12/01/2026
कष्टकऱ्यांचा बा : दिबा
दिनकर बाळू पाटील (जन्म: १३ जानेवारी १९२६)
पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष,
महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ४ वेळा आमदार,
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि
रायगडचे दोन वेळा खासदार.
आजच्या काळात गल्लीतल्या पुढाऱ्यापासून ते दिल्लीतले पुढारी सुद्धा अब्जाधीश आहेत. परंतु ४०-५० वर्ष दिबांच्या हातात आमदार-खासदाररुपी राजकीय सत्ता असून सुद्धा त्यांनी त्याचा व्यक्तिगत स्वार्थासाठी कधीच फायदा घेतला नाही. एवढेच कशाला, आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिबांना त्यांच्या उभ्या आयुष्यात स्वत:चे राहते घर सुद्धा बांधता कधीच आले नाही. आज दिबांचे ‘संग्राम’ हे जे निवासस्थान आहे, ते सुद्धा दिबांच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून त्यांना बांधून दिलेले आहे. कारण दिबांनी आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त आपल्या कार्यकर्त्यांचे प्रेम कमावले आहे, पैसे नाही. असे प्रेम लाभलेला दुसरा कोणतही नेता आज सापडेल का?
दिबांनी राजकारणात संपूर्ण हयात घालवली. प्रत्येक राजकीय पक्षात बहुतेक पुढारी हे राजकीय स्वार्थापोटी आपला ‘वारस’ तयार करतात. परंतु दिबांनी आपल्या चार अपत्यांपैकी एकालाही वारसदार बनविण्याचा प्रयत्नही केला नाही. असा निस्वार्थपणा असलेला एक तरी नेता आजच्या घडीला आपल्या सापडेल का?
नवी मुंबई शहर उभारण्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीत घेण्याचा त्यावेळच्या प्रस्थापित राजकारणी आणि अधिकारी वर्गाचा डाव होता. परंतु ह्याविरोधात दिबांनी आवाज उचलला, लाठ्याकाठ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेले, अनेकजण ह्या लढ्यात जखमी झाले, पाच शेतकरी हुतात्मा झाले. पोलिसांच्या गोळीबाराचा निडरपणे सामना करत हा लढा शेतकऱ्यांनी जिंकला. तेव्हापासून देशात १२.५% टक्केचा कायदा अस्तिवात आला.
नवी मुंबईच्या भूमिपुत्रांसाठी दिबांचे जे कार्य आहे ते आजच्या तरुण पिढीला कळायला हवे. आजच्या DSLR घेऊन फोटो काढणाऱ्या, स्पोर्ट्स बाईक घेऊन मिरवणाऱ्या तरुण पिढीला कदाचित ठाऊक नसेल दिबा कोण होते परंतु त्यांच्या ह्या लढ्यामुळे इथे भूमिपुत्र टिकला आणि नुसता टिकला नाही तर आज जे काही सुगीचे दिवस येथील प्रकल्पग्रस्त पाहत आहे ते फक्त आणि फक्त दिबांच्या मुळेच आहे ह्याची जाण प्रत्येकाला असणे गरजेचे आहे.
शेवटी एकच सांगावेसे वाटते कि "झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हाच"
दिबांच्या जयंती निम्मित त्यांना विनम्र अभिवादन 🙏🏻