चांद्रसेनीय कायस्थ प्रभु : इतिहास आणि जीवनशैली

  • Home
  • India
  • Thane
  • चांद्रसेनीय कायस्थ प्रभु : इतिहास आणि जीवनशैली

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु : इतिहास आणि जीवनशैली चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचे हक्काचे व्यासपीठ!

पद्मभूषण राम प्रधान : देशाच्या प्रशासनावर ठसा उमटवणारे कर्तृत्ववान प्रशासकचांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजातील एक हिरा म्हण...
07/08/2026

पद्मभूषण राम प्रधान : देशाच्या प्रशासनावर ठसा उमटवणारे कर्तृत्ववान प्रशासक

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजातील एक हिरा म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल असे मुत्सद्दी प्रशासकीय अधिकारी म्हणजे रामचंद्र दत्तात्रय प्रधान अर्थात राम प्रधान. आपल्या ज्ञातीच्या इतिहासातील मुत्सद्देगिरीची परंपरा त्यांनी आधुनिक काळत जपली.

राम प्रधान हे भारतीय प्रशासकीय सेवेतील एक अत्यंत कर्तृत्ववान अधिकारी म्हणून ओळखले जायचे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव, भारताचे केंद्रीय गृहसचिव, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करताना त्यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याचा ठसा उमटवला. पंजाब, आसाम आणि मिझोराममधील शांतता प्रक्रियेपासून ते २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा शोध घेण्यापर्यंत त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा विस्तार होता.

जन्म, बालपण आणि शिक्षण

राम प्रधान यांचा जन्म आषाढी एकादशीच्या दिवशी, २७ जून १९२८ रोजी दादर, मुंबई येथे झाला. त्यांचे आजोळ रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे होते. त्यांच्या आईचे नाव आनंदीबाई दत्तात्रय प्रधान होते.

त्यांचे प्राथमिक शिक्षण दादर येथील छबिलदास लल्लूभाई प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर तिसरी ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी दिल्लीतील शाळेत घेतले. वडिलांच्या बदलीमुळे पुढे ते पुण्यात आले आणि नानावाडा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी सुरुवातीला पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला; मात्र पुढे फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले. गणित विषय घेऊन त्यांनी प्रथम श्रेणीत बी.ए.ची पदवी संपादन केली. संख्याशास्त्राच्या क्षेत्रात कारकीर्द करण्याचा त्यांचा सुरुवातीचा विचार होता. मात्र, पुढे त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. १९५१ मध्ये ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १ एप्रिल १९५२ रोजी ते IAS प्रशिक्षणासाठी दिल्लीला गेले आणि त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. १७ जानेवारी १९५४ रोजी लोपामुद्रा गडकरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

महाराष्ट्रातून सुरू झाली प्रशासकीय कारकीर्द

IAS अधिकारी म्हणून राम प्रधान यांनी महाराष्ट्रासह गुजरातमध्येही विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केले. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असताना महालक्ष्मी मंदिराच्या व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि पुढे देशाचे संरक्षणमंत्री झालेले यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत त्यांनी जवळून काम केले. चव्हाण यांचे विश्वासू सहकारी आणि सचिव म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
यानंतर त्यांच्या कारकीर्दीला आंतरराष्ट्रीय परिमाण लाभले. जिनिव्हा येथे त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. संयुक्त राष्ट्रांच्या यंत्रणेशी संबंधित जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि राजनैतिक क्षेत्रातील या अनुभवाने त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीला वेगळी उंची मिळाली.

महाराष्ट्राचे गृहसचिव ते मुख्य सचिव

परदेशातील जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर राम प्रधान पुन्हा महाराष्ट्राच्या प्रशासनात परतले. १९७७ ते १९८१ या काळात त्यांनी महाराष्ट्राचे गृहसचिव म्हणून काम केले. त्यानंतर १९८२ मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव झाले.
राज्य प्रशासनातील प्रदीर्घ अनुभवामुळे पुढे त्यांच्यावर केंद्र सरकारमधील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. गृह, संरक्षण आणि वाणिज्याशी संबंधित वरिष्ठ प्रशासकीय पदांवर त्यांनी काम केले आणि अखेरीस भारताचे केंद्रीय गृहसचिवपद भूषविले.

