14/09/2024
यशवंतराव चव्हाण सेंटरचे कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर
कविवर्य ना. धों. महानोर यांचे निधन झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेनुसार सेंटरने कविवर्य ना. धों. महानोर यांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा केली. कवी, कादंबरीकार म्हणून महानोर यांनी मराठी साहित्यात जसे स्वतःचे स्थान निर्माण केले, तसेच शेती आणि पाणी ही क्षेत्रे जीवनभर त्यांचा ध्यासविषय होती. महानोरांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कार्याचे हे पैलू लक्षात घेऊन, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रानकवी ना. धों. महानोर यांच्या नावाने या तीनही क्षेत्रांत एकूण सहा पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. दरवर्षी सहा पुरस्कारांपैकी चार पुरस्कार साहित्यक्षेत्रासाठी तर दोन पुरस्कार शेती व पाणी या क्षेत्रांसाठी असतील. त्यानुसार सन २०२४ च्या कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कारासाठी राज्याच्या सर्व विभागांतून शिफारशी मागविण्यात आल्या होत्या. १९ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ५ वा. चव्हाण सेंटर, मुंबई येथे सेंटरचे अध्यक्ष श्री. शरद पवार आणि जैन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.अशोक जैन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या शिफाराशिमधून यशवंतराव चव्हाण सेंटर आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव या दोन्ही संस्थांच्या संयुक्त निवड समितीने राज्याच्या विविध भागातून पुढील नावे जाहीर केली आहेत. मा. श्री. अशोक जैन, डॉ. जब्बार पटेल, डॉ. नितीन रिंढे, श्री. शंभू पाटील, श्री. अजित भुरे, श्री. दत्ता बाळसराफ इत्यादी मान्यवर पुरस्कार निवड समितीचे सदस्य आहेत.
शेती – पाणी :
१. श्रीमती शीला रामकृष्ण खुणे, लेंडेझरी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया येथील या अल्पभूधारक महिलेने उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून कलिंगडाचे किफायतशीर पीक घेतले आहे.
२. श्रीमती वर्षा नरेंद्र हाडके, आष्टी, ता. कळंब, जि. यवतमाळ. पतीच्या निधनाने खचून न जाता तरुण वयातच वर्षा हाडके निर्धाराने शेती करून सोयाबिनचे भरगोस पीक घेऊन संसाराचा गाडा हाकत आहेत.
साहित्य :
कविता–
३. श्री. गणेश घुले, बजाजनगर, वाळूज, औरंगाबाद. राज्यात अनेक ठिकाणी बालकुमार साहित्य संमेलनात "सुंदर माझी शाळा" कवितेच्या सांगीतिक प्रयोगाचे सादरीकरण करत आहेत.
४. श्री. महेश लोंढे, बारलोणी, ता. माढा, जि. सोलापर. नावाक्षर दर्शन, नव-अनुष्टुभ, अभिधानंतर, परिवर्तनाचा वाटसरू अशा नियतकालिकांमधून नियमित कविता लेखन करत आहेत. सध्या ते आपल्या पहिल्या कादंबरीवर काम करत आहेत.
५. श्री. नामदेव कोळी, कडगाव, ता. जि. जळगाव. काळोखाच्या कविता हा कविता संग्रह प्रकाशित झाला असून वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून सातत्याने कविता लेखन करत आहेत. त्यांना अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.
कादंबरी –
६. श्री. प्रदीप कोकरे, वडाळा, मुंबई. युगवाणी, खेळ, मुक्त शब्द, अभिधानंतर, कवितारती, लोकसत्ता, काव्याग्रह, वर्णमुद्रा इत्यादी नियतकालिकांमधून कविता प्रकाशित. खोल खोल दुष्काळ डोळे ही कादंबरी प्रकाशित झाली आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी परिवर्तन, जळगाव आयोजित, श्री. शंभू पाटील व सहकारी यांचे सादरीकरण असलेला ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हा अभंग गायनाचा कार्यक्रम होईल.