11/02/2026
पुस्तक परिचय
चैतन्याचा परिसस्पर्श झालेली समर्पिता एक उल्लेखनीय प्रवास....
सुंदर चेहऱ्याची नितळ कांती, मनाची रसिक वृत्ती पण शिस्तप्रिय रूमानीची आजी म्हणजेच डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांच्या
आयुष्यवर अतिशय विलोभनीय कर्तृत्वाचा देखणा हृदयस्पर्शी चरित्रग्रंथ लेखिका चैत्रा हुदलीकर यांनी लिहीलाय, या ग्रंथाची लेखनशैली साधी, सरळ सोपी असून त्यातील प्रत्येक प्रकरण उत्कंठावर्धक आहे. समर्पिता हा ग्रंथ हातात घेतल्यावर तो संपेपर्यंत खाली ठेवूच नये असं वाटत रहातं.
डॉ. मंदाकिनी आमटे हे अतिशय मोठं आदरणीय व्यक्तीमत्व एकेरी शब्दांत त्यांचा नामोल्लेख करणं फार कठीण जातं या ग्रंथाचं सौंदर्य वाढविण्यासाठी लेखिकेने त्यांचा "मंदा" या एकेरी नावाचा वापर केलाय त्यामुळे वाचकाचं या चरित्रग्रंथाशी भावनीक नातं जुळत जातं त्या शिवाय ग्रंथात आलेले संदर्भ ...तत्कालीन सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीचं ओळख करून देतात. त्यामुळेच समर्पिता हा ग्रथं त्यांच्या यशस्वी प्रवासाचा साक्षीदार म्हणून सार्थ ठरतो.
आदर्श सौभाग्यवती पतीच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहून दृढ निश्चय अन् अविरतपणे आपल्या भूमिका निभावता तसूभरही कमी न पडलेल्या डॉ.मंदाकिनी आमटे वाचकाला अनुभवायला मिळतात.तेवढेच कॅन्सरचे निदान झाल्यानंतर स्थितप्रज्ञ रहाणारे डॉ.प्रकाश आमटे....
निरागस बालपण,अल्लड तारूण्य, परिस्थितीतून जाताना त्यावर केलेली मात, शिक्षण,प्रेमविवाह,मुलगी,
बहीण,पत्नी,सून,आई,सासू,आजी या सगळ्याच भूमिका निभावता तठस्थपणे ऊभं राहताना आयुष्य सुखा समाधानात कसं जगावं हे शिकविणार हा ग्रंथ यात अलौकिक व्यक्तीमत्वाचं दर्शन घडतं.सगळीच सुखं विधात्याने ताटात वाढून ठेवलीत असं कधीच होतं नाही, दुर्गम भागातलं आदिवासीसाठी केलेलं सत्कर्म करताना समर्पित जीवनातून सामाजिक कार्याची प्रेरणादायी ओळख लेखिकेने डॉ. मंदाकिनी आमटे यांची या चरित्रातून घडवून दिली आहे.
द रिअल हिरो प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात किंवा अन्य ग्रंथसंपदा यात न आलेल्या काही प्रसंगाच्या नोंदी या ग्रंथात वाचावयास मिळतात. डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या खोलवर रूजलेल्या जीवनानुभूतीचे परामर्श टीपताना नवेजुने संदर्भ निश्चितपणे वाचकाच्या हृदयाचा ठाव घेतात.या चरित्रातील सगळेच प्रसंग गंगोत्रीचा उगम आहे. त्याच रूपांतर पुढे जाऊन महासागराचं झालेलं दिसतं कारण त्यांची क्षितीजा पलीकडची झेप आहे.अनुक्रमे १ ते ९४ प्रकरणातून उलगडत जाते.
हा चरित्रग्रंथ अलंकारिक शब्दांची भूरळ न घालता वास्तवाचे भान ठेवून आहे हे वाचताना लक्षात येतं,डॉ. मंदाकिनी प्र.आमटे यांचे बालपणा ते आजवरच्या वाटचालीचे काही महत्वपूर्ण संदर्भ लेखिकेने टीपलेत त्या वरून लक्षात येतं उतुंग व्यक्तीमत्व काय असू शकतं स्वतः चरित्र नायिका म्हणते "हॉस्पिटल नावाच्या धंद्याची मालकीण होण्यापेक्षा सेवाभावी प्रकाशच्यासोबत डॉक्टरचं खरंखुरं कर्तृत्व निभवायला काय हरकत आहे." विचारांचा कणखरपणा आणि प्रेम आणि जाणिवांची कर्तव्याप्रती निष्ठा एक असाधारण जीवनाचा प्रवास घडवित गेला.
