17/04/2024
*मनसे रावण ज्यो निकाले, राम उसके मनमें है!*
(रामनवमीच्या निमित्ताने)
आज आहे रामनवमी,प्रभू रामाचा जन्मदिवस! साऱ्या भारतीय समाज-मानसात आदर्शांच्या बाबतीत अत्युच्च शिखरावर असलेल्या प्रभू रामचंद्राची जयंती आज देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे!
राम हा जीवनाच्या सर्व क्षेत्रात, सर्व नात्यात आदर्श आहे. तो आदर्श पुत्र आहे, आदर्श बंधू आहे, आदर्श पति आहे, आदर्श पिता आहे, आदर्श शिष्य आहे, आदर्श मित्र आहे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो आदर्श राजा आहे, आदर्श राज्यकर्ता आहे!
आपल्या व्यक्तीगत जीवनाच्या व्यवहारात देखील राम हा जन्मापासून अंतापर्यंत व्यापलेला आहे!एखाद्याच्या घरी पुत्र जन्माला आला तर आपण म्हणतो "त्याच्या घरी राम जन्माला आला"! खेड्यात अजूनही दोन माणसे एकमेकांना भेटली की म्हणतात "राम राम"! एखाद्या गोष्टीत काही अर्थ उरला नाही तर आपण म्हणतो "त्यात काही राम उरला नाही"! एखाद्या समस्येवर हमखास उपाय असेल, तर आपण म्हणतो "रामबाण उपाय"! एखाद्याला स्वस्थ बसण्याचा सल्ला द्यायचा असेल, तर आपण म्हणतो "राम राम म्हणत बसा"! एखाद्याने अखेरचा श्वास घेतला की, आपण म्हणतो "त्याने अखेरचा राम म्हटला"! एवढेच नव्हे, तर त्याचे शव उचलताना व स्मशानभूमीपर्यंत नेताना आपण म्हणतो "श्रीराम जयराम जयजय राम!" मानवी जीवन व्यवहारात राम जसा जन्मापासून अंतापर्यंत व्यापलेला आहे, तसा तो आसेतू-हिमाचल व्यापलेला आहे! काश्मीरचा 'रामनाथ', हरियानाचा 'रामलाल', पंजाबचा 'रामसिंग', राजस्थानचा 'कुवर रामसिंह', बंगालचा 'रामकृष्ण', बिहारचा 'रामप्रसाद', उत्तर प्रदेशचा 'रामनरेश', ओरिसाचा 'रामबिहारी', मध्यप्रदेशचा 'रामसुंदरलाल', गुजराथचा 'राममल', महाराष्ट्राचा 'रामचंद्र', कर्नाटकचा 'रामप्पा', आंध्रप्रदेशचा 'रामय्या', तामिळनाडूचा 'रामस्वामी', तर केरळचा 'रामचंद्रन्'! जन्मापासून मरणापर्यनंत राम, काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत राम!
राम हा हिंदुत्व विचारांचा, हिंदूजीवनपद्धतीचा आदर्श आहे. आम्ही 'शत्रूविनाशाय' अशी प्रार्थना करत नाही, तर 'शत्रुबुद्धी विनाशाय' अशी प्रार्थना करतो! येथेही आमचा आदर्श रामच आहे! वालीचा वध करण्यापूर्वी रामाने वालीला अन्यायाचा मार्ग सोडून सुग्रीवास त्याचे राज्य परत करण्याची विनंती केली होती. म्हणजे शत्रूचा विनाश करण्यापूर्वी त्याने त्याच्या बुद्धीचा विनाश करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे 'वसुधैव कुटुंबकम्' ही संकल्पनाही आम्हा हिंदूंची आहे! या संकल्पनेमुळे दुसऱ्याच्या भूमीवर आमचा डोळा असत नाही. कारण या बाबतीतही आमचा आदर्श रामच आहे! रामाने वालीचा वध केला, पण त्याचे राज्य स्वतःस नाही घेतले, ते सुग्रीवास दिले. रावणाचा वध करून लंका जिंकली, पण स्वतःच्या राज्यास नाही जोडली, ती बिभीषणास दिली! शरणागतास रामाने नेहमी अभयच दिले आहे. अत्यंत शालीन, कुलीन, सालस, नेमस्त अशी रामाची मूर्ती जरी आपल्या डोळ्यासमोर येत असली, तरी तो 'कोदंडधारी' आहे, हेही लक्षात घ्यायाला हवे. अन्यायाचे, दुष्टशक्तीचे निर्दालन आणि सज्जनशक्तीचे संरक्षण करण्यास तो सदैव सिद्ध आहे! तसेच, रावणाचा पराभव एकट्याने करण्याचे सामर्थ्य स्वतःमध्ये असूनही त्याने वानरसेनेला बरोबर घेतले आहे, म्हणजे त्याने समाजाला बरोबर घेऊन दुष्ट शक्तीचा नाश केला आहे. येथे 'दुष्टशक्ती' विरुद्ध 'सज्जनशक्ती' जागृत करून ती कार्यान्वित करण्याचा त्याचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो.
रामाने परिटाच्या संशयासाठी सीतेला दूर केले, वानर जातीला आलिंगन दिले, एका शबरी नांवाच्या भिल्लीणीने दिलेली उष्टी बोरे खाल्ली! होता का त्याच्या मनात तथाकथित उच्च-नीचतेचा भाव? मग आमच्या मनात कसा येतो? या हीन विकृती आम्ही गाडून टाकायला नकोत का?