पंजाब, आसाम आणि मिझोराम शांतता प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका

राम प्रधान यांच्या प्रशासकीय कारकीर्दीतील सर्वाधिक महत्त्वाचा अध्याय म्हणजे देशातील अंतर्गत संघर्ष सोडवण्यासाठी त्यांनी बजावलेली भूमिका ही होय. १९८० च्या दशकात पंजाबमधील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली होती. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत प्रधान यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली. सरकार आणि अकाली नेतृत्वामध्ये संवाद निर्माण करण्याच्या प्रयत्नांत त्यांनी पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावली.

पंजाबबरोबरच आसाम आणि मिझोराममधील शांतता प्रक्रियेतही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. विविध पक्षांशी संवाद साधणे, प्रशासकीय अडचणी समजून घेणे आणि राजकीय नेतृत्वाला योग्य तो समन्वय साधून देणे या त्यांच्या कौशल्याचा या काळात देशाला मोठा फायदा झाला.
भारतीय प्रशासकीय सेवेत तीन दशकांहून अधिक काळ काम केल्यानंतर ते ३० जून १९८६ रोजी निवृत्त झाले.

पद्मभूषणने गौरव

देशाच्या प्रशासनातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने १९८७ मध्ये राम प्रधान यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले.
निवृत्तीनंतरही त्यांच्या अनुभवाचा उपयोग देशाने करून घेतला. त्यांची अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. अरुणाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली. काही काळ त्यांच्याकडे बिहारच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारीही होती.

प्रशासकीय सेवेनंतर राजकारणात

प्रशासकीय सेवेनंतर राम प्रधान यांनी राजकीय क्षेत्रातही प्रवेश केला. १९९० मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून गेले.
राजीव गांधी, शरद पवार यांच्यासह तत्कालीन राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेतृत्वाशी त्यांचे जवळचे संबंध होते. या नेत्यांच्या राजकीय मतभेदांच्या काळात संवादाचा दुवा म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली.

सार्वजनिक जीवनाबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले. रायगड परिसरातील शैक्षणिक संस्थेसाठी त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ आर्थिक मदत केली.

२६/११ नंतर पुन्हा महाराष्ट्राने घेतला त्यांच्या अनुभवाचा आधार

निवृत्तीनंतर अनेक वर्षांनीही राम प्रधान यांच्या प्रशासकीय अनुभवाचे महत्त्व कमी झाले नव्हते. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला.

या हल्ल्यात मुंबईतील अनेक ठिकाणांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आणि देशाच्या सुरक्षा व्यवस्थेसमोर गंभीर प्रश्न उभे राहिले. हल्ल्याच्या वेळी पोलीस, गुप्तचर आणि प्रशासकीय यंत्रणा नेमकी कुठे कमी पडली, याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ३० डिसेंबर २००८ रोजी उच्चस्तरीय द्विसदस्यीय समिती स्थापन केली.

या समितीच्या अध्यक्षपदी राम प्रधान, तर माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी व्ही. बालचंद्रन यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे ही समिती ‘राम प्रधान समिती’ म्हणूनच प्रसिद्ध झाली.

समितीने मुंबई पोलिसांची कार्यपद्धती, संकटाच्या काळातील नेतृत्व व समन्वय, नियंत्रण कक्षाचे काम, गुप्तचर माहितीचा वापर, शस्त्रसज्जता आणि किनारी सुरक्षा अशा अनेक बाबींचा अभ्यास केला.

हल्ल्यासारख्या अभूतपूर्व परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल अधिक आधुनिक आणि सक्षम असणे आवश्यक असल्याचे समितीने अधोरेखित केले. अत्याधुनिक शस्त्रसामग्री, प्रभावी दळणवळण, विशेष प्रशिक्षण, जलद प्रतिसाद क्षमता आणि संकटाच्या वेळी अधिक सक्षम ‘कमांड अँड कंट्रोल’ व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

२६/११ नंतर महाराष्ट्रात पोलिसांचे आधुनिकीकरण, विशेष दहशतवादविरोधी क्षमता, क्विक रिस्पॉन्स व्यवस्था आणि सागरी सुरक्षेला मिळालेली अधिक प्राथमिकता या व्यापक सुधारणांच्या प्रक्रियेत प्रधान समितीचा अहवाल महत्त्वाचा संदर्भ ठरला.

