11/10/2024
धनगर आरक्षण एक षडयंत्र...
धनगर आरक्षण हा मुद्दा कसा राजकीय व फसवणूक करणारा आहे हे समजून घेताना काकासाहेब कालेलकर आयोग हा सन 1953 रोजी गठित करण्यात आलेला होता हे आपणास माहीत असणे आवश्यक आहे.
या आयोगाने आपल्या अहवालात पान क्रमांक 230 वर Sub tribes of Oraon म्हणुन Dhanka व Dhangad यांची नोंद केलेली आहे. तसेच पान क्रमांक 27 वर मुंबई प्रांताच्या ओबीसी यादीत अनुक्रमांक 82 वर Dhangar, Kurbar अशी स्पष्ट नोंद करून त्याचे भाषांतर धनगर असेच दिलेले आहे. विशेष म्हणजे या नोंदिसमोर व्यवसाय व लोकसंख्या यांची माहिती देखील स्पष्टपणे नोंदविलेली आहे.
सन 1956 रोजी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आदेश ( सुधारणा ) अधिनियम 1956 नुसार मुंबई प्रांताच्या अनुसूचित जमातींच्या यादीत Oraon, including Dhanka, Dhnagad अशी नोंद समाविष्ट करण्यात आलेली आहे. जेव्हा ही नोंद मुंबई प्रांतासाठी करण्यात आली, तेव्हा सेंट्रल प्रोविन्स व बेरार या प्रांताचा काही भाग मुंबई प्रांताला जोडलेला होता. त्याच भागाच्या अनुषंगाने ही नोंद झालेली होती. नंतर 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि मुंबई प्रांताचा काही भाग मध्य प्रदेशला जोडला गेला. हा भाग वेगळा केला जात असताना खरं तर Oraon, including Dhanka, Dhangad ही नोंद रद्द होणे आवश्यक होते पण तसे झाले नाही. वास्तविक याबाबत Tribal Advisory Committee यांनी याबाबत शिफारसदेखिल केलेली होती. परंतु त्यावर आजपर्यंत कोणतीही अंमलबजावणी झाली नाही आणि धनगर समाजाला आदिवासी आरक्षणात घुसू पाहण्याचा एक मार्ग तसाच राहिला. पुढे मध्यप्रदेशमधून छत्तीसगड हे राज्य देखील वेगळे झाले. त्यामुळे मुंबई राज्यासाठी काकासाहेब कालेलकर आयोगाच्या ज्या शिफारसी करण्यात आल्या होत्या, त्यावेळचा काही भाग आज छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यात सहभागी आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सन 1956 साली Oraon, including Dhanka, Dhangad ही नोंद ज्या भागातील आदिवासी जमातींसाठी करण्यात आलेली होती, तो भाग आज छत्तीसगड राज्याचा भाग आहे. त्यामुळे या नोंदिसाठीचे सांस्कृतिक मूल्ये तपासायचे असतील तर छत्तीसगड राज्यातील Oraon, Dhangad याबाबतच्या नोंदी विचारात घेणे आवश्यक आहे.
कालेलकर आयोगाने धनगर समाजाला 1955 साली ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची स्पष्ट शिफारस केलेली असताना त्यांची नोंद 1956 साली अनुसूचित जमातींच्या यादीत होईलच कशी हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मुळात कालेलकर आयोगाने Oraon या आदिवासी जमातीच्या उपाजमाती म्हणून Dhanka व Dhangad यांना सन 1956 पूर्वीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे सन 1956 च्या यादीत Oraon बरोबर Dhangad अशी नोंद आलेली आहे. त्यामुळे सदर नोंद ही चुकीची झालेली आहे असे म्हणणे किंवा तसा युक्तिवाद करणे म्हणजे संविधानाचा अवमान आहे आणि तो रोज इथे केला जात असताना निव्वळ आदिवासी आणि धनगर यांच्यात सुरू असलेली झुंबड सरकार मजा म्हणून बघत आहे.
