Shantiwan

Shantiwan Donation link.- https://www.shantiwan.org/donate-now
शांतिवन.. अनाथ , दुःखी कष्टी , वंचित, बेघर मुलांचं हक्काचं घर. (At. Shantiwan, post. Arvi, Beed)
(1)

शांतीवन ही माणसं घडविणारी संस्था आहे -  बालहक्क आयोग अध्यक्ष श्री.  संजय पुराणिक. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग...
09/08/2026

शांतीवन ही माणसं घडविणारी संस्था आहे - बालहक्क आयोग अध्यक्ष श्री. संजय पुराणिक.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. संजय पुराणिक यांनी काल शांतीवनला सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी शांतीवनमधील मुलांसाठी सुरू असलेले विविध प्रकल्प, निवासी व्यवस्था, शिक्षण, आरोग्य, संस्कार आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेले उपक्रम प्रत्यक्ष पाहिले.

यावेळी त्यांच्यासोबत बालहक्क आयोगाचे सदस्य आणि शांतीवनचे मार्गदर्शक मा. श्री. अतुल देसाई, जिल्हा बालकल्याण अधिकारी श्री. फारूक शेख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. निर्मळ साहेब तसेच संबंधित कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

शांतीवनमधील प्रत्येक प्रकल्प आणि मुलांसाठी सुरू असलेले काम पाहताना मा. श्री. संजय पुराणिक यांनी समाधान व्यक्त केले. प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या मुलांना केवळ निवारा आणि शिक्षण न देता त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, संस्कार आणि स्वावलंबन निर्माण करण्याचे शांतीवनचे कार्य त्यांनी जाणून घेतले.

संपूर्ण परिसर पाहिल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेले शब्द आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत.

“ही केवळ मुलांची काळजी घेणारी संस्था नाही, तर माणसं घडविणारी संस्था आहे.”

मा. श्री. संजय पुराणिक साहेबांनी व्यक्त केलेला हा अभिप्राय शांतीवनच्या संपूर्ण परिवारासाठी मोठी प्रेरणा आहे.

बालकांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांचे शिक्षण आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची आमची जबाबदारी आणखी वाढली आहे.

शांतीवनला दिलेला वेळ, आत्मीयता आणि प्रोत्साहन याबद्दल मा. श्री. संजय पुराणिक साहेबांसह उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधील पुरवणीत प्रसिद्ध झालेला माझा लेख..
09/08/2026

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधील पुरवणीत प्रसिद्ध झालेला माझा लेख..

आज राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते साहेब बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी  ...
07/08/2026

आज राज्याचे पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते साहेब बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी मला पोलीस अधीक्षक कार्यालयात निमंत्रित केले होते.
दाते साहेबांनी मला वैयक्तिक वेळ देऊन सविस्तर चर्चा केली. शांतीवनच्या कामाविषयी माहिती जाणून घेत त्यांनी कामाची प्रशंसा केली. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी गृहखात्याला एक चांगले अधिकारी लाभले आहेत, याचा आनंद वाटला.
यावेळी माझी पुस्तके त्यांना भेट दिली. सोबत बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत.
दीपक नागरगोजे..
Deepak Nagargoje

प्रेरणादायी भेट!आज महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव मा. श्री. आबासाहेब नागरगोजे यांनी शांतीवनला सदि...
24/07/2026

प्रेरणादायी भेट!

आज महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव मा. श्री. आबासाहेब नागरगोजे यांनी शांतीवनला सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी शांतीवनमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची, निवासी प्रकल्पांची, शिक्षण, संगोपन, शेती तसेच सर्वांगीण विकासाच्या कामांची सविस्तर पाहणी केली. शांतीवनमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मुलांसाठी उभे राहिलेले संवेदनशील आणि समाजाभिमुख कार्य पाहून त्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला व संपूर्ण टीमच्या कार्याचे कौतुक केले.

अशा मान्यवरांच्या भेटी आणि प्रोत्साहनामुळे आमच्या कार्याला नवी ऊर्जा, नवा उत्साह आणि अधिक जबाबदारीची जाणीव मिळते. त्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांसाठी शांतीवन परिवारातर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार!