प्रशासकाबरोबरच लेखकही

राम प्रधान हे केवळ सनदी अधिकारी आणि राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते; ते लेखकही होते. त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके लिहिली. आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि सार्वजनिक जीवनातील अनुभव त्यांनी लेखनातून पुढील पिढीपर्यंत पोहोचवले.

त्यांचे ‘माझी वाटचाल’ हे आत्मचरित्र त्यांच्या जीवनप्रवासाबरोबरच स्वातंत्र्योत्तर भारतातील प्रशासन आणि राजकारणातील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी समजून घेण्यासाठीही उपयुक्त ठरते.

एका प्रदीर्घ कारकीर्दीचा अंत

भारताच्या स्वातंत्र्योत्तर प्रशासकीय इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचे राम प्रधान केवळ साक्षीदार नव्हते, तर त्यातील काही घटनांमध्ये ते प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेचा भाग होते. जिल्हा प्रशासनापासून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदापर्यंत, केंद्रीय गृहसचिवपदापासून राज्यपालपदापर्यंत आणि राष्ट्रीय शांतता प्रक्रियेपासून २६/११ नंतरच्या सुरक्षा व्यवस्थेच्या पुनर्मूल्यांकनापर्यंत त्यांचा प्रवास विलक्षण व्यापक होता. ३१ जुलै २०२० रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी राम प्रधान यांचे निधन झाले.

बुद्धिमत्ता, प्रशासकीय कौशल्य, मुत्सद्देगिरी आणि सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ अनुभव यांचा संगम असलेले पद्मभूषण राम प्रधान यांनी भारतीय प्रशासनाच्या इतिहासात आपला स्वतंत्र ठसा उमटवला. त्यांच्या कार्याचा मागोवा घेताना एका व्यक्तीच्या कारकीर्दीबरोबरच स्वातंत्र्योत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या राजकीय, प्रशासकीय आणि सुरक्षाविषयक घडामोडींचाही इतिहास उलगडत जातो.

लेखाचे स्रोत -
- प्र. ल. मोकाशी लिखित आणि संजीव सुळे संपादित ग्रंथ - 'चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचा इतिहास'

- न्यूजस्टोरी टुडे वेब पोर्टल - https://newsstorytoday.com/थोर-प्रशासक-राम-प्रधान/

- मराठीसृष्टी वेबसाईट - https://www.marathisrushti.com/profiles/ram-pradhan/

#चांद्रसेनीय_कायस्थ_प्रभु #सीकेपी #रामप्रधान

आमच्या प्रत्येक पोस्टला भरभरून सहकार्य देणाऱ्या आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार!🎉 Rahul Tungare, Neelima Raje, Vilas Deshmu...
04/08/2026

आमच्या प्रत्येक पोस्टला भरभरून सहकार्य देणाऱ्या आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार!

🎉 Rahul Tungare, Neelima Raje, Vilas Deshmukh, Deepak Karnik, Nilesh Gupte, Swati Chitnis, Shrinivas Adhikari, Sunil Diksh*t, Mrunal Vaidya, Prasaad Potnis, Satish Mohile, Nitaben Chavda, Unmesh Chitre, Abhaya Pathare, Meghsham Deshpande, Chhaya Chaubal Dixit, Mangala Dawane, अशोक चिटणीस, Devendra Vaidya, Satish Gupte, Pradeep Dighe

26 जुलै हा 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. या कारगिल युद्धात अनेकांनी प्राणापणाने झुंज दिली. त्या सर्वांना आम...
27/07/2026

26 जुलै हा 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. या कारगिल युद्धात अनेकांनी प्राणापणाने झुंज दिली. त्या सर्वांना आमचे नमन. या कारगिल युद्धात आपल्या ज्ञातीच्या महान व कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाने देखील मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा आपण पुढे घेऊयात.

