Nashik Jalgaon Dhule Nandurbaar Buldhana Akola District CKP Community

  • Home
  • India
  • Jalgaon
  • Nashik Jalgaon Dhule Nandurbaar Buldhana Akola District CKP Community

Nashik Jalgaon Dhule Nandurbaar Buldhana Akola District CKP Community Connecting CKP Community

मागील महिन्यापासून पार्लेकर कायस्थ मासिक चा वर्गणीदार झालो त्या निमित्ताने डिसेंबर महिन्यापासून संपर्कात होतो. सुधाकर श्...
02/03/2026

मागील महिन्यापासून पार्लेकर कायस्थ मासिक चा वर्गणीदार झालो त्या निमित्ताने डिसेंबर महिन्यापासून संपर्कात होतो. सुधाकर श्रोत्री साहेब शेवट पर्यंत ऍक्टिव्ह होते. त्यांचे वय एवढे असेल हेही कधी जाणवले नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

Pushkar Shrotri Father Death : सुधाकर श्रोत्री यांनी तब्बल ६५ वर्षे टाइम्स वृत्त समुहात काम करत वृत्तपत्र वितरण व्यवस्थेचा भक्कम प.....

01/03/2026

*मराठी भाषादिनानिमित्त संकल्प करूयात,*
*भाषा जपायची असेल तर भाषा वापरूयात.*

*आपल्या मराठीचा वापर शक्य तितका करायचा प्रयत्न करूयात.*

१.) https://share.google/7uKeI5rEUq3ngNkm7
शब्दांचे अर्थ ठाऊक नसतात, कुठे शोधाल?
बृहद्कोश वापरा ! २ लाखांपेक्षा जास्त शब्दांचा अचुक अर्थ मिळेल इथे.
सर्व जून्या ते नवीन मराठी शब्दांचा कोश, _*'बृहद्कोश.'*_

२.) https://share.google/Xr60MW5llU8T7eloN मराठी 'गूगल', मराठी 'विकिपीडिया', मराठीतला सर्वांत मोठा 'एन्सायक्लोपीडिया', म्हणजेच _*'मराठी विश्वकोश'.*_ फुलाफळांपासून, झाड, औषध, कोणतीही मोठी व्यक्ति, कोणताही विषय त्याची विश्वासार्ह (authentic) माहिती इथे मिळेल.

३.) _*स्वरचक्र मराठी ॲप (अनुप्रयोग).*_
मराठी टंकलेखनासाठी अत्युत्कृष्ट पर्याय.
मराठी लिहा, मराठी कळपाटावरून, तेही अचूक.
Swarachakra - Marathi https://share.google/6aQam0s0IJQhNj1Dl

४.) https://share.google/UqSzrMlTkJIwmWZdV
Translator (भाषांतरकार/अनुवादक) म्हणून काम करता?Terms (परिभाषा) कळत नाहीयेत? इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द शोधा इथे, हा आहे _*मराठी शब्दकोश.*_

५.) _*महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ*_ https://share.google/83IPWJORMxSXw2MiS आंबेडकरांचे चरीत्र असो वा महात्मा फुल्यांचे समग्र साहित्य, वास्तुकला, शिल्पकला, पुरातत्व, संगणकशास्त्र, गणित इ. अनेक दुर्मिळ पुस्तकांचा खजिना, तोदेखील फुकट !
वाचनवेड्यांनी आजच भेट द्या !

चला, मराठी वापरण्याची सुरुवात स्वतःपासून करूयात !

*जय मराठी !*
*जय महाराष्ट्र !!*

फोडिले भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ॥

26/02/2026

२७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिनानिमित्त खास लेख
" मराठी माणसाची भाषिक जबाबदारी "

" परभाषेतही व्हा पारंगत , ज्ञानसाधना करा, तरी।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका ॥
भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे।
गुलाम भाषिक होऊनि आपल्या प्रगतिचे शिर कापु नका ॥"

या काव्यातून कुसुमाग्रज यांनी संदेश दिला आहे की इंग्रजी शिकलात तरी चालेल.भाषा ही लहान किंवा मोठी नसते.भाषा ही भाषा असते.एकापेक्षा अधिक भाषा आपल्याला आल्या पाहिजेत.पण ज्या मानसिकतेतून आपण इंग्रजीकडे वळत आहोत ते मात्र बरोबर नाही.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी भाषेवर हिंदी भाषेचे आक्रमण सुरू झाले. हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला त्यामुळे हिंदीचा आदर करण्यास हरकत नाही परंतु दोन मराठी भाषिक आपापसात मराठीत बोलण्याऐवजी हिंदीत बोलू लागले तेव्हां ती धोक्याची घंटा आहे असे वाटू लागले. महाराष्ट्रात परभाषिक विक्रेते आले त्यांना मराठी शिकणे गरजेचे होते जेव्हां सर्वांनी त्यांच्याशी मराठीत बोलण्यास सुरवात केली तेव्हां त्यांनी मराठी भाषा आत्मसात केली.

