वी संस्थेचे काही सदस्य नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून आले. आठ-सव्वा आठ वाजेपर्यंत सर्वांची जेवणं उरकली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा पॅक नाश्ता सर्वांना वाटला गेला. टोप्या दिल्या गेल्या आणि प्रत्येक गटाची विशेष खूण म्हणून प्रत्येक गटाला विशिष्ट रंगाचा एक बँड हातात बांधण्यासाठी दिला जेणेकरून तो मावळा कुठल्या गटात मार्गक्रमण करणार आहे हे लगेच लक्षात यावे. सर्व मावळे संपूर्ण तयार होऊन संभाजी महाराज मंदिरापाशी पोहोचले. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी तयार होती. श्रीदत्त राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या स्थानापन्न मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. एक छोटा मावळा पार्थ खेडेकर याने महाराजांची गारद दिली आणि प्रचंड जयघोषात पालखी मोहीम सुरू झाली. ताराराणी बाई साहेबांनी बांधलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर गडावर आहे. त्या मंदिरात पालखी पोहोचली. शिवप्रतिमेला फुलं अर्पण करून आणि हनीफ नगारजी कुटुंबीयांकडून मोहिमेस शुभेच्छा दिल्या गेल्या.

पालखी मोहिमेला सुरुवात झाली. पन्हाळगडावरील गल्ल्या गल्ल्यांमधून प्रचंड जयघोषात पालखी पुढे सरकत होती. पन्हाळ्यावरती आलेले पर्यटक, गडावरील स्थानिक नागरीक आपल्या खिडकीतून, दरवाजातून ही रात्रीची पालखी निघण्याचा सोहळा पाहत होते. पालखी बाजीप्रभूंच्या पुतळ्यापाशी पोहोचली. पन्हाळगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी श्रीफळ वाढवून, बाजीप्रभूंना पुष्पहार अर्पण करून मोहीम मार्गस्थ केली. या सोहळ्यास पन्हाळ्यावरील ज्येष्ठ असे श्री. गुळवणी देखील उपस्थित होते. पन्हाळगडाच्या पाठीमागच्या बाजूला राजदिंडी आहे. हे गडाचे शेवटचे टोक. हीच ती राजदिंडी जिथून छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शिवा काशीद यांची पालखी गडउतार झाल्या होत्या. याच ठिकाणी महाराजांनी शिवा काशीद याचा निरोप घेतला होता. त्या दोंघांचे निरोपाचे संभाषण काय झाले असेल? दोघांच्याही मनात काय कालवाकालव झाली असेल? अश्रूंचे बांध फुटले असतील तीच ही तीन जागा. एक मिनिटं डोळे बंद करून त्या जागेला मनोमन नमस्कार करून मावळे गडउतार होऊ लागले. आता साधा रस्ता नव्हता. दगड धोंड्यांचा होता. वाटेत येणारी झाडाची फांदी बाजूला करत मार्गक्रमण सुरु होतं. पायथ्याच्या गावात तुरुकवाडीतील गावकऱ्यांनी पालखीचे मनोभावे स्वागत केले. तेथील स्थानिक रहिवाशी कृष्णाची चिले याच्या घरातल्या सुवासिनींनी पालखीचे औक्षण केले. स्वतः कृष्णा आणि त्याचा मुलगा शिवबा हे पालखी मोहिमेत सहभागी झाले आणि दिशादर्शक किंवा मदतनीस या नात्याने ते पालखीच्या पुढे पुढे चालत राहीले. आता ४० मावळे मसाई पठाराच्या दिशेने गेले आणि उर्वरित मावळे पन्हाळगडावरील सभागृहात मुक्कामाला आले. पावसाचे नामोनिशान नव्हते. आकाश निरभ्र होते. पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पसरला होता. या चंद्राच्या प्रकाशात आता पालखीचे मार्गक्रमण सुरू होते. लांबपर्यंत पसरलेलं म्हसाई पठार त्यावरून जाणारी पालखी, हे दृश्य पाहून प्रत्येक मावळ्याला या मोहिमेत सामील झाल्याचा आनंद, अभिमान वाटत होता. म्हसाई देवीला नमन करून पालखी पुढे मार्गस्थ झाली. शहरी