12/04/2026
*भोंदूगिरीविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज : सत्यशोधक परिषदेत आवाहन*
कोल्हापूर :
क्रांतिबा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित *एकदिवसीय जिल्हास्तरीय ‘फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी सत्यशोधक परिषद’* उत्साहात पार पडली. या परिषदेत विविध मान्यवरांनी अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि फलज्योतिषाविरोधात प्रभावी मते मांडत वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले.
पहिल्या सत्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले उपस्थित होते. त्यांनी फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या कृतिशील परंपरेला पुढे नेण्याची गरज अधोरेखित केली. *‘जोतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म आणि आजचे वास्तव’* या विषयावर बोलताना सत्राचे मुख्य वक्ते *डॉ. अरुण शिंदे* म्हणाले, *“जोतिबा फुले यांनी मानवतावादाच्या भूमिकेतून विषमता आणि शोषण वाढवणाऱ्या कर्मकांडांची चिकित्सेची परंपरा सुरू केली. ही चिकित्सक परंपरा आपण पुढे नेली पाहिजे.”* त्यांनी फुले यांच्या चळवळी व साहित्याच्या माध्यमातून मानवतावादाची पेरणी कशी झाली आणि त्यांनी वैदिक परंपरांना पर्याय देत माणसाचे जीवन सुसह्य करण्याचे मार्ग कसे दाखवले, यावर प्रकाश टाकला. पहिल्या सत्राचे अध्यक्ष म्हणून बोलताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष *वसंतराव मुळीक* यांनी *“फुले यांनी लोकांना पर्याय देऊन त्यांचे जीवन सुलभ केले. त्याचप्रमाणे आजच्या चळवळींनीही लोकांशी संवाद साधत व्यवहार्य पर्याय दिले पाहिजेत”* असे मत व्यक्त केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य प्रविण चौगले (जिल्हा उपाध्यक्ष, कोल्हापूर अंनिस), प्रमोद शिंदे (जिल्हा कार्याध्यक्ष, कोल्हापूर अंनिस), रेश्मा खाडे (राज्य कार्यवाह, जोविनी विभाग अंनिस) उपस्थित होते.
दुपारच्या जेवणानंतर स्वाती कृष्णात, निशांत शिंदे, मुक्ता शिंदे यांनी दुसऱ्या सत्राची सुरवात चळवळीच्या गाण्याने यांनी केली. या सत्रात *‘फलज्योतिष आणि बुवाबाजीचे आव्हान’* या विषयावर बोलताना *प्राचार्य डॉ. नितीन शिंदे* यांनी खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यातील फरक स्पष्ट केला. *“खगोल हे वास्तव विज्ञान असले तरी त्यावर आधारित फलज्योतिष हे थोतांड आहे. काही ज्योतिषी राहू-केतू, सूर्य आणि चंद्र यांना ग्रह म्हणून मांडून काल्पनिक चित्र उभे करतात आणि सामान्य नागरिकांची फसवणूक करतात”* असे सांगून त्यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले. त्यांनी फलज्योतिष बरोबरच वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, राशींचे खडे हे सगळे थोतांड असल्याचे सांगितले.
दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष *डॉ. बी. एम. हिर्डेकर* यांनी *“विवेकवादाचा आधार घेऊन लोकांनी बुवाबाजीपासून दूर राहिले पाहिजे. राजकारणी आणि भोंदू यांची युती समाजासाठी धोकादायक ठरत आहे,”* असे सांगितले. दुसऱ्या सत्रकारिता जिल्हा प्रधान सचिव रामदास देसाई, प्रा. डॉ. जेटीथोर, राज्य सहकार्यवाह, विवेकवाहिनी अंनिस, पच्छापुरे मॅडम, अश्विनी कांबळे आदी उपस्थित होते.
परिषदेचे उद्घाटन ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे’ मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या बुवाबाजीविरोधी विशेषांकाच्या प्रकाशनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी केले. सूत्रसंचालन संघसेन जगतकर व स्वाती कृष्णात यांनी केले, पहिल्या सत्राचे आभार मानसी बोळूरे आणि दुसऱ्या सत्राचे आभार मुक्ता निशांत यांनी मानले.
🍁