घरातील संस्काराचा गाभा गुणीजनांचा सन्मान, रंजल्यागांजल्यांना वरदान भामट्यांना पायदान या विचारांचे आजोबा, मा.दामोदरपंत बुध्दिमान, त्याचे पिळदार शरीर, शास्त्राचा व्यासंग, राष्ट्र स्वाभिमानी,असणा-या आजोबांकडून वडिलांना म्हणजेच वसंतरावांना मिळालेले बालकडू ते आर एसएसचे कट्टर अनुयायी होते. तसेच आईची समाजसेवी वृत्ती तिला जमेल त्या पध्दतीने ती करत रहायची,गावतल्या महिलांना एकत्र करून वाचनाचे महत्व सांगायचं, उत्तम पुस्तके त्यांना वाचून दाखवायची. एवढेच नव्हे तर एका विधवेला घराशेजारी पडवी बांधून देऊन तिला काम देणं हे पाहून आयुष्याचा खरा अर्थ कसा प्राप्त करायचा हे मंदाकिनी यांना उमजत गेलं. परिस्थिती बेताची असताना आईची काटकसरीची शिकवण उपयोगी पडली, ती अशी.. एकदा रांगोळीच्या स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक मिळाला,त्यावेळी विटकरीचा भुगा, कोळशाचा भुगा आणि ज्वारीचे पीठ हे वापरून सुरेख रांगोळी काढली परिस्थिती आणि परितोषिक यात फक्त जाणिवेचा रंग भरावा लागतो हे आईने शिकवण,आमगावातल्या ओपण थिएटरच्या मोठ्या पडद्यावर दिस-याच्या हलणा-या चित्राचं तिला अपृप वाटायचं पुढे कॉलेज लाईफ मध्ये नागपूरातले सिनेमाचे बोर्ड वाचत रद्दी विकून चित्रपट पहाण्याची हौस भागविली,त्या़च्या लहानपणातले किस्से तर फारच मजेशीर आहेत.
डॉ. मंदाकिनी या वाचनप्रेमी ग्रंथालयातून पुस्तकं आणली की बहिणींची भांडण ठरलेली ते पाहून आई वडिल सूखावून जायचे. देवस्थानाच्या भोवतालची सीताफळ, पेरू तोडायची वर्ग शिक्षकाची नजर चोरून चिंचा बोर खायची, कौंडण्यपूरची सहल रेंगीतलं बसणं गड्डा आला की समोरासमोर डोकं आपटणं,तीन दगडाची चूल मांडून त्यावरचा स्वैयंपाक,
तीन मुलींना जन्म दिला, म्हणून आईला कुणीतरी हिणवताना त्यांनी पाहिलं, कुसूमताई म्हणायच्या देशपांडेच्या वंशाच सात्विक संचित घेऊनच तू जन्माला आलीस भावनिक ओलाव्याचे स्पर्श अधून मधून वाचनात येतात.
हा चरित्रग्रंथ सकारात्मक दृष्टिकोन देतो, माणसाकडून माणसाकडे, मनाकडून मनाकडे, हृदयाकडून हृदयाकडे जो मंदाकिनी प्रकाश आमटे यांचा आहे.
त्या व्यक्त होताना म्हणतात, प्रकाश थोडा वयाने लहान असला तरी प्रसंगी जीव लावणारा, माझ्या संपूर्ण आयुष्याच कवच बनेल हा विश्वास होता म्हणूनच हा ध्येयवेडा हात धरला.
आमटे परिवाराचा स्थायीभाव समाजसेवाचा लग्नात मानपान टाळून रूमाल सुध्दा नको, हुंडा वरदक्षिणा या प्रथाचा विरोध, साध मंगळसूत्र,मामा क्षिरसागरा़नी संस्कृत मंत्रांचे मराठीत केलेले भाषांतर तेवढेच म्हटल्या गेले, लग्ननंतर भोजनात केवळ मसालेभात,या सगळ्या प्रकरणात दुवा ठरले ते डॉ. विकास आमटे असा उल्लेख लेखिकेने या ग्रंथात केला आहे.
या शिवाय प्रकल्पातील आरोग्य सेवा, प्रथमोपचारासाठी ठरवून तयार केलेले प्रशिक्षक, अंधश्रद्धे विरूध्द घेतलेले निर्णय, झोपडीतला दवाखाना,टार्च कंदिलातले ऑपरेशनची तयारी, आदिवासीसाठी जास्ती सुविधा देण़्यासाठी मंदाविहीनींनी दिलेल्या सेवा आणि त्यांनी सुरू केलेल्या पध्दती आजही जशाच्या तशा लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे सुरू आहेत. म्हणूनच साधनाताई अनेकदा म्हणायच्या मंदा माझं श्रध्दास्थान आहे.
प्रकाशनाची जबाबदारी उत्तम प्रकारे संतोष हुदलीकरांनी सांभाळली असून तितकेच प्रभावी लेखन कौशल्य लेखिका चैत्रा हुदलीकर यांचे आहे. त्या शिवाय अनेक अर्थाने या ग्रंथाची ओळख करून देता येईल, सामाजिक बांधिलकीचे अनेक पैलू सापडतात, कौटुंबिक, शैक्षणिक,आरोग्य क्षैत्रातील नैतिक मुल्य जपणारा समर्पिता हा चरित्रग्रंथ २०२ पृष्ठांचा असला तरी समर्पण याचा खरा अर्थ काय असेल तर डॉ. मंदाकिनी आमटे व डॉ.प्रकाश आमटे याचं सहजीवन त्यांच्या अविस्मरणीय अनुभवांचा हा दस्तऐवज आहे. आयुष्य कसं जगावं याचं सुंदर उदाहरण म्हणजे समर्पिता हा ग्रंथ आहे.प्रत्येकाने वाचावी अशी अमुल्य साहित्यिक ठेव असून वाचकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल......
*दीपक शिव*
*भ्रमणध्वनी क्रमांक*
*9822240012*