मावळ्यांना ना थकवा ना शीण. निघाल्या पासूनचा तोच जोम टिकून होता. पठार सोडून जंगलातील उतरण सुरु झाली. ही उतरण थेट कुंभारवाडी गावात येवून संपली. त्यानंतर मात्र सपाट चाल होती. मध्यरात्री ३ वाजता खोतवाडीत पहिली तुकडी दाखल झाली. लगेचच दुसरी तुकडी पालखी घेऊन मार्गाला लागली. हा टप्पा सतत चढ उताराचा, शेताच्या बांधावरून चालण्याचा, जंगलाचा असा होता. गावातील घरांनी देवाची पालखी आल्याप्रमाणेच पालखीचे स्वागत केले. शिवरायांच्या मूर्तीला फुले वाहिली. पालखीच्या भोईंचे पाय धुवून औक्षण केले. डोळ्यात पाणी येईल असाच क्षण होता. चिखल तुडवत जंगल पार करेपर्यंत सकाळी ८.३० वाजता माळेवाडी गावात पालखी पोहोचली. मोहिमेची तिसरी तुकडी तिथे तयारच होती. पालखीचे खांदे पालट झाले. ताज्या दमाचे भोई होते. पालखी वेगाने पुढे सरकू लागली. पाटेवाडी गावात पालखीचे स्वागत झाले. प्रत्येक घराच्या समोर औक्षण होत होते. तिसरा टप्पा जास्तीत जास्त गर्द जंगलाचा आहे. खळाळत्या ओढ्यांचा आहे. त्या निसर्ग सोहळ्यातून बाहेर पडूच नये असं वाटतं. दिवसा उजेडी निसर्गाचे चैतन्यमयी रूप डोळ्यात साठवत होते. शेतीची सुरु असलेली कामे जवळून पाहता येत होती. नांगर हातात धरण्याची हौस भागवली जात होती. म्हाळसवडे गावाआधी लागणाऱ्या ओढ्यात कल्ला करून पालखी पांढरपाणी येथील डांबरी रस्त्यावर आली. सिद्धी जौहरच्या फौजेबरोबर बांदल सेनेची इथेच पहिली चकमक उडाली होती. या गावातून दोन रस्ते फुटतात. एक सरळ अणुस्कुरा घाटाकडे जातो तर दुसरा उजवीकडे विशाळगडाच्या दिशेने. दुपारी २ वाजता मालाईवाड्यात सर्वजण जेवायला एकत्र जमले. जेवण झाल्यावर पालखी निघाली. आता आमची महामोहिम अंतिम टप्प्यात आली होती. अखेर अर्ध्या-पाऊण तासात आम्ही पावनखिंडीत पोहोचलो. "याचसाठी केला होता अट्टाहास" बाजींच्या रक्ताने पावन झालेली हीच ती गजापूरची घोडखिंड...आमच्या शिवमृत्युंजय मोहिमेचा परमोच्च क्षण. रणभूमीवर एक प्रतीकात्मक ढाल तलवारीचा स्तंभ आहे. अनेक किल्ल्यांवरचे पाणी जे खऱ्या अर्थाने तीर्थ आहे, ते तीर्थ आणि भारतातील अनेक नद्यांचे पाणी एकत्रित करून याच तीर्थाने रणभूमीवर अभिषेक केला गेला. ३६५ वर्षांपूर्वी याच मातीवर रक्ताचा अभिषेक झाला होता. आजही स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या बांदल वीरांचे आत्मे तिथे नक्कीच असतील. कौतुकाने हा सोहळा पाहत असतील. म्हणत असतील कालानुरूप पेहेराव बदलले आहेत, पण आमच्या सारखे मावळे आजही जिवंत आहेत. जलाभिषेकानंतर पूजन झाले. आरती झाली. तेथील पवित्र माती सर्वांच्या कपाळी लावली गेली. बाजीप्रभूंचे थेट वंशज १४वी पिढी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या सोबत होती. शाहूवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकही आवर्जून हजर होते. या मान्यवरांच्या हस्ते मोहिमेतील सर्व मावळ्यांचा प्रशस्तीपत्र आणि दांड पट्ट्याची छोटी प्रतिकृती देऊन गौरव करण्यात आला आणि शिवमृत्युंजय पालखी मोहीमेची यशस्वी सांगता झाली.

अनेक दिवसांची अविश्रांत मेहनत सत्कारणी लागली. शिवशौर्य हे आमच्या संस्थेचं नुसतं नाव नाही तर आपली शिवशौर्य संस्कृती जपली जावी, टिकून राहावी, आणि पुढील अनेक पिढ्या शिवसंस्कारात घडाव्यात म्हणून हा खटाटोप. हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
जय शिवराय...!!!