आपण मराठी भाषेची सध्या काय परिस्थीती आहे याचा विचार करू.महाराष्ट्रात मातृभाषेनुसार लोकसंखेच्या टक्केवारीच्या उपलब्ध आकड्यांवरून मराठी भाषिकांची संख्या १९७१ साली ७६.५ टक्के , १९८१ मध्ये ७२.८ टक्के , १९९१ साली ७३.३ टक्के तर २००१ साली मराठी भाषिकांचा टक्का ६८.८ टक्के इतका झाला. परंतु याच काळात हिंदी व इतर भाषिकांची संख्या वाढली. मराठी माणसे नोकरीनिमित्त परदेशांत अथवा परराज्यांत गेली असली तरी मराठी बोलणाऱ्यांची संख्यासुध्दा घटली आहे.

इंग्रज भारतातून गेले परंतु इंग्रजी भाषेचा पगडा अद्याप आहे. परदेशात अथवा इतर राज्यात नोकरी मिळण्यासाठी इंग्रजी आवश्यक असल्याने अनेकजण आपल्या मुलांना मातृभाषेत शिक्षण न देता इंग्रजी शाळेत घालत आहेत.त्यामुळे मराठीसह इतर भाषेच्या शाळा बंद पडत आहेत.

इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना मराठी भाषेविषयी आपुलकी वाटणार नाही. ते मराठी भाषेतील वाड्मयाचा आस्वाद सुध्दा घेऊ शकणार नाहीत.त्यामुळे त्यांना "श्यामच्या आई " तील संस्कार कळणार नाहीत.केशवसुत -कुसुमाग्रज यांच्या कविता त्यांच्या ओठांवर रेंगाळणार नाहीत. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कथा कळणार नाहीत आणि हीच परिस्थिती कायम राहिली तर मराठी भाषा मरणासन्न अवस्तेतच असेल.खर म्हणजे९९ वर्षापूर्वी ही भिती इतिहासाचार्य राजवाडे यांनी १९२६ साली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदावरून मनोगत व्यक्त करताना केली होती.परंतु मराठी भाषेचे कैवारी असलेले त्याच काळातील एक कवी गंगाधर रामचंद्र मोगरे यांनी आपल्या एका कवितेत म्हटले आहे.

म्हणतात जे मराठी भाषा होणार ही नष्ट
मिळणार काय करुनी हिला वाचवावया कष्ट
त्यांना हेच पुसा की मरणोन्मुख होय आपुली माय
म्हणुनी औषध काही पुत्रीदेऊ नये तिला काय ?

कवी मोगरे यांनी मराठी भाषिकांची संख्या घटत आहे हे मान्य करून त्यावर ठोस पावले उचलली पाहिजेत असे सुचित केले आहे. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या माणसांनी परराज्यात मराठी मंडळ स्थापन करून साहित्यिक चळवळ सुरू केली आहे.परदेशात राहूनही मराठी भाषा वाचवण्यासाठी अनेक देशांत प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेत मराठी नागरिकांनी "लिटरामीट " हा उपक्रम राबवण्यात येतो.यात संशोधक , माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ , विद्यापीठातील संशोधक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील मराठी व्यक्ती एकत्र येतात व मराठीत आपण लिहिलेलं साहित्य सादर करतात. तसेच उत्तर अमेरिकेत 'एकता ' नावांचा अंक दर तीन महिन्यांनी प्रकाशित केला जातो. हा उपक्रम गेले तीस वर्ष राबवला जात आहे.

परदेशात तसेच परराज्यात राहणारी मराठी माणसे मराठी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसाची मराठी भाषा वाचवणे व तिला वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.

साहित्य संस्थांकडून अपेक्षा

१ - अनेकांतून एकता साधण्याचा प्रयत्न करावा -- सध्या अनेक जिल्ह्यात , शहरांत विविध संस्थांच्यातर्फे साहित्यिक कार्यक्रम राबवले जातात. असे कार्यक्रम करायचे झाल्यास कार्यकर्ते मिळत नाहीत , देणगी जमा करणे कठीण जाते तसेच प्रेक्षक उपस्तित रहात नाहीत. मराठी भाषा संवर्धन हा एकमेव उद्देश असणाऱ्या सर्व संस्थांनी एकत्र भव्यदिव्य उपक्रम राबवावेत.

२ -- साहित्य संमेलनाचे विकेंद्रीकरण करावे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नवोदितांना फारशी संधी मिळत नाही.त्यासाठी साहित्य संमेलन तालुका , जिल्हा , राज्य पातळीवर आयोजित केली तर जास्तीत जास्त जणांना संधी मिळू शकेल.

