12/05/2026
पुण्यातील सर्वात आलिशान समजल्या जाणाऱ्या त्या बंगल्याच्या अवाढव्य बेडरूममध्ये आज कमालीची शांतता पसरली होती......
श्रीधरजी
मखमली बेडवर खिन्न होऊन बसले होते.
बाहेर सुसाट धावणाऱ्या जगाची आणि स्वतःच्याच प्रगतीची चाके कुठेतरी चिखलात रुतल्यासारखी
श्रीधरजींना
भासत होती.
श्रीधरजींना बेडरूमच्या त्या एकांतात जाणवले की,
कोट्यावधींच्या मालमत्तेच्या यादीत आरोग्य नावाचा रकाना रिकामाच राहिला होता.
पन्नाशी पार केल्यानंतर मिळालेली ही चेतावणी त्यांना खूप काही शिकवून जात होती.
दोन दिवसापूर्वीचा तो प्रसंग आठवला की श्रीधरजीच्या अंगावर काटा येत होता. ज्या हातांनी पुण्याच्या क्षितिजावर गगनचुंबी इमारती उभ्या केल्या, तेच हात आता अचानक थांबले होते.
डॉक्टरांनी निदान केले होते श्रीधरजींना
माईल्ड ब्रेन स्ट्रोक
आला होता. सुदैवाने वेळेत उपचार मिळाले म्हणून अनर्थ टळला पण या एका घटनेने
श्रीधर फडके
नावाच्या वादळाला एका क्षणात शांत केले होते.
श्रीधरजींच्या मनात मात्र एका नव्या संघर्षाची ठिणगी पडली होती. भविष्यात जर असा ब्रेन स्ट्रोक आला तर पॅरालिसिस होण्याची संभाव्यता होती.....
श्रीधरजीचा हा संघर्ष आता स्वतःला पुन्हा सावरण्यासाठी आणि निसटलेलं आयुष्य पुन्हा जगण्यासाठी होता.
आज पहिल्यांदाच त्या करारी चेहऱ्यावर आत्मविश्वासाऐवजी उदासीचे सावट होते. ज्या डोळ्यांत कधी काळी भविष्यातील उत्तुंग प्रकल्पांची स्वप्ने असायची, तिथे आज हताशपणाचे अश्रू साचले होते.
श्रीधर फडके!!!
शून्यातून नभाला गवसणी घालणारा ध्येयवेडा.....
पुण्यातील बिल्डर लॉबीत आज
श्रीधर फडके
हे नाव आदराने आणि तितक्याच जरबेने घेतले जाते. पण या नावामागे पंचेवीस वर्षांच्या आयुष्याचा संघर्ष दडला होता.
गेल्या पंचेवीस वर्षांत श्रीधरजींनी कधी मागे वळून पाहिलेच नव्हते. कोकणातून अनवाणी पायांनी आलेला तो तरुण, पायाला भिंगरी लागल्यासारखा धावत होता.
आज श्रीधर कोट्याधीशाच्या यादीत असतील, पण त्यांच्या यशाच्या प्रत्येक विटेखाली त्यांच्या तरुणपणातील संघर्षाचा घाम गाडलेला होता.
श्रीधरजींनी आपल्या ध्येयासाठी स्वतःच्या सुखाचा, विरंगुळ्याचा आणि कित्येकदा स्वतःच्या आरोग्याचाही बळी दिला होता. ज्या वयात तरुण मुलं मौजमजा करतात, त्या वयात श्रीधरजींनी बांधकामाच्या साईटवर धूळ आणि ऊन अंगावर झेलत
शून्यातून विश्व
निर्माण केलं होतं.
कामाचा प्रचंड ताण, अपुरी झोप आणि वेळेवर न जेवणं या गोष्टींचा श्रीधरजींनी कधी विचारच केला नाही. त्यांना वाटले होते,
पैसा आणि यश सर्वकाही विकत घेऊ शकते
, पण काल नियतीने त्यांना जाणीव करून दिली की,
शरीर थकले तर साम्राज्य फिके पडते.
श्रीधर फडके यांच्या आयुष्यातील हा टप्पा म्हणजे यशाच्या शिखरावर बसलेल्या एका
एकाकी सम्राटाची शोकांतिका
होती.
बेडरूमच्या भिंतीवर टांगलेलं घड्याळ टिकटिक करत होतं, पण श्रीधरजींना वाटत होतं की त्यांचं आयुष्य वीस वर्षांपूर्वीच कुठेतरी थांबलं आहे.