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित कोकण सागरी दुर्गसफरदिनांक : २५ ते २७ एप्रिल २०२५मोहीम क्रमांक : १५१सदस्य संख्या : ५०मोहीम प्रमु...
11/09/2025

शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित कोकण सागरी दुर्गसफर
दिनांक : २५ ते २७ एप्रिल २०२५
मोहीम क्रमांक : १५१
सदस्य संख्या : ५०
मोहीम प्रमुख : गुरुनाथ मयेकर
मोहीम कार्यवाह : अजित नर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही अपरिचित पण ऐतिहासिक अश्या ठिकाणांसह यावेळी शिवशौर्य ट्रेकर्सने कोकणातील सागरी किल्ल्यांची सफर करण्याचा निर्णय घेतला. मोहिमेसाठी रामगड, भरतगड, विजयदुर्ग, देवगड आणि सिंधुदुर्ग यांची निवड करण्यात आली आणि सोबत कांदळवनाची सफारी देखील होतीच. २५ ते २७ एप्रिल या तारखा निश्चित करून दोन महिने आधीच येणाऱ्यांची रेल्वेची तिकिटे आरक्षित केली गेली.

२५ एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास सगळे म्हणजेच ५० जण कणकवली रेल्वे स्थानकात उतरले. कोकणी नाश्ता व त्यानंतर चहा घेऊन ताजेतवाने झाल्यावर मोहिमेचे नियम, खबरदारी व आवश्यक सूचना दिल्या गेल्या आणि स्थानकाबाहेरच उभ्या असणाऱ्या दोन टेम्पो ट्रॅव्हलर सर्वांना घेऊन मार्गस्थ झाल्या. वाटेतच स्वतःच्या वाहनाने आलेली मुंबई आणि नाशिकची मंडळी देखील सामील झाली. पहिलं ठिकाण होतं विजयदुर्ग किल्ला. कार्यवाहकांनी पायथ्याशी पोहोचल्यावर सूचना देताच स्थानिक गाईड सोबत गडाची भटकंती सुरु झाली. विजयदुर्ग पाहून सर्वांनी पुढचे ठिकाण अर्थात देवगड किल्ला व दीपगृह गाठले. दोन्ही ठिकाणं भटकून झाल्यावर तेथून पुढे रामगडच्या दिशेने प्रस्थान झाले. रामगड किल्ल्यातील भिंतींचे अवशेष आणि चढ-उताराचा अनुभव घेत संध्याकाळी आचरा येथे पहिल्या मुक्कामाला पोहोचलो. कोकणी पद्धतीची मेजवानी त्यात आमरस, सोलकडी व पारंपरिक कोकणी पदार्थ याचा सर्वांनी यथेच्छ समाचार घेतला. पुढे सर्वांची ओळखपरेड होऊन दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम व पुढील नियोजनाचे मार्गदर्शन केले गेले आणि दिवसाची सांगता झाली.

२६ एप्रिल उजाडला तो सर्वांना उत्सुकता असलेल्या कांदळवन सफारीच्या सुरुवातीने, कांदळवन सफारीत श्री. ओमप्रकाश आचरेकर यांनी निसर्गाची रंजक माहिती दिली. सफारीवरून आल्यावर पुढे चहा-नाश्ता उरकून भरतगड किल्ला पाहिला. किल्ल्यावर अजूनही काही अवशेष चांगल्या अवस्थेत आहेत. गडावरच्या आंब्याच्या बागेतून फिरताना झाडाखाली पडलेले आंबे उचलून त्याची चव चाखण्याचा मोह आवरला नसता तर विशेष. गडफेरी झाल्यावर दुपारी बांदिवडे गावात घरगुती कोकणी जेवणाचा फक्कड असा बेत झाला. यानंतर भगवंतगड व ओझर येथील शिवकालीन गुहा भ्रमंती झाली. रात्री मुक्कामासाठी मोहीम प्रमुख श्री. गुरुनाथ मयेकर यांच्या घरी पोहोचलो. गाव, समुद्र व मोरयाचा धोंडा पाहून मन भारावून गेले. त्या ठिकाणाबाबत सविस्तर माहिती घेत रात्री एकत्र गप्पा, जेवण आणि आनंद अनुभवला गेला.

२७ एप्रिल म्हणजेच मोहिमेच्या शेवटच्या दिवशी सर्वांनी बोटीने सिंधुदुर्ग (मालवण किल्ला) गाठला. अर्धा तास समुद्र प्रवास करून किल्ल्यावर पोहोचलो. पुढे गडदर्शन करत महाराजांच्या पायाचे व हाताचे ठसे, मंदिर, विहिरी व भुयारी रस्ते पाहून किल्ल्याची शान अनुभवली. किल्लाभ्रमंतीनंतर मालवण बाजारात कोकणी मेव्याची मनसोक्त खरेदी झाली आणि पुन्हा गुरुनाथ दादांच्या घरी दुपारच्या जेवणासाठी पोहोचलो. नंतरचा प्रवास होता निवती किल्ल्याचा. सायंकाळी निवतीच्या किल्ल्यावरून दिसणारा सूर्यास्त हा मोहिमेतील अविस्मरणीय क्षण ठरला.