परीटाने संशय घेतला म्हणून रामाने सीतेचा त्याग करून सीतेवर घोर अन्याय केला, असे अनेकांना वाटते. केवळ सीतेचा विचार केला, तर ते खरेही आहे! पण येथे शेवटी रामाची अखेरची भूमिका कोणती होती हे लक्षात घेणे आवश्यक आहे! एकीकडे तो पुत्र आहे, एकीकडे तो बंधू आहे, एकीकडे तो पति आहे; पण त्याहीपेक्षा अखेर शेवटी तो एक राजा आहे, त्याची अखेरची भूमिका ही राज्यकर्त्याची आहे! त्यामुळे त्याचे शेवटचे पदकर्तव्य राज्यकर्त्याचे आहे, ज्यामध्ये 'जनतेच्या विश्वासास पात्र ठरणे' हे अभिप्रेत आहे -- कोणतीही किंमत मोजून! सीतेचा त्याग केल्यावर त्याने दुसरा विवाह तर केला नाहीच, पण त्याने सर्व सांसारिक सुखाचाही त्याग केला आहे, तो मृग-शैय्येवर निद्रा घेतो, मंचकावर नाही! राजकर्तव्य सोडल्यास, अत्यंत विरागी जीवन तो जगला आहे. कोणत्याही युग पुरुषांच्या बाबतीत आपल्याला हेच पाहायला मिळते. लोकमान्य टिळक असोत, क्रांतीवीर बाबाराव सावरकर असोत, की स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर असोत, त्यांच्या वैवाहिक जीवनात त्यांच्या पत्नींचा वैयक्तिक विचार केल्यास, त्यांचेवर अन्यायच झाला आहे असे वरकरणी दिसते. पण अशा थोर पुरुषांच्या बाबतीत त्यांनी जे ध्येय स्वीकारले होते, त्याबाबतची 'कर्तव्ये' निभावताना अन्य नात्यांवर झालेल्या परिणामांचा विचार दुय्यमच ठरतो, कारण त्याचे परिणाम त्यांच्या पत्नींबरोबर त्यांनी स्वतःही भोगलेले असतात! रामाच्या बाबतीत 'सीतेवर त्याने अन्याय केला' ही टीका म्हणूनच अप्रस्तुत ठरते!
चित्रकुटावरील राम-भरत भेट ही तर राज्यकर्ते कसे असावेत याचा वस्तुपाठच आहे! भरत रामाला म्हणतोय "रामा! राज्य मला नको, तो तुझा अधिकार आहे,तूच राजा हो!", तर राम भारताला म्हणतोय,"नाही नाही, वडिलांची आज्ञा, मातेची इच्छा मला पाळलीच पाहिजे, राज्य तूच कर!" राज्यपदाबाबतची दोघांची ही केवढी निरपेक्ष बुद्धी! आम्ही जर का रामाला आदर्श मानत असू, रामराज्य जर खरोखरच अपेक्षित असू, तर राज्यपदाबाबतची ही निरपेक्ष बुद्धी प्रथम जोपासायला हवी, अंगिकारायला हवी! आणि राज्यकर्त्यांकडून तशी अपेक्षा ठेवत असू, तर कोणत्याही क्षेत्रात स्वतः काम करताना "मै नहीं, तूही" हा विचार आचरणात असायला हवा!
राम हा आम्हा भारतीयांना सर्व बाबतीत असा आदर्श आहे! रामाने राज्यकर्ता म्हणून 'पदकर्तव्य' निभावताना प्राणप्रिय पत्नीचाही त्याग केला. हा आदर्श आमचा असेल, तर कोणत्याही ठिकाणी - अगदी आपल्या कार्यालयातील कामात देखील त्या पदकर्तव्यास प्राधान्य द्यायला हवे, स्वतःच्या स्वार्थास नव्हे! नुसते अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहून उपयोगाचे नाही. आमच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून त्याची आवश्यकता वादातीत आहेच, पण त्याचबरोबरीने किंवा त्याहीपेक्षा अधिक आमच्या हृदयमंदिरातील राम सदैव सक्रिय जागृत असणे अधिक महत्वाचे आहे!राम तुमच्यात आहे, माझ्यात आहे, चराचरात आहे, मनामनात आहे! एका चित्रपट गीतात म्हटलंय...
"राम तो घर घर मे है,
राम हर आँगनमे है I
मनसे रावण जो निकाले,
राम उसके मनमे है,
राम उसके मनमें है II"
त्यामुळे मला वाटते की आवश्यकता आहे, ती मनातल्या रावणाला गाडून टाकण्याची आणि मनातल्या निद्रिस्त रामाला 'जागृत' करण्याची! आजच्या रामनवमीच्या निमित्ताने आपण स्वतःपासून सुरवात करून, प्रथम स्वतःच्या मनातील राम 'जागृत' करण्याचा मनापासून प्रयत्न करू या! स्वतःसह समस्त भारतीयांच्या मनातला हा राम ज्यावेळी खरोखरीच जागृत होईल, तेव्हाच आपल्याला अपेक्षा करता येईल...
" रामराज्य या हिंदू भूमीवर
पुनश्च यावे, यावे लौकर I
सद्गुण वैभव नित्य निरंतर
सुवर्णभूमी सार्थ खरोखर!"
© विश्वास सहस्रबुद्धे.