३-- पुस्तक प्रकाशनासाठी सहकार्य करावे -- अनेकजण विपुल लेखन करत असतात परंतु फारच थोडे जण पुस्तक प्रकाशित करतात.काही जणांना आर्थिक अडचण असते तर काहीजणांना प्रकाशक , वितरक यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही. यासाठी साहित्यसंस्थांनी योग्य सहकार्य करावे.

४--वाचनालये व ग्रंथालये सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत - शासनाने गाव तेथे ग्रंथालय योजना सुरू केली आहे. देशातील एकूण ग्रंथालयांपैकी पंचवीस टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत. ज्या गावांत ग्रंथालय नसेल तेथे सुरू करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत.

५-- लेखन कार्यशाळा सुरू कराव्यात -- अनेकांना लेखनाची आवड असते पण योग्य मार्गदर्शनाअभावी ते लेखन करू शकत नाहीत. नवोदितांसाठी काव्य लेखन , कथा , कादंबरी , निबंध , नाटक , एकांकिका , कश्या लिहाव्या यासाठी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाले तर अनेक नवोदित दर्जेदार लेखन करू शकतील.

६- शाळा व महाविद्यालय येथे वाड्मयमंडळ सुरू करावीत - लहान वयात वाड्मयाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळा व महाविद्यालय येथे वाड्मय मंडळ सुरू करावे.

७ -जागतिक पुस्तक दिन साजरा करावा - २३ एप्रिल हा जागतिक पुस्तकदिन म्हणून सर्व शाळा ,वाचनालय येथे साजरा करून विविध उपक्रम राबवावेत.

८- पुस्तक वाचून प्रतिक्रिया द्याव्यात - वाचकांनी पुस्तक वाचल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया द्याव्यात त्यामुळे लेखकाला प्रोत्साहन मिळते.समजा त्याच्या लेखनात दोष असतील तर ते दुरुस्त करता येतील. मित्रमंडळींना चांगल्या पुस्तकाची शिफारस करावी.

९- बालसाहित्य संमेलनास प्रोत्साहन द्यावे - दरवर्षी शाळेत स्नेहसंमेलन आयोजित करून करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात.त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.त्याच प्रमाणे बालसाहित्य संमेलन आयोजित करून साहित्यिकांना बोलवावे त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल.

१०- बाल साहित्य निर्मितीस प्रोत्साहन द्यावे - मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली की त्यांना लेखनाची पण आवड निर्माण होते.त्यानां योग्य मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले तर तो मोठा साहित्यिक होऊ शकेल.

सर्वसामान्यांची जबाबदारी

कोणतीही संस्था सुरू करून उपक्रम राबवायचे असतील तर पुढील तीन गोष्टी जुळून याव्या लागतात.

१ - नेत्याचे नेत्रुत्व - तन , मन , धन अर्पण करून , झोकुन देऊन संस्था चालवण्याची तयारी असलेल्या व्यक्तीने पुढाकार घेतला तरच संस्था स्थापन होते.

२- कार्यकर्त्यांचे कर्तुत्व - कोणतीही एक व्यक्ती संस्था सुरू करू शकत नाही तर त्याला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असणाऱ्या सहकार्यांची साथ आवश्यक असते.

३- दात्याचे दातृत्व - कोणताही उपक्रम राबवायचा असला तर त्याला समाजाकडून निधी मिळणे आवश्यक आहे.

" महाराष्ट्र माझा आणी मी महाराष्ट्राचा " हे बोलून चालणार नाही तर महाराष्ट्राची राज्यभाषा " मराठी " वाचवली पाहिजे.ती सर्व मराठी माणसांची जबाबदारी आहे. त्यासाठी खालील सवय लावून घेणे गरजेचे आहे.

१ - साहित्य संस्थेत सहभागी व्हावे - आपल्या परिसरातील साहित्य संस्थेत सक्रिय सहभाग घ्यावा. जागोजागी वाचनकट्टा सुरू करून किमान आठवड्यातून एखादा कार्यक्रम तरी आयोजित करावा.

२--कार्यक्रमास उपस्थित राहावे -- सध्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम आयोजित करताना प्रेक्षक कसे जमवायचे ? हा प्रश्न पडतो. यासाठी प्रत्येक मराठी प्रेमींनी प्रत्येक मराठी कार्यक्रमास उपस्थित राहून आयोजकांना प्रोत्साहन द्यावे.

३- पुस्तके भेट द्या - सध्या मराठी पुस्तकांची विक्री होत नाही.यासाठी मराठी माणसांनी लग्न , वाढदिवस अश्या समारंभात पुस्तके भेट द्यावीत.

४ -- मुलांना मराठी शाळेत घालावे -- अनेक मानसशास्त्रज्ञांच्या मते मुलांना मातृभाषेत शिक्षण दिले तर त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास चांगला होतो.