दिनांक 21 नोव्हेंबर 2014 रोजी झालेल्या आदिम जाती तथा अनुसूचित जनजाती विकास विभाग छत्तीसगड यांनी Oraon, Dhangad बाबत पुढील पत्रव्यवहार भारत सरकारला केलेला आहे. त्यातील मजकूर जशाचा तसा खाली देत आहे,
जनजातीय कार्य मंत्रालय के पत्र दिनांक 03/09/2014 के संदर्भ में आदिम जाती तथा अनुसूचित जनजाती विकास विभाग, छत्तीसगढ शासन ने अपने पत्र संख्या 7462/आर - 307/ जीओआई /2014 /25-2 दिनांक 30-09-2014 के द्वारा बताया है की भारत सरकार द्वारा छत्तीसगढ राज्य हेतू जारी अनुसूचित जनजाती की अंग्रेजी सूची में अनुक्रमांक 33 पर Oraon के साथ Dhangad शामिल है जिसका हिंदी रूपांतर धनगढ के रूप में किया गया है, जबकी छत्तीसगड राज्य में उरांव की उपजाती धांगड ( Dhangad) कहलाती है|
वरील मजकुरात Dhangad या शब्दाचा उच्चार धांगड असा करण्याची महत्त्वपूर्ण बाब समोर आणलेली आहे. याच्याही पलीकडे त्यांनी याच पत्रात धांगड अनुसूचित जमातीचा व्यवसाय हा शेतात खड्डे खोदण्याचा असल्याचे स्पष्ट मत मांडलेले असून पुढे धांगड आणि पशुपालक असणारी धनगर जात यांतील मूलभूत फरक स्पष्ट केलेला असुन त्याचे वस्तुनिष्ठ अवलोकन महाराष्ट्र सरकारने करण्याची खरं तर नितांत आवश्यकता आहे.
आदिवासींना मिळणारा संविधानिक लाभ धनगर समाज हिरावू पाहत असताना बुद्धिजीवी वर्ग निव्वळ तमाशा पाहत राहणे ही बाब पुरोगामी महाराष्ट्रासाठी फारच लाजिरवाणी आहे. वास्तविक धनगर जर आदिवासी म्हणून घोषित झालेच चुकून तर कोणाचे मतदारसंघ कमी होतील यावर मी न बोललेले बरे. तसेच पेसा कायद्याचे वाढलेले कार्यक्षेत्र, आरक्षणाच्या वाढवाव्या लागणाऱ्या मर्यादा यामुळे इतर आरक्षणात होणारी कपात याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
बाकी सरकारची यंत्रणा कुत्र्यागत कोणताही संविधानिक आधार न घेता धनगर नेत्यांना खुश करण्यासाठी पळवली जात आहे. मतांचे राजकारण करण्याच्या नादात सरकार आदिवासींच्या घटनादत्त अधिकार व संरक्षण यांना पायदळी तुडवत आहे. याचे निश्चित दूरगामी परिणाम येणाऱ्या काळात राजकीय व सामाजिक पातळीवर महाराष्ट्रात दिसतील यात शंका नाही. आदिवासींना नेहमीच त्यांच्या पाचव्या आणि सहाव्या अनुसूचीपासून दूर ठेवण्यात आलेले आहे. आता धनगर आरक्षणाचे गाजर दाखवून आहेत, ते अधिकार व हक्क संपुष्टात आणण्याचा डाव सत्ताधारी करत आहेत आणि त्याला विरोधी पक्षांची देखील मुक संमती असणे अत्यंत लाजिरवाणे आहे.
असो आदिवासी आपली संविधानिक लढाई नक्कीच लढतील आणि जिंकतील पण यात शंका नाही. फक्त एकदा चुकीचा राजकीय निर्णय घेण्याची सुरुवात झाली, तर हे आवरणे सर्वांसाठी कठीण होईल. म्हणून महाराष्ट्र वाचवायचा असेल, तर या सरकारच्या मुसक्या आवळणे ही काळाची गरज आहे.
- राजू ठोकळ
संदर्भ -
1) काकासाहेब कालेलकर आयोग अहवाल 1953
2) National Commission For Scheduled Tribes Summary Record of the 64th meeting held on 21/11/2014, New Delhi.