#शांतीवन #समाजसेवा #बालकल्याण #प्रेरणा #महाराष्ट्र

डॉक्टर गेले..  एक अस्वस्थ विचारवंत काळाच्या पडद्याआड🙏डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाची बातमी मनाला खोलवर चटका लावून गेल...
19/07/2026

डॉक्टर गेले..
एक अस्वस्थ विचारवंत काळाच्या पडद्याआड🙏

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाची बातमी मनाला खोलवर चटका लावून गेली. माझ्यासाठी ते केवळ ज्येष्ठ समाजवादी नेते नव्हते, तर शांतीवनच्या सुरुवातीच्या काळापासून सतत मार्गदर्शन करणारे, आधार देणारे आणि आपुलकीने पाठिशी उभे राहणारे माझे मार्गदर्शक होते.

मी पुण्यात आलो की वेळ जुळला, तर गांधी भवनमध्ये त्यांच्यासोबत बसणं हा जणू आमचा नित्यक्रमच होता. त्या भेटींमध्ये तासन्तास गप्पा रंगायच्या. मराठवाड्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सामाजिक प्रश्न, दुष्काळ, शेतकरी, शिक्षण, युवक, सामाजिक चळवळी, राजकारण आणि परिवर्तनाचे मार्ग... कितीतरी विषयांवर त्यांची मांडणी ऐकताना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळायचं. त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा आवाका इतका मोठा होता की प्रत्येक भेट ही माझ्यासाठी एका विद्यापीठात बसल्यासारखी असायची.

डॉक्टर नेहमी म्हणायचे, "मी कायम युवा आहे." हे ते फक्त बोलत नव्हते, तर जगत होते. वय हा त्यांच्यासाठी केवळ एक आकडा होता. त्यांचं मन, त्यांची ऊर्जा आणि तरुणांवरचा विश्वास शेवटपर्यंत तितकाच जिवंत राहिला. युवक क्रांती दलाच्या माध्यमातून त्यांनी संघर्षाची जी मशाल पेटवली, तिने महाराष्ट्राला असंख्य संवेदनशील आणि लढाऊ कार्यकर्ते दिले.

आनंदवनात श्रद्धेय बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या सोमनाथ श्रमसंस्कार शिबिराला सुरुवातीपासून आकार देण्यात डॉ. कुमार सप्तर्षी यांचे मोठे योगदान होते. त्या शिबिराविषयी त्यांना विलक्षण आत्मीयता होती. त्यामुळे सोमनाथ शिबिरातून घडलेला प्रत्येक कार्यकर्ता त्यांना आपल्या घरातील सदस्यासारखाच वाटायचा. मलाही त्यांनी नेहमी तसंच प्रेम दिलं.

डॉक्टरांच्या व्यक्तिमत्त्वातील एक गोष्ट मला कायम भावायची—त्यांच्यात मोठेपणाचा कसलाही गर्व नव्हता. एकदा मी त्यांना फोन करून विचारलं, "डॉक्टर, भेटायला येऊ का?" ते पुण्यातच होते. त्यांनी विचारलं, "तू कुठे आहेस?" मी म्हणालो, "एफ. सी. रोडवर आहे." त्यावर ते सहज म्हणाले, "अरे, मीच तुझ्याकडे येतो." थोड्याच वेळात मी, डॉ. कुमार सप्तर्षी आणि संदीप बर्वे यांची फर्ग्युसन रोडवर भेट झाली. डॉक्टर म्हणाले, "आता संध्याकाळचे पाच वाजले. आमच्यासारख्या डायबिटीसच्या पेशंटने या वेळी काहीतरी खाल्लं पाहिजे. चला, नाश्ता करूया." आम्ही वैशालीमध्ये बसलो. नाश्ता करत करत खूप वेळ गप्पा झाल्या. एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस एका कार्यकर्त्याला भेटण्यासाठी स्वतः चालत येतो, त्याच्यासोबत सहजपणे बसून संवाद साधतो—ही त्यांची साधेपणाची आणि माणुसकीची खरी ओळख होती.

जात, धर्म, पंथ, पक्ष यांच्या पलीकडे जाऊन माणसासाठी काम करणं हेच त्यांचं खरं तत्त्व होतं. गांधी भवन ही त्यांच्यामुळे हजारो तरुणांची हक्काची जागा बनली. तिथे आलेल्या प्रत्येक तरुणाला त्यांनी विचार दिला, दिशा दिली आणि उभं राहण्याचं बळ दिलं.

मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला, त्या कठीण काळात त्यांनी वेळोवेळी मला मोलाचं सहकार्य केलं. अनेक संवेदनशील व्यक्ती आणि संस्थांशी परिचय करून दिला. शांतीवनच्या कार्यासाठी अनेकांना जोडून दिलं. शांतीवनचा प्रवास इथपर्यंत बळकट होण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

आज डॉक्टर आपल्यात नाहीत. पण त्यांचे विचार, त्यांचे मार्गदर्शन, त्यांची साधी राहणी, समाजाबद्दलची अस्वस्थता, माणसांवरचं निस्सीम प्रेम आणि परिवर्तनासाठी झटण्याची जिद्द कायम प्रेरणा देत राहील.

अशी माणसं निघून जातात तेव्हा केवळ एक व्यक्ती जात नाही, तर समाजाचं एक विचारविश्व, एक विद्यापीठ आणि एक जिवंत प्रेरणास्थान हरपून जातं.

डॉ. कुमार सप्तर्षी सरांना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐

09/07/2026
बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. जितीन रहमान (IAS) यांनी शांतीवनने ऊसतोड कामगार, वंचित आणि अनाथ मुल...
04/07/2026

बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. जितीन रहमान (IAS) यांनी शांतीवनने ऊसतोड कामगार, वंचित आणि अनाथ मुलींसाठी उभारलेल्या 'मातृमंदिर' प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. प्रकल्पाची सविस्तर पाहणी करून त्यांनी संपूर्ण उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि समाधान व्यक्त केले.

यावेळी त्यांनी सांगितले की,

"ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी उभारण्यात आलेले 'मातृमंदिर' हे केवळ निवासी वसतिगृह नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी केंद्र आहे. या प्रकल्पामुळे मुलींचे शिक्षण खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल, बालविवाहाला आळा बसेल, अल्पवयीन मातृत्व, मुलींवरील लैंगिक अत्याचार आणि असुरक्षिततेसारख्या गंभीर समस्यांवर प्रभावी उपाय होईल. शिक्षणाच्या माध्यमातून वंचित घटकातील मुलींना सन्मानाने जगण्याची संधी देणारा आणि त्यांचे समाजात सक्षम पुनर्वसन करणारा हा अत्यंत दिशादर्शक प्रकल्प आहे. बीड जिल्ह्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासामध्ये हा प्रकल्प निश्चितच मोलाची भर घालणार असून, अशा प्रकारचे उपक्रम जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत."

प्रकल्पातील मुलींसोबत संवाद साधत त्यांच्या शिक्षणाची, स्वप्नांची आणि भविष्यातील ध्येयांचीही त्यांनी आत्मीयतेने विचारपूस केली. त्यांच्या या भेटीमुळे शांतीवन परिवाराला नवी प्रेरणा मिळाली असून, प्रत्येक वंचित मुलीपर्यंत सुरक्षित निवास, दर्जेदार शिक्षण आणि उज्ज्वल भविष्याची संधी पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे..
#शांतीवन #मातृमंदिर #मुलींचेशिक्षण #ऊसतोडकामगार #बीड

अभिनंदन  अंकिता....प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आमची कन्या कु. अंकिता काळे हिचे बीबीएमध्ये विशेष प्राविण्यासह यश! शांतीव...
04/07/2026

अभिनंदन अंकिता....
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आमची कन्या कु. अंकिता काळे हिचे बीबीएमध्ये विशेष प्राविण्यासह यश!

शांतीवन परिवारासाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे.

ग्रामीण भागातून पुण्यासारख्या महानगरात जाऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयातून बीबीए पदवी विशेष प्राविण्यसह संपादन करणाऱ्या शांतीवनची कन्या कु. अंकिता काळे हिने उल्लेखनीय यश मिळवले आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षणाचा प्रवास करत हे यश मिळवणे ही निश्चितच साधी गोष्ट नाही. संघर्ष, जिद्द, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास यांच्या बळावर अंकिताने हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशाचा आम्हा सर्वांना मनापासून अभिमान वाटतो.

पुढील शिक्षणासाठी अंकिताला पुण्यात पाठवताना तिच्यावर आणि तिच्या क्षमतेवर आम्ही विश्वास ठेवला होता. आज तिने आपल्या गुणवत्तेने, मेहनतीने आणि यशाने त्या विश्वासाचे सार्थक केले आहे. शांतीवन च्या प्रत्येक मुलामुलीमध्ये मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची ताकद आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती अंकिताने करून दिली आहे.

कु. अंकिता काळे हिचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! तिच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

या प्रवासात शांतीवनवर विश्वास ठेवून सातत्याने साथ देणाऱ्या सर्व दाते, हितचिंतक आणि विशेषतः मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष मा. भाऊसाहेब जाधव यांचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. त्यांच्या सहकार्यामुळेच ग्रामीण भागातील अनेक मुला-मुलींना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती साकार करण्याची संधी मिळत आहे.