डोळे मिटले की श्रीधरजींना आजही पुण्याचा तो कॉलेज कॅम्पस आठवतो......
कोकणच्या लाल मातीचा सुगंध घेऊन सिव्हिल इंजिनिअर व्हायला पुण्यात आलेला श्रीधर आणि तिथेच भेटलेली मृदू स्वभावाची
रेवती.....
दोघांच्या प्रेमाला घरच्यांनी संमती दिली.....
लग्न झालं आणि एका सुखी संसाराला सुरवात झाली.
पण
सुखाचा रस्ता पैशांच्या गल्लीतून जातो,
हा समज श्रीधरजींच्या मनात घर करून बसला होता.
लग्नानंतर खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली.
रेवती
आणि होणाऱ्या बाळाला जगातलं सर्व सुख मिळावं, या ध्येयाने श्रीधर झपाटले गेले होते.
मुलगी
विहा
जन्माला आली, पण तिच्या पहिल्या रांगण्याचं कौतुक करायला श्रीधर हैद्राबादच्या साईटवर होते. तिच्या पहिल्या शब्दाचा आनंद घ्यायला ते चेन्नईत होते.
मुंबई, बेंगलोर, चेन्नई... शहरांची नावं बदलत होती, बँँक बॅलन्स वाढत होता, पण घरातला बाप आणि पती मात्र हरवत चालला होता.
रेवतीने हजारदा हात जोडून सांगितलं होतं.....
'श्रीधर, आता थांब! आपल्याला राजवाडा नकोय, हसतं-खेळतं घर हवंय.'
पण
पैशाची नशा ही दारूच्या नशेपेक्षाही भयंकर असते.
श्रीधरना वाटायचं की रेवतीला त्यांच्या कष्टाची किंमत नाही. वाद वाढले, भिंती उंच होत गेल्या आणि अखेर एक दिवस त्या नात्याचा पायाच खचला. दोघेही विभक्त झाले.....
"आजपासून तुझा चेहरा मला कधीच दाखवू नकोस."
रेवतीचे हे शेवटचे शब्द आजही श्रीधरच्या कानात शिशासारखे टोचतात. तोच राग, तोच अहंकार उराशी बाळगून श्रीधरने मागे वळून पाहिलं नाही.....
आज
विहा
वीस वर्षांची झाली असेल.
स्वतःच्या रक्ताचं ते
कन्यारत्न
कसं दिसत असेल, हे पाहण्याचं भाग्यही या कोट्याधीशाच्या नशिबात नव्हतं. जिच्या सुखासाठी त्यांनी रात्रंदिवस एक केला, तिलाच त्यांनी जिवंतपणी पोरकं केलं होतं.
सर्वात मोठी वेदना तर ही होती की, ज्या आई-वडिलांच्या संस्कारांवर ते मोठे झाले, त्यांनीही श्रीधरच्या या पैशाच्या हव्यासाला साथ दिली नव्हती. ते आजही कोकणातल्या त्याच साध्या घरात राहायचे.
आजच्या धावपळीच्या युगात आपण अनेकदा पैशाच्या मागे धावताना खऱ्या आनंदाला मुकतो.
पण खरा आनंद हा बँकेतील खात्यात नसून आपल्या माणसांच्या सोबत असणाऱ्या क्षणांमध्ये असतो, हे या कथेतून मला मांडायचे आहे.
नाती ही देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट असते.
रक्ताच्या नात्यात असलेले प्रेम, रुसवे-फुगवे, त्याग आणि एकमेकांसाठी असलेली ती अथांग ओढ... याच भावनांना मी शब्दांत गुंफण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
'दृष्टांत'
ही कथा आपल्याला आठवण करून देईल की, पैशाशिवायही नात्यांमधील प्रेमाच्या बळावर आनंदी आयुष्य कसं जगता येतं.
ही फक्त एक काल्पनिक कथा नाही, तर आपल्या अवतीभवती घडणाऱ्या सुख-दुःखाच्या क्षणांचे प्रतिबिंब आहे.
तुमच्या प्रेमाची, शुभेच्छांची आणि अमूल्य अभिप्रायांची मला नितांत गरज आहे.
ही कथा वाचताना तुमच्या मनात येणारे विचार मला कळवायला विसरू नका!
© प्रशांत जोशी ®
पुण्यातील सर्वात आलिशान समजल्या जाणाऱ्या त्या बंगल्याच्या अवाढव्य बेडरूममध्ये आज कमालीची शांतता पसरली होती...... ....