28/08/2025
“जमिनीचे महत्त्व स्थानिकांनी न ओळखले की त्यांना ते मुद्दाम समजावून सांगितले गेले नाही?” – हा प्रश्न आज सिंधुदुर्गाच्या सामाजिक आणि राजकीय वास्तवाला भिडतो.
दिल्ली, गुजरात, राजस्थान किंवा केरळसारख्या ठिकाणांहून आलेले गुंतवणूकदार आणि व्यापारी जर सिंधुदुर्गातील डोंगरदर्या, किनारे, सुपीक जमीन व भविष्यातील पर्यटन-व्यवसायाचे महत्त्व ओळखून इथे लाखोंची गुंतवणूक करत असतील, तर मग स्थानिक नेतृत्वाने हा विचार का केला नाही? आणि केला असेल, तर तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून का सांगितला गेला नाही?
*परराज्यातील युवकांचे दूरदृष्टीपूर्ण पाऊल*
एखादा मारवाडी युवक पाच वर्षांपूर्वी फरशी बसवण्याचे काम करण्यासाठी सिंधुदुर्गात येतो. अल्पावधीतच तो जमीन विकत घेतो, दुकान उघडतो आणि स्थिर व्यवसाय उभा करतो. त्याला रोजगाराची शक्यता दिसते, पण त्याच ठिकाणी स्थानिक युवकाला का दिसत नाही?त्याचे कारण म्हणजे –बाहेरचा युवक आपल्या कलेचा (उदा. फरशी बसवणे) उपयोग करून आर्थिक भांडवल तयार करतो.
स्थानिक युवक मात्र उच्चशिक्षण घेतल्यावर मुंबई–पुण्यात स्थायिक होतो. काही अपवाद वगळता सिंधुदुर्गात शिल्लक राहतात ते बहुतेक अकुशल, आर्थिक दृष्ट्या मागासलेले युवक.यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याची दृष्टी स्थानिकांकडून मागे पडते.
*स्थलांतराचे वाढते संकट*
आज मारवाडी, गुजराती, बिहारी, केरळी समाज सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात व्यवसाय स्थिर करत आहेत. स्थानिक युवकही काही क्षेत्रात व्यवसाय उभा करतात, पण शहराकडे होणारे स्थलांतर कमी होत नाही.
जर हा प्रवाह असाच सुरू राहिला तर स्थानिक मतदारसंख्या घटेल.
बाहेरच्या समाजाचे प्रमाण वाढेल.
आणि भविष्यात सिंधुदुर्गातील राजकीय नेतृत्व ठरविण्याची ताकद हाच परप्रांतीय समाज प्राप्त करेल.हा धोका लक्षात येऊनही स्थानिक राजकीय नेतृत्व काय उपाययोजना करते आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
*गोवा–सिंधुदुर्ग तुलना* सिंधुदुर्ग आणि गोवा भौगोलिक दृष्ट्या साधर्म्य असलेले आहेत. गोवा राज्य असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी तिथे उपलब्ध होतो आणि पर्यटन क्षेत्रासह विविध कंपन्या स्थानिकांना रोजगार देतात.मग सिंधुदुर्गात मोठ्या कंपन्या का येत नाहीत?त्यांना जाणीवपूर्वक रोखले जाते का?
की स्थानिक नेतृत्वाने त्यांना आकर्षित करण्यासाठी कोणतीच पावले उचलली नाहीत?जर अशा कंपन्या आल्या तर –उच्चशिक्षित स्थानिक तरुणांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील.त्यांचे स्थलांतर थांबेल.आणि जिल्ह्यातील बाजारपेठेत भरमसाठ पैसे फिरून अर्थव्यवस्था सक्षम बनेल.भविष्यातील धोका – मुंबईचा धडा.मुंबईत मराठी लोकसंख्येवर गुजराती–मारवाडी वर्चस्व गाजवत आहेत.हाच अनुभव भविष्यात सिंधुदुर्गात येऊ शकतो. साटेली–भेडशीसारख्या भागांत त्याची सुरुवात झाल्याचे चित्र दिसते.जर योग्य वेळी धोरणात्मक पावले उचलली नाहीत, तर स्थानिक युवक उपेक्षित राहतील, आणि सिंधुदुर्गाच्या राजकारणात बाहेरच्या समाजाची निर्णायक भूमिका निर्माण होईल.
*निष्कर्ष*
सिंधुदुर्गातील जमीन, संसाधने, भौगोलिक स्थान व पर्यटनाची क्षमता ही अमूल्य आहे.
पण या क्षमतेचे जनप्रबोधन स्थानिक राजकीय व सामाजिक नेतृत्वाने केले नाही किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, हीच खरी शोकांतिका आहे
उच्चशिक्षित तरुणांचे स्थलांतर थांबवण्यासाठी, परराज्यातील गुंतवणूकदारांचे वर्चस्व रोखण्यासाठी आणि स्थानिक युवकांना रोजगारनिर्मितीत पुढे आणण्यासाठी मोठ्या प्रकल्पांना जिल्ह्यात आणणे,
उद्योग–पर्यटन क्षेत्रात संधी निर्माण करणे,आणि स्थानिकांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे –या तातडीच्या गरजा आहेत.अन्यथा, “सिंधुदुर्ग विकला जातोय हे घोष वाक्य खरं ठरेल.
साभार _ कोकण लाईव ब्रेकिंग