५- मराठीत बोला मराठीत लिहा - स्वभाषा म्हणजे आपल्या संस्कृतीशी जोडणारा सुवर्णसेतूच.त्यामुळे आपल्या मातृभाषेपासून दूर जाणे योग्य नाही.समाजाच्या अस्तित्वासाठी मातृभाषेचे संवर्धन होणे गरजेचे आहे.आपल्या कुटुंबात ,मित्रमंडळ , सहकारी यांच्यात मराठी लिहिणे , बोलणे गरजेचे आहे.

६--समाज आणी मराठी - मराठी भाषेसाठी समाजातील आपले व्यवहार अगदी रस्त्यावर ,भाजीबाजार ,दुकाने ,रेल्वे ,बस , इत्यादी ठिकाणी बोलतानामराठी भाषा वापरावी.बहुसंख्य मराठी जनतेने असे केले तर समोरच्याला देखील ती शिकावीच लागेल.

७-- माहिती -सेवा - संवाद - मराठीत : आज माहिती ,सेवा या सार्वजनिक क्षेत्रात मराठी भाषेच्या वापरासाठी प्रयत्न करायला हवेत.संपूर्ण जगात मराठी ही ही पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे.केंद्र शासन , राज्यशासन ,न्यायालय , दूरदर्शन , जाहिरात सर्व बाबतीत जनतेशी संपर्क सेवा मराठी भाषेत करावी.

८--आर्थिक क्षेत्र - मराठी।: बऱ्याचदा मराठीचा प्रश्न भावनिक वाटतो.मराठी केवळ साहित्य , कला , सांस्कृतिक एवढ्यापुरतीच न राहता ती संवाद , ज्ञान , रोजगार , नोकरी ,व्यवहार ,उद्योगाशी जोडलेली भाषा व्हावी.बीएसईची वेबसाईट मराठीत होणे , आय.टी.क्षेत्रातील कंपन्यांतील मराठी मंडळींनी प्रयत्न करावेत.

९-- माहिती तंत्रज्ञान - मराठी -- आज संगणकाचे युग आहे.त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाची भाषा मराठी होण्याची गरज आहे.

१०--साहित्य - ज्ञान -संस्कृती -मराठी -- मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठीत विविध भाषांतील साहित्यकोश ,पाठ्यपुस्तके , ज्ञानविज्ञान , संशोधन मराठी भाषेत उपलब्ध व्हावेत.

११- शिक्षण- मराठी - अत्यंत मूलभूत व तात्काळ बदल ,प्रयत्न
प्रयोग ,उपाययोजना मराठी भाषेसाठी व्हाव्यात; सर्वच शाळांमध्ये किमान १० वी पर्यंत तरी मराठी भाषा अनिवार्य व्हावी.अगदी बिगर मराठी माध्यमांच्या शाळांतदेखील तसे प्रयत्न व्हावेत.

१२ - मराठीतील योग्य शब्दांचा वापर करावा -स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषेला अनेक शब्द दिले आहेत.Budget ला अंदाजपत्रक ,Cycle ला दुचाकी. कुसुमाग्रजांनी' बेकेट ' च्या केलेल्या अनुवादात "सायक्लोरामा ' साठी " आकाशपडदा " हा शब्द वापरला आहे.

१३ - मराठी बोलताना जास्तीत जास्त मराठी शब्द वापरावे - एका व्यक्तीने दुसऱ्याला सांगितले की " बाथरूममध्ये स्टँडवर ती बॉटल असेल बघ." यात सहा शब्दांत चार इंग्रजी शब्द आहेत. त्या ऐवजी " न्हाणीघरातल्या फडताळात ती बाटली असेल बघ " हे वाक्य वापरले तर त्यात सर्व मराठी शब्द आहेत.

कोणतीही भाषा टिकणे व तिचा विकास होणे म्हणजे काय ? तर श्रवण, भाषण,संभाषण ,वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अत्यंत विस्तृत ,सखोल व व्यापक होत जाणे. ९६ वर्षांपूर्वी म्हणजे १९२६ साली राजवाडे यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विचार मांडताना मराठी टिकणार नाही असे भाकीत केले होते त्याला मराठीचे कैवारी कवी गंगाधर रामचंद्र मोगरे यांनी प्रत्युतर देऊन ठणकाऊन सांगितले होते की कोणत्याही भाषेच्या आक्रमणाने मराठी भाषा मरणार नाही थोडी कमकूवत झाली तर आम्ही त्यावर इलाज करू. मोगरे यांच्या विचाराशी सहमत असलेल्या अनेकांनी माय मराठीला वाचवले.

१४ फेब्रूवारी २००९ ते १६ फेब्रूवारी २००९ ला अमेरिकेत पहिले मराठी विश्वासाहीत्यसंमेलन आयोजित करून मराठी भाषा साता समुद्रापलीकडे पोहोचवली. राजवाडे यांनी मराठी भाषा मरणार असे भविष्य केले त्याला २०२६ साली शंभर वर्ष झाली आहेत. करून.मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आम्ही प्रतीज्ञा करतो की....