कारगिल योद्धा : एअर चीफ मार्शल अनिल यशवंत टिपणीस

लेखक : विंग कमांडर (निवृत्त) अशोक मोटे

लेख स्रोत : चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचा इतिहास या प्र. ल. मोकाशी लिखित आणि ज्ञातीच्या इतिहासाचे अभ्यासक संजीव सुळे यांनी संपादित केलेल्या ग्रंथातून साभार

अनिल यशवंत टिपणीस यांचा जन्म नाशिकजवळील देवळाली येथे झाला. देवळाली येथील बार्न्स विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण पार पडले. जानेवारी १९५६ मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एन.डी.ए.) पंधराव्या तुकडीमध्ये त्यांची निवड झाली. त्यांचे वडीलही सैन्याधिकारी होते. त्यामुळे घरातूनही सैन्यातल्या प्रवेशाला कायमच पाठिंबा होता.

लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून १९५९च्या जानेवारीमध्ये उड्डाण प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांनी एअर फोर्स फ्लाइंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते गोल्फमध्ये निष्णात असून मैदानी खेळांची त्यांना आवड आहे.

टिपणीस यांना लढाऊ वैमानिक म्हणून २८ मे १९६० रोजी नियुक्ती मिळाली. वैमानिकी प्रशिक्षणात सर्वोत्कृष्ट ठरल्याने त्यांना 'मजूमदार ट्रॉफी' मिळाली. त्यानंतर टिपणीस विविध लढाऊ स्क्वॉड्रन्समध्ये लढाऊ वैमानिक म्हणून अग्रिम हवाई मोर्च्यांवर कार्यरत होते. त्यांची पहिली नियुक्ती 'हंटर' स्क्वॉड्रनमध्ये झाली. १९६३मध्ये भारतात मिग-२१ विमाने आणून पहिली 'सुपरसॉनिक स्क्वॉड्रन' म्हणून अठ्ठाविसावी स्क्वॉड्रन निर्माण करणाऱ्या पहिल्या वैमानिकांपैकी ते एक होते. याच स्क्वॉड्रनमध्ये १९६५च्या भारत-पाक युद्धात मिग-२१चे लढाऊ वैमानिक म्हणून त्यांचा सक्रिय सहभाग होता. 'पायलट-अटॅक इन्स्ट्रक्टर' होण्याच्या प्रशिक्षणात पुन्हा सर्वोत्तम ठरल्याने, त्यांना १९६६मध्ये 'नरोन्हा ट्रॉफी' मिळाली. भारत सरकारतर्फे इराकी वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी 'पायलट अटॅक इन्स्ट्रक्टर' म्हणून ते जानेवारी १९७० मध्ये इराकला गेले. इराकहून परतल्यावर मिग-२१ विमानांच्या पंचेचाळिसाव्या स्क्वॉड्रनमध्ये ते फ्लाइट कमांडर म्हणून रुजू झाले.

१९७३ मध्ये भारतीय वायुसेनेच्या 'टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बैट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट'च्या (टॅकडे) उड्डाण प्रशिक्षण अभ्यासक्रमात सर्वोत्तम ठरल्याने त्यांना 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' (मानाची तलवार) मिळाली. त्यांनी त्या संस्थेत फ्लाइट कमांडर त्रैमानिकी रणनीती ह्या विषयांवर अध्ययन व संशोधन केले तसेच तेथे नियुक्त झाले.

