The region is experiencing forest fires, water shortage, plastic pollution. Gautala Foundation aims to conserve biodiversity through local participation गौताळा औट्रामघाट वन्यजीव अभयारण्याविषयी:
गौताळा औट्रामघाट जंगलातील समृद्ध जैवविविधतेच्या संरक्षणासाठी 1986 साली या जंगलाला वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. जवळपास 26,000 हेक्टरवर पसरलेले हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या पूर्व पट्ट्यातील सातमाळा
आणि अजिंठा डोंगररांगा दरम्यान वसलेले आहे. या जंगलाच्या दऱ्यांमध्ये शुष्क पानझडी वन तर पठारांवर माळरान (गवताळ प्रदेश) आहे. अभयारण्यातील बहुतांश भाग हा वन विभागाच्या औरंगाबाद जिल्हा मुख्यालयाच्या अखत्यारीत येतो तर चाळीसगाव गटातील एक रेंज ही जळगाव जिल्हा कार्यालया अंतर्गत येते.
गौताळा अभयारण्य हे केवळ समृद्ध जैवविविधतेचे आगार नसून विविधप्रकारच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय वारशांचे निवासस्थानही आहे. परंतु येथील लोक मात्र गरिबी, दारिद्र्य अनारोग्य आणि शिक्षणाचा अभाव अशा समस्यांनी ग्रस्त आहेत. या समस्यांमुळे या स्थानिकांना आपली उपजीविका भागविण्यासाठी वेगवेगळ्या शहरांत स्थलांतरीत व्हावे लागत आहे.
आव्हाने
नजीकच्या काळात या भागात घरगुती पर्यटनात मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे येथील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अशा वन्यजीव क्षेत्रांत ध्वनी प्रदूषण, घन कचरा आणि सिंगल-युज प्लास्टिक कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. येत्या काही वर्षांत या भागातील पर्यटन हे आणखी वाढून ते या क्षेत्राच्या धारण क्षमतेपलीकडे (carrying capacity) जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मागील काही वर्षांपासून या भागात पाण्याची कमतरता, जैवविविधतेत घट, जमीन-वापरात बदल, शेतीचा ऱ्हास आणि एकूणच वातवरणातील बदल प्रकर्षाने जाणवत आहेत. पाणी आणि भक्ष्याच्या शोधात वन्यजीव संरक्षित क्षेत्राच्या बाहेर येऊन स्थानिक शेतकरी आणि रहिवाशांबरोबर त्यांचा संघर्ष होत असल्याच्या बातम्या येत आहेत.
अशा या मौल्यवान परंतु विविध समस्यांनी ग्रस्त प्रदेशात तातडीने स्थानिकांच्या सोबतीने धोरणात्मक नियोजन, सक्षमीकरण आणि पर्यायी उपजीविका विकासावर काम करण्याची नितांत आवश्यकता आहे.
गौताळा फाउंडेशनची निर्मिती कशासाठी?
गौताळा फाउंडेशन ही एक स्वयंसेवी, ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था असून तिचे केंद्र हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे आहे.
धोरणात्मक नियोजन, सर्व संबंधितांचा सहभाग आणि सहभागाधारित संशोधन व विकासावर भर देत पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करण्यास गौताळा फाउंडेशन कटिबद्ध आहे.
ध्येय:
नैसर्गिक समृद्धीने बहरलेला भूप्रदेश आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व जिव्हाळा बाळगणारा मानवी समाज नर्माण करणे
उद्दिष्टे:
• स्थानिकांच्या सहभागाने गौताळा परिसराच्या शाश्वत विकासाला चालना देऊन नैसर्गिक भूप्रदेशावरील मानवनिर्मित दबाव कमी करणे
• वन्यजीव आणि वनसंपदेच्या संरक्षणाविषयी जागरुकता निर्माण करणे
• स्थानिक लोकांसाठी पर्यायी उपजीविका निर्मितीसाठी प्रयत्न करणे
• शाळा आणि कॉलेजमध्ये पर्यावरण शिक्षणाला चालना देणे
• वनसंरक्षणाला बळकटी येण्यासाठी वन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करणे
• या प्रदेशाच्या शाश्वत विकासासाठी वेगवेगळ्या संस्था आणि व्यक्ती यांचे सहकार्य मिळवणे
• मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे
• स्थानिक लोकांमध्ये आपली जंगले आणि वन्यजीव यांच्याप्रती स्वामित्व आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणे
• पर्यावरण संवर्धनासंबंधी निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी स्थानिकांना प्रेरित करणे
प्रमुख कार्यक्षेत्रे:
1. पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि व्यवस्थापन
2. स्थानिक समूहांसाठी शाश्वत उपजीविका विकास
3. पर्यावरणावर कमीतकमी परिणाम घडवून आणणारे तरीही पर्यटकांना अर्थपूर्ण अनुभव देणारे पर्यावरणपूरक पर्यटन विकसित करणे
4. कचरा व्यवस्थापन आणि जनजागृती