06/09/2025
*गणेशोत्सवात पुन्हा सजीव झाले ग्रामीण जीवन!*
: तिमाजी नगर तरुण मंडळ, आरळगुंडी यांची आगळीवेगळी गणेशोत्सवात सजावट
गणेशोत्सव हा केवळ भक्तिभावाचा नव्हे, तर संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य जपणारा सोहळा आहे. याची प्रचीती यंदा
आरळगुंडी येथील तिमाजी नगर तरुण मंडळ, यांनी उभारलेल्या आगळ्या-वेगळ्या देखाव्यातून येत आहे. १९७० ते ८० च्या दशकातील ग्रामीण घरगुती जीवनशैली मंडपात साकारण्यात आली असून, पाहणाऱ्यांना जणू आपल्या बालपणात आणि गावोगावच्या जुन्या आठवणीत घेऊन जात आहे.
बांबूच्या कड्यांचे छप्पर, मातीच्या भिंती, लाकडी पाळणे, भिंतीवर लटकणारे दिवे व भांडी, कोपऱ्यातील देवघर, रंगीबेरंगी चटया आणि जुन्या काळातील स्वयंपाकघरातील साधने… या साऱ्यांनी तयार झालेला वातावरणीय आभास खऱ्या अर्थाने ‘गावोगावच्या घराचा’ अनुभव देतो. या सजावटीकडे पाहून वयोवृद्धांच्या डोळ्यांत त्या आठवणी दिसत होत्या. तर तरुणाईला आपल्या संस्कृतीचे वैभव प्रत्यक्ष जाणवते.
आजच्या काळात झगमगत्या रोषणाईपेक्षा पारंपरिक जीवनशैलीचा देखावा अधिक मनाला भिडणारा ठरत आहे. आधुनिकतेच्या वावटळीत आपली संस्कृती आणि मुळे हरवू नयेत, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित होताना दिसतो. गणेशोत्सव हे केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक बंध मजबूत करणारे पर्व असल्याचे या सादरीकरणातून अधोरेखित झाले आहे.
तिमाजी नगर तरुण मंडळ, आरळगुंडी हे केवळ सजावटीपुरते मर्यादित राहत नाही. आठ दिवसांच्या उत्सव काळात महिलांसाठी होम मिनिस्टर आणि हळदीकुंकू समारंभ, मुलांसाठी नाटिका, अवयवदान जनजागृती, कीर्तन-भजन, लेझीम-भजन यांसारखे उपक्रम मंडळ आयोजित करते. त्यामुळे उत्सव हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहत नाही, तर समाजाभिमुख संदेश देत सामाजिक बांधिलकीही जपतो.
अध्यक्ष विनायक आनंदा पाटील, उपाध्यक्ष वैभव वसंत शेटके, खजिनदार श्रीकांत भिकाजी पाटील, सचिव अजित संभाजी पाटील आणि सेक्रेटरी सदानंद शिवाजी पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला गेला असून, संपूर्ण गावकऱ्यांच्या सहभागामुळे हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने एक ‘संस्कृती सोहळा’ ठरला आहे.
या सादरीकरणातून एक महत्त्वाचा संदेशही पुढे येतो—परंपरा आणि आधुनिकता हातात हात घालून चालली पाहिजे. झगमगाटाच्या आहारी जाऊन आपली मुळे विसरायची नाहीत, तर त्या मुळांवरच भविष्याची उभारणी करायची आहे. गणेशोत्सवाचा खरा हेतूही हाच आहे: भक्ती, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा संगम घडवणे हा हेतू होता असे मंडळात असलेल्या मुलानी सांगितले.....
मंडपात पाऊल टाकताच जणू एखाद्या खेडेगावच्या घरात आल्याचा भास होतो. बांबूच्या कड्या, मातीच्या भिंती, लटकणार शिक त्यावर टपोरे माठ, चुलीवर ठेवलेली भांडी, ओटीवर बसवलेली तांब्या-पितळी भांडी, भिंतीला लावकेला कंदील हे सारे वातावरण पाहून कुणाच्याही नजरेसमोर आपोआपच आपल्या आजीआजोबांची आठवण येते.ही सारी दृश्यं खेड्याची उबदारता पुन्हा जागवतात. सणाच्या काळात आपली मूळ संस्कृती, आपले मूळ गाव आणि आपल्या मातीचा गंध विसरू नये, हा संदेश या सजावटीतून अधोरेखित होतो.
*- पवन होन्याळकर* (महागोंड)