त्यांनी हवाई युद्धाची योजना व लढाऊ वैमानिक म्हणून वेलिंग्टन येथे १९७५ मध्ये डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये त्यांनी सैनिकी प्रशासनाचे प्रशिक्षण पूर्ण केले. जुलै १९७७ मध्ये सुधारित 'मिग-२१ बिझ' विमानांच्या तेविसाव्या स्क्वॉड्रनचे ते विंग कमांडर दर्जाचे कमांडिंग ऑफिसर झाले. 'इंडो-सोव्हिएट जॉइंट स्पेस मिशन'साठी निवड झालेल्या चार अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. त्यांनी सर्व प्रशिक्षण यशस्विरीत्या पूर्णही केले, त्यांची अंतिम निवडही झाली; पण त्यांना राखीव दलात ठेवण्यात आले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एन.डी.ए.) टिपणीस हे चीफ इन्स्ट्रक्टर (एअर) आणि बटालियन कमांडर होते. १९८३मध्ये ग्रुप कॅप्टन असताना मिराज-२००० प्रकल्पाचे गटप्रमुख म्हणून त्यांची नेमणूक फ्रान्समध्ये झाली. मिराज-२००० विमाने भारतात आणण्यात त्यांचा सर्वांगीण सहभाग व पुढाकार होता.

तीन वर्षांनी भारतात परतल्यावर त्यांची 'एअर कमोडोर' म्हणून बढती झाली व ते मिराज-२००० विमानांची दोन स्क्वॉड्रन्स असणाऱ्या, ग्वाल्हेरच्या वायुसेना तळाचे 'एअर ऑफिसर कमांडिंग' झाले. १९८९ मध्ये त्यांनी दिल्लीच्या 'नॅशनल डिफेन्स कॉलेज'मधील प्रशिक्षण पूर्ण केले. एअर व्हाइस मार्शल म्हणून जून १९९२मध्ये टिपणीस यांना पदोन्नती मिळाली. वायुसेना मुख्यालयात, 'असिस्टंट चीफ ऑफ दि एअर स्टाफ' म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जम्मू आणि काश्मीर विभागाचे 'एअर ऑफिसर कमांडिंग' म्हणून त्यांनी जून १९९३ मध्ये पदभार स्वीकारला. प्रत्येक पदावर कार्यरत असताना त्यांनी कौशल्य व क्षमता यांचे मापदंड स्थापन केले. सप्टेंबर १९९४मध्ये पदोन्नती होऊन ते 'एअर मार्शल' झाले.

प्रथम वायुसेनेच्या पूर्व विभागाचे व फेब्रुवारी १९९५मध्ये ते पश्चिम विभागाचे 'सीनियर एअर स्टाफ ऑफिसर' झाले. ऑगस्ट १९९५ मध्ये ते वायुसेनेच्या अग्रिम व महत्त्वपूर्ण पश्चिम विभागाचे 'एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ' झाले. एप्रिल १९९७मध्ये ते वायुसेना उपाध्यक्ष व दि.३१ डिसेंबर १९९८ रोजी 'एअर चीफ मार्शल' झाले.

वायुसेनाध्यक्ष असतानाही ते सर्वत्र सतत स्वतः उड्डाण करीत. १९९९च्या कारगिल युद्धात त्यांनी मिग-२७ व मिराज २००० विमानांमध्ये स्वतः उड्डाणे करून गौरवशाली इतिहास रचला. पदावर असलेल्या वायुसेनाध्यक्षाने, स्वतः प्रत्यक्ष हवाई युद्धात उतरून, वैमानिक म्हणून सक्रिय होऊन भाग घेतला. टिपणीस यांच्या नेतृत्वाखाली मिराज २००० च्या वैमानिकांनी शत्रूची दाणादाण उडवून दिली. शत्रूची सर्वांत मोठी 'मंथो ढालो' येथील छावणी अगदी जमीनदोस्त करून टाकली. शत्रूचे रसदीचे सर्व मार्ग नष्ट केले. येथूनच कारगिल युद्धाला, आपल्या दृष्टीने निर्णायक वळण लागले व पाकिस्तानच्या पराभवची निश्चिती झाली. अनिल टिपणीस यांनी उत्तम व उत्कृष्ट नेतृत्व केले. तसेच त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाचा गौरव म्हणून त्यांना 'वायुसेना पदक', 'अतिविशिष्ट सेवा पदक' व 'परमविशिष्ट सेवा पदक' हे सन्मान प्राप्त झाले. ते राष्ट्रपतींचे मानद एडीसीही होते. ते एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुविख्यात रक्षा विशेषज्ञ आहेत.