" महाराष्ट्र माझा आहे आणी मी महाराष्ट्रचा आहे ,
मराठीत बोलणारे सारे माझे बांधव आहेत ,

माझ्या महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर माझे प्रेम आहे ,
मराठी भाषेतल्या समृध्द वाड्मयाचा मला अभिमान आहे ,

मराठी वाड्मयाची ध्वजा जगभर फडकवण्याचा मी प्रयत्न करीन ,
मराठी शिकवणाऱ्या व शिकणाऱ्या सर्वांचा मी मान राखीन,

मराठी बोलणाऱ्या प्रत्येकाशी मी सौजन्याने वागेन,
मराठी भाषा संवर्धन करण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे ,

मराठी भाषेची समृद्धी व वृध्दी यातच माझे सौख्य सामावलेले आहे.

*दिलीप प्रभाकर गडकरी*
, कर्जत जि.रायगड ४१०२०१

26/02/2026

२६ फेब्रुवारी- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथी



स्वातंत्र चळवळीतील सावरकर व त्यांचे बंधू यांचे कार्य सर्वज्ञात आहे . गणेश दामोदर सावरकर आणि नारायण दामोदर सावरकर यांच्या कार्याबद्दल अनेकांना थोडीफार माहिती असेल परंतु सौ .यशोदा गणेश सावरकर, सौ .यमुना विनायक सावरकर, सौ .शांताबाई नारायण सावरकर या सावरकर घराण्यातील सूनांच्या बद्दल अनेकांना फारशी माहिती नसेल . काही जणांना तर त्यांची नांवे सुध्दा माहीत नसतील .

डॉ .सौ .शुभा शशांक साठे यांनी " त्या तिघी " ही चरित्रात्मक कादंबरी लिहून त्यांचा त्याग, समर्पण जगासमोर आणले आहे . एखाद्याचे चरित्र लिहिणे सोपे असते परंतु सावरकर घराण्यातील तीन सूनांचे एकत्रीत चरित्र लिहिणे ते सुध्दा "चरित्रात्मक कादंबरी " च्या रूपात फार अवघड आहे .

ही कादंबरी लेखन करतांना लेखिकेने सावरकर वाडःमयाचा खुप अभ्यास केला .त्यासंदर्भातील अनेक कादंबऱ्या, चरित्र वाचली, सावरकर कुटुंबातील व्यक्तींच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांची मुलाखत घेतली, काही जणांशी दूरध्वनीवर संपर्क साधला ,अनेक तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले आणि सर्व माहिती आठवणींच्या धाग्यात गुंफली .

कादंबरीतील तीन नाईकांपैकी सौ .यशोदा गणेश सावरकर १८९६ साली, सौ .यमुना विनायक सावरकर १९०१ आणी सौ .शांताबाई नारायण सावरकर १९१५ साली सावरकर कुटुंबात आल्या. त्यानंतर त्यांनी आपापली कर्तव्य कशी पार पाडली . पतीविरह, हालअपेष्टा, उपासमार सहन करूनही पती तसेच दीर यांच्या राष्ट्रकार्याची धुरा कशी सांभाळली याच्या माहिती चा त्रिवेणी संगम म्हणजेच " त्या तिघी " ही कादंबरी .

ही कादंबरी प्रकाशित होण्यापूर्वी सावरकर बंधूंच्या कार्याची माहिती देतांना फारच थोड्या लेखांत ह्या तिन्ही जावांचा थोडाफार उल्लेख आला असेल .त्यामुळे त्यांच्या बद्दलची माहिती आणी त्यांच्या कार्याची महती अनेकांना नव्हती . याची जाणीव नागपूर येथील "लाखे प्रकाशन " मालक श्री चंद्रकांत लाखे यांना होती . म्हणून त्यांनी डॉ .सौ. शुभा शशांक साठे यांना सावरकर घराण्यातील तिन्ही जावा यांच्या कार्यावर स्वतंत्र पुस्तक लिहिण्याची सुचना केली . सौ .साठे यांनी ती सुचना स्विकारली . साठे यांना जिव्हाळ्याच्या आणि जिज्ञासेच्या विषयावर वाचन, संशोधन आणि लेखन करायची संधी मिळाली .

साठे यांनी तीन बंधू आणि तीन जावा यांच्या आयुष्याच्या घटनांचा आढावा घेण्यास सुरवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ह्या सहा जणांचे आयुष्य इतके एकमेकांत गुंतले आहे की त्यातून सावरकर बंधूचा त्याग, पराक्रम, कष्ट विचारात घेतांना त्यांच्या स्त्रिया कशा जगल्या याबाबत माहिती देऊन स्त्रियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला .

हया कादंबरीच्या चार आवृत्ती प्रकाशित झाल्या. दोनशे बहात्तर पानी पुस्तकाची किंमत दोनशे रुपए आहे .ह्या कादंबरीच्या लेखिका ऊत्तम वक्त्यासुद्धा आहेत. महिला मंडळाने अथवा इतर संस्थानी *८ मार्च ह्या जागतिक महिला दिनानिमित्त* त्यांना आमंत्रित करून त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. 🙏


*दिलीप प्रभाकर गडकरी*
कर्जत जि. रायगड

23/02/2026

*२३ फेब्रुवारी २०२६ संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती*
*संत गाडगेबाबांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त त्यांना मरणोत्तर "महाराष्ट्र भूषण "पुरस्कार द्यावा*

२३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील दर्यापूर तालुक्यात शेणगावी *डेबूजी झिंगराजी जानोरकर* यांचा जन्म धोब्याच्या कुळात झाला.हे डेबूजी काही वर्षांनंतर चिंधेंबुवा , चापरे बुवा , खापरेबुवा , गोधडेबुवा ,गाडगेबाबा , गाडगे महाराज या नावाने ओळखले जाऊ लागले.

संत गाडगेबाबा यांना कोणी गुरू नव्हता तसेच कोणी शिष्य नव्हता.संत गाडगेबाबांनी जात - धर्माच्या बेड्या तोडून माणुसकीचा मंत्र दिला.ते निरक्षर होते.मात्र अज्ञान आणि अंधविश्वासात अडकलेल्या बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी ते झटले.त्यांना समाज परिवर्तनाची आस होती.ते सर्वत्र पायी जात असत सकाळपासून त्या गावात साफसफाई करत व संध्याकाळी कीर्तन करत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांना गाडगेबाबा यांच्याबद्दल नितांत आदर होता.

महाराष्ट्र शासनाने २००० ते २००८ पर्यंत "संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान " ही योजना राबवली.त्यानंतर ही योजना बंद झाली. गाडगेबाबांनी फारशी साहित्य निर्मिती केली नसली तरी जवळ जवळ त्यांच्यावर विविध मान्यवरांनी ८० चरित्र लिहिली आहेत . म्हणजे त्यांच्या चाहत्यांनी ८० शब्द शिल्प निर्माण केली आहेत . महाराष्ट्रांत काही ठिकाणी " गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन " भरवले जाते . गाडगेबाबा म्हणत असत की " मी कोणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही " त्यामुळे त्यांनी कुठल्याही सांप्रदायाला समर्थन दिले नाही " ज्यांच्या मागे लाखो अनुयायी असतात त्यांना मतासाठी सत्ताधिश सन्मानित करतात तसेच अशा संत अथवा समाजसेवक , क्रांतिकारक यांच्या जातीतील मोठा वजनदार नेता सत्तेत असतात त्यांना सन्मान मिळतात असे आपण बघितलं आहे .

२३ फेब्रुवारी २०२६ रोजी संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती आहे. त्याचे निमित्त साधून संत गाडगेबाबा यांना मरणोत्तर " महाराष्ट्र भूषण " पुरस्कार जाहीर करावा व आम्ही संतांच्या मागे किती भक्त गण आहेत याचा विचार करत नाही तर संतांच्या कार्याची दखल घेतो हे दाखवून द्यावे ही अपेक्षा.

*दिलीप प्रभाकर गडकरी*
कर्जत - रायगड

22/02/2026
21/02/2026

२१ फेब्रुवारी -जागतिक मातृभाषा दिन

१९४८ ला पूर्व पाकिस्तानच्या (सध्याच्या बांगलादेश )संविधान सभेमध्ये उर्दू भाषेला राजभाषा म्हणून घोषित करण्यात आले व इतर भाषांचा अधिकार नाकारण्यात आला.बंगाली भाषिक विद्यार्थांनी या निर्णया विरुध्द २१ फेब्रुवारी १९५२ रोजी ढाका विद्यापिठात उग्र आंदोलन केले. पाकिस्तानी फौजेने आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात पाच विद्यार्थी ठार झाले.पुढे याच मातृभाषेच्या अस्मितेतुन बांगलादेशाचा जन्म झाला.मातृभाषेच्या हक्कासाठी दिल्यागेलेल्या लढ्याची आठवण म्हणून युनेस्कोने २००० साली २१ फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिन म्हणून जागतिक पातळीवर साजरा करण्यास सुरुवात केली.

माणसाला सर्वात मोठा वारसा त्याची भाषा हाच असतो.आपण भाषांच्या जागतिक महत्वाबद्दल थोडा विचार करू.भाषेचे जागतिक महत्व ठरवण्याचा सर्वात मोठा निकष लोकसंख्येचे प्रमाण हा असतो.त्यानंतरइतर निकष त्या त्या भाषिक समुहातील ज्ञान , साक्षरतेचेप्रमाण,औद्योगिकरण,व्यापार ,लष्करी ताकद ,राजकीय दर्जा आणि त्या भाषेचा जगातल्यानिरनिराळयाप्रदेशांतला विस्तार.जागतिक महत्वाच्या असलेल्या भाषा चिरकाल तशाच राहत नाहीत. अनेक भाषांचे महत्व कमी होतात तर काही भाषा नष्ट होतात.२०१७ साली भाषातज्ञ डॉ गणेश देवी यांनी दिलेल्या अहवालानुसार जगातील ६००० भाषांपैकी ४००० भाषा संकटात आहे.भारतातील ७८० भाषांपैकी ४०० भाषा येत्या पन्नास वर्षात नामशेष होतील.