अंकिताच्या यशात तिच्या मेहनतीसोबतच अनेक संवेदनशील हातांचे आशीर्वाद आणि सहकार्य सामावलेले आहे. हा प्रवास अशाच अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरो, हीच सदिच्छा!

ऊसतोड , शेतकरी आत्महत्या..आता कोणत्याही मुलीचे शिक्षण परिस्थितीपुढे हारणार नाही...!बीड जिल्हा आणि मराठवाड्यातील मोठा भाग...
28/06/2026

ऊसतोड , शेतकरी आत्महत्या..
आता कोणत्याही मुलीचे शिक्षण परिस्थितीपुढे हारणार नाही...!

बीड जिल्हा आणि मराठवाड्यातील मोठा भाग हा ऊसतोड कामगारांच्या प्रचंड संख्येमुळे स्थलांतरित कामगारांचा पट्टा म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर बीड जिल्हा हा शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांपैकी एक आहे. या दोन्ही सामाजिक वास्तवामुळे हजारो मुलींचे शिक्षण अर्धवट थांबते, त्या शाळाबाह्य होतात, बालविवाहाच्या विळख्यात अडकतात आणि त्यांच्या आयुष्याची स्वप्ने अपूर्ण राहतात. या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणजे मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून सुरक्षित पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देणे. हीच गरज ओळखून सामाजिक कार्यकर्ते दीपक नागरगोजे आणि कावेरी नागरगोजे यांच्या संकल्पनेतून शांतिवनने "मातृमंदिर" या निवासी शैक्षणिक प्रकल्पाची उभारणी केली आहे. तब्बल १२ एकर परिसरात विस्तारलेल्या या सुसज्ज संकुलात मुलींच्या शिक्षण, निवास, संगोपन, संरक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातील ऊसतोड कामगार, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे, एकल पालक तसेच पालक नसलेल्या गरजू मुलींनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे शांतिवनतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

आजही मराठवाड्यातील हजारो मुली ऊसतोडणीसाठी पालकांसोबत स्थलांतर करत असल्यामुळे किंवा आई-वडिलांचे छत्र नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात. अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट थांबते आणि त्यांचे आयुष्य अंधाराकडे वळते. हीच वेदना ओळखून शांतिवनने या मुलींसाठी सुरक्षित, प्रेमळ आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली आहे.

"मातृमंदिर" हे केवळ निवासी विद्यालय नाही, तर मुलींच्या सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि स्वाभिमानी भविष्यासाठी उभारलेले एक घर आहे. येथे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत निवासी शिक्षणाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.

१५ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश सुरू आहेत.

या संकुलामध्ये विद्यार्थिनींसाठी पब्लिक स्कूलच्या धर्तीवरील आधुनिक आणि दर्जेदार सर्व सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षण, निवासी व्यवस्था, पौष्टिक आहार, पुस्तके, वह्या, गणवेश, आरोग्य सेवा, व्यक्तिमत्त्व विकास, क्रीडा, संस्कार आणि सर्वांगीण विकासाच्या सर्व सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. कोणतेही प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क किंवा इतर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

माझे सर्व सामाजिक कार्यकर्ते, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, शिक्षक, पत्रकार, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, ऊसतोड मुकादम आणि समाजातील सर्व संवेदनशील नागरिकांना नम्र आवाहन आहे की, आपल्या परिसरात शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेली एखादी मुलगी आपल्या निदर्शनास आल्यास तिच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. तिच्या कुटुंबाशी संपर्क साधा आणि तिला शांतिवनच्या "मातृमंदिर" निवासी शैक्षणिक प्रकल्पात प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करा.

एका मुलीचे शिक्षण म्हणजे एका पिढीचे भविष्य घडविणे होय. चला, एकत्र येऊया आणि ऊसतोडणी, दारिद्र्य किंवा परिस्थितीमुळे एकाही मुलीचे शिक्षण थांबू देऊ नका.

अधिक माहितीसाठी संपर्क :

दीपक नागरगोजे
संस्थापक, शांतिवन

मो. ९९२३७७२६९४ / ७०२८३७२६९४

पत्ता :
शांतिवन, आर्वी, ता. शिरूर कासार, जि. बीड.

Address

Shantiwan, Arvi TQ Shirur Kasar Dist Beed
Bhir
413249

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shantiwan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shantiwan:

Shortcuts

Share