नागपूर येथे २०२० साली झालेल्या १८व्या समाजोन्नती परिषदेचे ते अध्यक्ष होते.

लेखक : विंग कमांडर (निवृत्त) अशोक मोटे

लेख स्रोत : चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचा इतिहास या प्र. ल. मोकाशी लिखित आणि ज्ञातीच्या इतिहासाचे अभ्यासक संजीव सुळे यांनी संपादित केलेल्या ग्रंथातून साभार

#चांद्रसेनीय_कायस्थ_प्रभु #सीकेपी

“चांद्रसेनीय कायस्थ प्रभु मंडळ, विलेपार्ले" यांनी ज्येष्ठ रंगकर्मी स्व. विजया मेहता यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘स...
26/07/2026

“चांद्रसेनीय कायस्थ प्रभु मंडळ, विलेपार्ले" यांनी ज्येष्ठ रंगकर्मी स्व. विजया मेहता यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘स्मरण सभा’ आयोजित केली आहे. तरी, आपल्या 'चांद्रसेनीय कायस्थ प्रभु : इतिहास आणि जीवनशैली' पेजवरील मुंबईतील वाचकांनी या स्मरण सभेला उपस्थित रहावे ही विनंती.

सहभाग:- अंबरीश मिश्र, अजित भुरे, वंदना गुप्ते, स्वाती चिटणीस, प्रतिमा कुलकर्णी

🗓️ गुरुवार ३० जुलै, २०२६
⏰ सायंकाळी ६ः०० वाजता
📍चां.का.प्रभु मंडळ हॅाल, तेजपाल स्कीम रोड नं. ४, विलेपार्ले (पूर्व), मुंबई

प्रवेश सर्वांना विनामूल्य आहे.

#विजयामेहता #चांद्रसेनीय_कायस्थ_प्रभु #सीकेपी

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचा अभिमान आणि 'भारताचे एडिसन' हे बिरुद सन्मानाने प्राप्त करणारे गृहस्थ म्हणजे शंकर आबाजी भ...
21/07/2026

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचा अभिमान आणि 'भारताचे एडिसन' हे बिरुद सन्मानाने प्राप्त करणारे गृहस्थ म्हणजे शंकर आबाजी भिसे. आपल्या ज्ञातीसूर्याकडे १९ व्या शतकातले भारताचे महत्त्वाचे संशोधक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर दृष्टीक्षेप टाकणारा हा लेख जरुर वाचा.
---------------------------

शंकर आबाजी भिसे : आपल्या बुद्धिमत्तेने ब्रिटिशांवर गारूड घालणारा मराठी माणूस

(लेख, फोटो सौजन्य - बीबीसी मराठी आणि लेखक - या लेखाचे लेखक दिन्यार पटेल हे युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिनामध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत.)

शंकर आबाजी भिसे. त्यांना 'भारताचे एडिसन' म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्या शोधामुळे जगभरातल्या प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये मोठी क्रांती घडेल, यावर आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांचा विश्वास होता. भारतातल्या महत्त्वाच्या नेत्यांना आणि व्यक्तींना त्यांचं कौतुक होतं आणि पाठिंबाही होता. 19 व्या शतकामधले ते एक अग्रणीचे भारतीय संशोधक होते. पण असं असूनही शंकर आबाजी भिसेंचा सगळ्यांना विसर पडला.

असं का झालं?
भारत हे आता जरी संशोधनाचं आणि वैज्ञानिक घडामोडींचं केंद्र असला तरी त्या काळामध्ये वैज्ञानिक, संशोधक आणि इंजिनियर्सना प्रोत्साहन देणाऱ्या फारशा संस्था अस्तित्वात नव्हता. पुढच्या काळात भिसे कठीण परिस्थितीवर मात करत स्वतःच्या प्रयत्नांनी नावारूपाला आले. मुंबईत शंकर भिसेंचं बालपण गेलं. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या स्टॉल्सवरची 'सायंटिफिक अमेरिकन' मासिकं चाळण्यात त्यांचा दिवस जाई.