आज युनोमध्ये वापरल्या जाणाऱ्या सहा जागतिक महत्वाच्या भाषांपैकी पहिली चिनी भाषा जगातले पंचवीस टक्के , इंग्रजी दहा टक्के रशिया आठ टक्के लोक बोलतात.ह्यानंतर चौथा क्रमांक खरे तर हिंदीचा येतो जी सहा टक्के लोक बोलतात, परंतू हिंदीला युनोत स्थान नाही. समजा बदलत्या परिस्थितीनुसार युनोने सहा ऐवजी मुख्य दहा भाषांना मान्यता द्यावी असा आग्रह कोणी धरला तर त्यात हिंदी बरोबर बंगाली आणी मराठी ह्या भारतीय भाषांचा लोकसंखेच्या प्रमाणात जागतिक महत्वाच्या म्हणून मान्यता मिळेल.

आता आपण आपली मातृभाषा मराठी बाबत विचार करू.महाराष्ट्र हा भाषांच्या बाबतीत अत्यंत समृध्द आहे , कारण मराठी ही आपली राजभाषा असली तरी बहुभाषीकता हे आपले वैशिष्ठ्य आहे .मराठीसह आदिवासी व भटक्या विमुक्तांच्याजवळपास सत्तर भाषा महाराष्ट्रांत बोलल्या जातात.मराठी भाषेची वीस रूपे महाराष्ट्रात बोलली जातात त्यात वऱ्हाडी,कोहळी,नागपूरी,हलबी , झाडी ,अहिराणी, डांगी, कोकणी ,सामवेदी,आगरी , वाडवळी, संगमेश्वरी,चंदगडी या सारख्या भाषा आहेत.


मातृभाषा ही प्रत्येक माणसाला अनासायासपणे मिळालेली देणगी आहे.त्यातूनच प्रत्येक माणसाची ओळख निर्माण होते.माणसाच्या आयुष्यात जेवढे आईला महत्व आहे तेवढेच मातृभाषेला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करण्यास लोकप्रतिनिधींना वेळ मिळत नसेल तर मराठी शिकवणारे शिक्षक , विद्यापीठांत मराठी शिकणारे विद्यार्थी , साहित्यिक यांनीच आपल्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. १९२६ साली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विचार मांडतांना थोर साहित्यिक , विचारवंत राजवाडे यांनी मराठी भाषा लवकरच मरणार आहे म्हणजे नष्ट होणार आहे असे भाकीत केले होते परंतु कवी मोगरे यांनी आपल्या कवितेतून असे विचारले की आपली आई मरणासन्न असेल तर तीला औषध देऊ नये कां? कवी मोगरे यांच्या विचारांशी सहमत असलेल्या मराठी जनांनी प्रयत्नरुपी औषध देऊन आपल्या मातृभाषारुपी आईला नुसतेच वाचवले नाही तर २००९ साली सातासमुद्रापार अमेरिकेत ,जागतिक मराठी साहित्य संमेलन आयोजित करून मराठी भाषा किती समृध्द झाली हे दाखवून दिले.

स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत असताना हिंदी , बंगाली , मराठी भाषिकांनी आपल्या मातृभाषेला युनोत स्थान मिळवण्याचा प्रयत्न करून जागतिक मातृभाषादिन साजरा करावा ही अपेक्षा.
सौजन्य-
दिलीप प्रभाकर गडकरी
कर्जत जि.रायगड

