07/05/2026
दुर्गम आणि आदिवासी भागातील जारावंडी (दिंडवी), ता. एटापल्ली येथील काशिनाथ संनू टेकाम हा संस्कार संस्थेच्या शैक्षणिक दत्तक उपक्रमांतर्गत आलेल्या पहिल्या दोन विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी आहे.
आपल्या गावात शिक्षणाच्या मर्यादित सुविधा असल्यामुळे चांगले शिक्षण घेण्याच्या उद्देशाने तो एटापल्ली तालुक्याच्या ठिकाणी आला. परिस्थिती अत्यंत साधी, आर्थिक अडचणी मोठ्या; पण डोळ्यांत शिक्षणाची जिद्द आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची तीव्र इच्छा होती.
मदतीच्या अपेक्षेने त्याचा संस्कार सरांशी संपर्क आला आणि संस्कार संस्थेने त्याला शैक्षणिक दत्तक घेतले. संस्थेच्या सहकार्याने आणि स्वतःच्या अथक मेहनतीच्या जोरावर त्याने 10 वी व 12 वी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण केली.
पुढे त्याने फॉरेस्ट भरतीची तयारी सुरू ठेवली आणि विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात वनविभागात नोकरी मिळवून यश संपादन केले.
आज काशिनाथ केवळ नोकरी करत नाही, तर आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी समाजजागृती, पर्यावरण संरक्षण, जनसेवा आणि सकारात्मक विचारांचा प्रसार करण्याचे कार्यही प्रामाणिकपणे करत आहे. संस्कार सर आणि सामुदायिक प्रार्थना या शिक्षणातून मिळालेले संस्कार आणि समाजाप्रती असलेली जाणीव यामुळे तो अनेक युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
एका दुर्गम गावातील विद्यार्थ्याचा हा प्रवास हे सिद्ध करतो की योग्य मार्गदर्शन, शिक्षणाची संधी आणि समाजाचे सहकार्य मिळाल्यास कोणताही विद्यार्थी यशाची उंच भरारी घेऊ शकतो.
या यशामागे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणारे सर्व दानदाते, शुभचिंतक, मार्गदर्शक आणि सहयोगी यांचे मनःपूर्वक आभार.
आपले प्रेम, सहयोग आणि आशीर्वाद असेच कायम लाभत राहोत, ही नम्र अपेक्षा. 🙏