14/04/2026
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन-प्रवास, इतिहास, आणि कार्य
भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14,एप्रिल 1891 रोजी झाला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांचे सुपुत्र होते. बाबासाहेबांचे वडील ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते. ते संत कबीरांचे अनुयायी होते डॉ भीमराव रामजी आंबेडकर जेमतेम दोन वर्षांचे असताना त्यांचे वडील सेवा निवृत्त झाले.तर ते जेमतेम सहा वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले.डॉ.आंबेडकर यांचे शालेय शिक्षण सातारा येथे घेत होते. तेव्हाच दुर्दैवाने डॉ.आंबेडकरांनी त्यांची आई गमावली आणि त्यांच्या आत्याने त्यांचे संगोपन केले. भारतात अस्पृश्य असणे काय असते याचा धक्कादायक अनुभव त्यांना शालेय जीवनात आला. त्यांनतर ते मुंबईला राहायला आले. शालेय शिक्षणादरम्यान त्यांना अस्पृश्यतेचा अभिशाप सहन करावा लागला. डॉ.आंबेडकरांनी एल्फिन्स्टन कॉलेज, बॉम्बे येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले, ज्यासाठी त्यांना बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून शिष्यवृत्ती मिळत होती. पदवी संपादन केल्यानंतर त्यांना करारानुसार बडोदा संस्थानमध्ये जावे लागले. बडोद्यात असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. 1913 या वर्षात डॉ. आंबेडकरांची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्यासाठी विद्वान म्हणून निवड झाली.त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून 1915 आणि 1916 मध्ये अनुक्रमे एमए आणि पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते लंडनला रवाना झाले . तेथे त्यांना ग्रेज इन फॉर लॉमध्ये प्रवेश देण्यात आला आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये डी.एससीची तयारी करण्यासही परवानगी देण्यात आली. पण बडोद्याच्या दिवाणांनी त्यांना भारतात परत बोलावले. पुढे त्यांनी बार-ऍट -लॉ आणि डी.एस्सी. पदवी देखील मिळवली. त्यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठातही काही काळ शिक्षण घेतले.
त्यांनी ‘भारतातील जाती - त्यांची व्यवस्था , उत्पत्ती आणि विकास’ यावर अभ्यास केला. 1916 मध्ये त्यांनी ‘भारताचा राष्ट्रीय लाभांश - एक ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास’ हा प्रबंध लिहिला आणि पीएच.डी. पदवी मिळवली. "ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती'' या शीर्षकाखाली आठ वर्षांनंतर हा प्रबंध प्रकाशित झाला.ही सर्वोच्च पदवी प्राप्त केल्यानंतर, नंतर ते भारतात परतले आणि .बडोद्याच्या महाराजांचे लष्करी सचिव म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले.
अस्पृश्यतेच्या कारणास्तव त्यांना दिलेल्या अयोग्य वागणुकीमुळे त्यांना सेवा सोडणे भाग पडले. नोव्हेंबर 1921 डॉ. आंबेडकर मुंबईला परतले आणि सिडनहॅम कॉलेजमध्ये राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांचे वाचन चांगले असल्याने ते विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. पण लंडनमध्ये कायदा आणि अर्थशास्त्राचे शिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कोल्हापूरच्या महाराजांनी त्यांना आर्थिक मदत केली. 1921 मध्ये त्यांनी आपला प्रबंध लिहिला. "ब्रिटिश भारतातील इम्पीरियल फायनान्सचे प्रांतीय विकेंद्रीकरण" आणि त्यांनी लंडन विद्यापीठातून एम.एससी.ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठात काही काळ घालवला. 1923 मध्ये, त्यांनी डी.एससी. ही पदवी घेण्यासाठी "प्रॉब्लेम ऑफ रुपी,इट्स ओरिजिन अँड सोल्युशन" हा प्रबंध सादर केला. नवीन सुधारणांच्या संदर्भात पीडित- शोषित वर्गाच्या समस्यांमागची कारणे शोधून त्यांचे निराकरण करण्यासाठी, 3 एप्रिल 1927 रोजी ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.
महाड सत्याग्रह किंवा चवदार तळे सत्याग्रह हा महाड (सध्या रायगड जिल्ह्यात ), महाराष्ट्र , भारत येथे अस्पृश्यांना सार्वजनिक टाकीतील पाणी वापरण्याची परवानगी देण्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 20 मार्च 1927 रोजी केलेला सत्याग्रहहोता. हा दिवस (२० मार्च) भारतात सामाजिक सक्षमीकरण दिन म्हणून पाळला जातो. 1928 मध्ये ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, बॉम्बे म्हणजेच मुंबईच्या शासकीय विधि महाविद्यालयामध्ये प्राध्यापक झाले आणि 1 जून 1935 रोजी ते त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. 1938 मध्ये राजीनामा देईपर्यंत ते याच पदावर राहिले.
काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (२ मार्च १९३०) हा नाशिकमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक लढा होता, ज्याचा उद्देश अस्पृश्यांना मंदिरात प्रवेशाचा आणि पूजा करण्याचा समान अधिकार मिळवून देणे हा होता. १५,००० हून अधिक दलित समाज बांधवांच्या सहभागासह, हा लढा सामाजिक समता आणि जातीयता नष्ट करण्यासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला .
13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे पीडित- शोषित वर्गाची प्रांतीय परिषद झाली. या परिषदेत त्यांनी एक घोषणा करून हिंदूंना हादरा दिला. "मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही" त्यांच्या हजारो अनुयायांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला.1936 मध्ये त्यांनी ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’ महार परिषदेला मार्गदर्शन केले आणि हिंदू धर्माच्या त्यागाचा पुरस्कार केला.
15 ऑगस्ट 1936 रोजी त्यांनी पीडित- शोषित वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ या पक्षाची स्थापना केली. यामध्ये मुख्यतः कामगारांची संख्या मोठी होती.
1938 मध्ये काँग्रेसने ‘अस्पृश्य’ या नावामध्ये बदल करणारे विधेयक आणले. त्यावर डॉ.आंबेडकर यांनी टीका केली. त्यांच्या दृष्टिकोनातून नाव बदलणे हा समस्येवरचा उपाय नव्हता.
1942 मध्ये, भारताच्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेत, कामगार सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1946 मध्ये ते बंगालमधून संविधान सभेवर निवडून आले. त्याच वेळी त्यांनी ‘शुद्र कोण होते? (Who were Shudras?)’ हे आपले पुस्तक प्रकाशित केले.
स्वातंत्र्यानंतर, 1947 मध्ये, नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांची कायदा आणि न्याय मंत्री म्हणून नियुक्ती झाली. परंतु 1951 मध्ये त्यांनी काश्मीर प्रश्न, भारताचे परराष्ट्र धोरण आणि हिंदू कोड बिल, याबाबत नेहरूंच्या धोरणावरून मतभेद व्यक्त करत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यामधील त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून, 1952 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने, त्यांना LL.D ची पदवी बहाल केली. 1955 मध्ये त्यांनी थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स हे आपले पुस्तक प्रकाशित केले.
12 जानेवारी 1953 रोजी उस्मानिया विद्यापीठाने, डॉ.बी.आर. आंबेडकर यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली. "मी हिंदू म्हणून मरणार नाही" ही 1935 साली येवला इथे केलेली आपली घोषणा, त्यांनी अखेर 21 वर्षांनंतर खरी ठरवली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर इथल्या ऐतिहासिक समारंभात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला
1954 मध्ये नेपाळ मध्ये काठमांडू इथे झालेल्या "जागतिक बौद्ध धर्म परिषदेत", बौद्ध भिक्खूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना "बोधिसत्व" ही पदवी प्रदान केली होती. विशेष म्हणजे डॉ.आंबेडकर हयात असतानाच त्यांना बोधिसत्व ही पदवी बहाल करण्यात आली होती.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतरच्या सुधारणांमध्येही त्यांनी योगदान दिले. याशिवाय रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेतही बाबासाहेबांनी मोलाची भूमिका बजावली. बाबासाहेबांनी हिल्टन यंग कमिशनसमोर मांडलेल्या संकल्पनेवर मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली होती.
अस्पृश्यता निर्मूलन व जातीअंतासाठी त्यांनी केलेले कार्य दिशादर्शक ठरले.सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. “मूकनायक”पाक्षिकातून अस्पृश्यांच्या अन्यायाला वाचा फोडली.अस्पृश्यांच्या परिषदांमधील सहभाग,बहिष्कृत हितकारिणी सभा,कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट, चवदार तळे आंदोलन, मनुस्मृतीचे दहन , समाज समता संघ, धर्मांतराची घोषणा,संविधान सभेचे सदस्य (१९४६ – १९५०), भारताचे केंद्रीय कायदा व न्यायमंत्री (१९४७ – १९५१),राज्यसभा सदस्य (१९५२ – १९५६) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, हिंदू कोड बिल,
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे.
डॉ. आंबेडकरांचा हा दिमाखदार जीवन प्रवास, त्यांच्या अभ्यासू आणि कृतीशील व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवतो. सर्वात प्रथम, त्यांनी अर्थशास्त्र, राजकारण, कायदा, तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान संपादन केले. शिक्षण घेताना त्यांना अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण त्यांनी आपले आयुष्य केवळ वाचन-अभ्यास आणि ग्रंथालयात व्यतीत केले नाही. त्यांनी आकर्षक पगाराची उच्च पदे नाकारली, कारण ते शोषित वर्गातील आपल्या बधुंना विसरले नाहीत. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य समता, बंधुता आणि मानवतेसाठी समर्पित केले. पिचलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.
त्यांचा जीवन इतिहास पाहिल्यावर, त्यांचे मुख्य योगदान आणि त्यांची प्रासंगिकता अभ्यासणे आणि त्याचे विश्लेषण करणे आवश्यक आणि योग्य आहे. एका मतप्रवाहानुसार तीन मुद्दे आजही अधिक महत्त्वाचे आहेत. भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय समाज आजही अनेक आर्थिक, सामाजिक समस्यांना तोंड देत आहे. या समस्या सोडवण्यामध्ये, डॉ. आंबेडकरांचे विचार आणि कृती आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतील.
डॉ.बी.आर.आंबेडकर,भारतीयसंविधानाचे शिल्पकार, कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ आणि महान समाजसुधारक यांच्या जयंतीनिमित्त “बंध फाउंडेशन” च्या हार्दिक शुभेच्छा!
आज आपण अशा महापुरुषाचा सन्मान करूया, ज्यांनी अशा भारताचे स्वप्न पाहिले होते जिथे प्रत्येक नागरिकाला सन्मानाने आणि समानतेने वागवले जाईल. त्यांची ही दृष्टी आपल्या राष्ट्राला सदैव मार्गदर्शक ठरो. 🙏"