20/02/2026

Generation Z to अल्फा S.W.O.T. analysis ऑफ youth - लॅटिन / रोमन अल्फाबेट असलेली ही शेवटची जेनेरेशन. साधारण 1996 ते 2010 या पंधरा वर्षात जन्म घेणाऱ्या पिढीला जेनेरेशन Z या नावाने संबोधीले जाते. 2000 साली किंवा त्याच्या किंचीत पुढे जन्म घेणाऱ्यांना zillennials म्हटले जाते. 2010 पुढे येणाऱ्या पिढीला ग्रीक अल्फाबेट अल्फा या नावाने संबोधीले जाते. साधारण 2010 ते 2025 या काळात जन्मलेल्या मुलांना जेनेरेशन alpha संबोधीले जाते. जेनेरेशन Z बद्दल बोलायचे झाले तर बाल्यावस्थेत आई च्या दुधा ऐवजी cerelac वर पोसलेली हि पिढी. त्या मुळे कुमार वयात इन्सुलिन रेसिस्टन्स, पौगडा अवस्थेत fatty liver आणि तरुण वयात dibetes या सर्व व्याधीने त्रस्त असलेली हि जेनेरेशन. घरातील सात्विक अन्न खाण्यापेक्षा बाहेरील चमचमीत मिसळ पाव खाऊन पोट सुटून गब्बर झालेली मुले. हि या जेनेरेशन ची शारीरिक ओळख. 12 महिने ब्रेस्ट फीडिंग यांना बाल्यावस्थेत ना केल्याने यांच्या आयांना वयाच्या चाळीशी मध्येच ब्रेस्ट कॅन्सर होतो. ग्लोबल वॉर्मिंग ते climate change बद्दल भरभरून माहित असलेल्या आणि बोलणाऱ्या मुलांना व्यायाम आणि त्याच्यामुळे तब्येतीत आणि शरीरात होणारे बदल या बद्दल उपेक्षा आहे. हि जेनेरेशन socially, politically खुप जागृत आहे. ह्या जेनेरेशन ची मुले कास्ट, रेस, धर्म या गोष्टींना जास्त महत्व ना देता त्यांच्या जीवनसाथी ची निवड करतात. डिजिटल नेटिव्ह असलेल्या या पिढीला जितक्या opportunity आहे तितक्याच threat हि आहेत. दररोज 5 ते 6 तास ऑनलाईन राहून माहितीचा खजिना लुटणाऱ्या या पिढीत knowledge आणि wisdom चा अभाव जाणवतो. बहुतांशी तरुण पिढी I. T. सेक्टर, फायनान्स सेक्टर मध्ये कार्यरत असल्यामुळे 5 ते 6 आकडी मासिक पगारामुळे घरी सुब्बत्ता आलेली असते. परंतु विवेक आणि समंजस पणाच्या अभावी लाखो रुपये खर्च करून केलेले लग्न वर्षभरात मोडण्याची वेळ येते. या नंतर येणाऱ्या जेनेरेशन alpha चे तर घरातील पोळी भाजी पेक्षा momoj खाऊन जास्त पोषण झाले आहे. या momos वर पोसलेल्या पिढीचे जास्त तब्येतीचे त्रास आहे. भविष्यात कांदेपोहे कार्यक्रमा ऐवजी मोमोज कार्यक्रम होऊ शकतात. नुकताच एका 24 वर्षीय मोमो विकणाऱ्या तरुणाचा आणि त्याच्या 5 मित्रांचा ताम्हिणी घाटात कार accident ने मृत्यू झाला. सदर 10 वी सुद्धा पास नसणाऱ्या तरुणाने 3 momos विकणाऱ्या गाड्या उभ्या करून वर्षभरपूर्वी 1 करोड किंमतीचा फ्लॅट आणि 20 दिवसापूर्वी 18 लाखाची महिंद्रा थार घेतली होती. हे असे मोमोज विकणारे निव्वळ पुण्यात किमान 6000 ते 7000 लोक असतील.मोमोज खाण्याचे वेड जेनेरेशन z आणि alpha मध्ये किती प्रमाणात आहे हे सांगण्यासाठी हि उदाहरणं दिलीत. सध्याच्या घडीला जगभरातील हिंदू, ख्रिस्ती,बुद्धिस्ट जेनेरेशन z आणि alpha मध्ये लग्न करण्याचे प्रमाण कमी कमी होत आहे. बरीचशी तरुण पिढी लिव्ह इन किंवा situationship सारख्या इंग्रजी गोंडस नावाखाली स्वतःच्या शारीरिक गरजा भागवत आहे. परंतु वंश वृद्धीसाठी लग्न करणे टाळत आहे. सामाजिक आणि कौटुंबिक दबावाखाली लग्न केलेच तर double income no kids ( डिंक ) ला प्रेफर करते. सामाजिक दृष्ट्या उच्च जाती मध्ये ज्यांत खुप जास्त शिक्षण आणि खुप जास्त पगार असलेली, मेट्रो सिटी मध्ये शिफ्ट झालेली आणि जी छोट्या नुक्लिअर फॅमिली ची मुले आहेत यांत हा बदल जास्त प्रमाणात जाणवतो. या पिढी बद्दल कुठलेही perception ना बाळगता entering in their shoes या म्हणी प्रमाणे त्यांची परिस्थिती अनुभवणे आणि त्यातून एक complete perspective ( यथार्थ दर्शन )करणे. या बदलाचे वारे पुढील काही वर्षात वादळात रूपांतरित होतील आणि संख्येने छोटया असणाऱ्या, शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असणाऱ्या, broad आणि फॉरवर्ड थिंकिंग असणाऱ्या जाती पाल्यापाचोळ्यागत उडून जातील. कालाय तस्मै नमः! - सिद्धार्थ सोनाळकर.

Address

Flat No. 2, Priyadarshani Apt, Samarth Colony
Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Jalgaon Dhule Nandurbaar Buldhana Akola District CKP Community posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share