तीन दिवसांच्या अविस्मरणीय सागरी दुर्ग सफरीचा शेवट कुडाळ रेल्वे स्थानकावर देवगड आंब्यांच्या खरेदीने कसा गोड झाला. किल्ल्यांची ओळख, समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य, कोकणी जेवणाची मेजवानी आणि सहकाऱ्यांची साथ, या सर्व आठवणी मनात कायमस्वरूपी साठवत पावले घराकडे वळली.

 ोटांवरील_बाप्पामारुतीराया व गणपतीबाप्पाआपल्या बहुतांश गडकोटांवर शक्ती-बुध्दीच्या या देवतांपैकी एकाची तरी हमखास प्रतिष्ठ...
02/09/2025

ोटांवरील_बाप्पा

मारुतीराया व गणपतीबाप्पा
आपल्या बहुतांश गडकोटांवर शक्ती-बुध्दीच्या या देवतांपैकी एकाची तरी हमखास प्रतिष्ठापना झालेली दिसते. मिश्रदुर्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या वासोट्यावर तर या दोहोंची शिल्पे अगदी बाजूबाजूला विराजमान दिसतात. बामणोलीहून वासोट्यावर जाताना बोटप्रवास झाल्यावर पुढील वाट कोयना अभयारण्यातून जाते. याच मार्गावर एकाच पाषाणात डावीकडे मारुती व उजवीकडे गणपतीच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात.

शब्दांकन आणि छायाचित्र - हार्दिक म्हात्रे.

 ोटांवरील_बाप्पानारायणगावजवळ सपाट प्रदेशात असलेल्या एका डोंगरावर नारायणगड आहे. गडावर हस्ताबाई मातेच मंदिर आहे. या मंदिरा...
31/08/2025

ोटांवरील_बाप्पा

नारायणगावजवळ सपाट प्रदेशात असलेल्या एका डोंगरावर नारायणगड आहे. गडावर हस्ताबाई मातेच मंदिर आहे. या मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेवर येऊन थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला वाड्याचे अवशेष आहेत. यात शरभ शिल्प कोरलेले दोन दगड आणि व्दारपट्टीवर कोरलेल्या गणपतीची सुंदर छोटीशी मुर्ती आहे.

शब्दांकन आणि छायाचित्र - सलिल मांद्रेकर.

 ोटांवरील_बाप्पातळेगाव – चाकण रस्त्यावर, तळेगावपासून ३ किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले इंदुरी गाव. याच ...
30/08/2025

ोटांवरील_बाप्पा

तळेगाव – चाकण रस्त्यावर, तळेगावपासून ३ किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले इंदुरी गाव. याच इंद्रायणी नदीच्या तीरावर भव्य इंदुरीचा किल्ला आहे. किल्ल्याच्या मध्यभागी कडजाई देवीचे मंदिर आहे त्या मंदिरासमोर हे गणेश शिल्प आहे.

शब्दांकन आणि छायाचित्र - सलिल मांद्रेकर.

 ोटांवरील_बाप्पाराजियांच्या गडावरील गडगणेश - स्वराज्याच्या प्रथम राजधानीचा मान मिरवणाऱ्या राजगडावरील सुवेळा माचीवर असणार...
29/08/2025

ोटांवरील_बाप्पा

राजियांच्या गडावरील गडगणेश - स्वराज्याच्या प्रथम राजधानीचा मान मिरवणाऱ्या राजगडावरील सुवेळा माचीवर असणारे हे गणरायाचे शिल्प. माचीवरील भल्यामोठ्या हत्तीप्रस्तर आणि त्यावरील अंबारी सदृश्य भासणाऱ्या झुंजार बुरुजाच्या पुढे नेढ्याकडे जाणाऱ्या वाटेवर उजव्या बाजूच्या तटाच्या देवळीतील चौकटीमध्ये ही मूर्ती स्थित आहे. शेंदूर लेपण केलेली ही गणेशप्रतिमा चार हातांची आहे, पैकी मागच्या दोन्ही हातात शस्त्र आहेत, डाव्या हातात मोदक असून उजवा हात मांडीवर ठेवलेला आहे.

शब्दांकन आणि छायाचित्र - हार्दिक म्हात्रे.

Address

Mumbai
400025

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shivashourya Trekkers शिवशौर्य ट्रेकर्स:

Share