"त्या अमेरिकन मासिकामधून मिळालेल्या यंत्रांसंबंधीच्या ज्ञानामुळेच आज मी इथे आहे," असं अनेक दशकांनंतर ब्रुकलिनमधल्या एका वर्तमानपत्राशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं.

त्यांनी मुंबईमध्ये एका वैज्ञानिक क्लबची सुरुवात केली आणि विशीत असतानाच त्यांनी विविध उपकरणं आणि यंत्रांची डिझाईन्स रेखाटायला सुरुवात केली होती. सीलसोबत छेडछाड न करता येणाऱ्या (Tamper Proof) बाटल्या, इलेक्ट्रिकल सायकलसारखं वाहन आणि मुंबईच्या उपनगरी रेल्वे स्टेशन्सवरील इंडिकेटरचं डिझाईन त्यांनी केलं होतं. पण त्यांना खरी संधी मिळाली 1890 च्या दशकात. संशोधकांसाठीच्या एका ब्रिटीश जर्नलतर्फे वाणसामानाचं वजन मोजण्यासाठीच्या यंत्राची रचना करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

लंडनला स्थलांतर
उत्सहाच्या भरात एक दिवस पहाटे तीन ते सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान त्यांनी अशाच एका यंत्राचं डिझाईन रेखाटलं आणि सर्व ब्रिटीश प्रतिस्पर्ध्यांवर मात करत जिंकलेही. तो पर्यंत या हुशार भारतीय संशोधकाची दखल तत्कालिन बॉम्बेच्या प्रशासकांनीही घेतली होती. भिसेंना लंडनमध्ये स्थायिक होत गुंतवणूकदार मिळवायचे होते. प्रशासकांनी त्यांना पाठिंबा दिला. "यश मिळत नाही किंवा जोपर्यंत शेवटचा पाऊंड खर्च होत नाही, तोपर्यंत घरी परत येणार नाही, " असा निर्धार त्यांनी आपल्या मुंबईतल्या मित्रांकडे बोलून दाखवला होता. इथूनच सुरू झाला त्यांच्या कारकीर्दीतला महत्त्वाचा टप्पा.

इंडियन नॅशनल काँग्रेसचे बॉम्बेमधले सचिव दिनशॉ वाच्छा यांनी दिलेलं पत्रं घेऊन भिसे लंडनमध्ये दाखल झाले. वाच्छा हे भारतातल्या महत्त्वाच्या राजकीय पक्षाचे नेते तर होतेच पण सोबतच एक धूर्त व्यापारीही होते. त्यांची नजर तांत्रिक कौशल्य हेरणारी होती. असेच एक दिवस भिसे वाच्छांनी पाठवलेलं पत्र दादाभाई नवरोजींना देण्यासाठी पोहोचले. दादाभाई राष्ट्रवादी नेते तर होतेच पण त्यासोबतच लंडनमध्ये त्यांनी दीर्घ व्यावसायिक कारकीर्दही घडवली होती.

भिसेंच्या नावावर असलेलं आंतरराष्ट्रीय पेटंट्स पाहून प्रभावित झालेल्या दादाभाई नवरोजींनी भिसेंसोबत व्यापारी संबंध प्रस्थापित कऱण्याची तयारी दाखवली. करार केल्यानंतर त्यांनी भिसेंना भारतासाठीचा राष्ट्रवादी अजेंडा जाणून घेण्यासाठीच्या वाचनाची यादी दिली. उत्तर लंडनमधल्या एका कुबट, थंड कार्यशाळेतून भिसेंनी काम करायला सुरुवात केली.

संशोधनांची मालिका
भिसेंनी एका अनोख्या इलेक्ट्रॉनिक साईनबोर्डचा शोध लावला. लंडनच्या क्रिस्टल पॅलेसमध्ये हा बोर्ड पाहण्यासाठी ठेवण्यात आला होता. नंतर मध्य लंडन, वेल्स आणि कदाचित पॅरिसमधल्या अनेक दुकानांनी असे बोर्ड लावले. किचनमधली उपकरणं, टेलिफोन, डोकेदुखी नाहीशी करणारं उपकरणं आणि आपोआप फ्लश होणारं टॉयलेट अशा आपण लावलेल्या अनेक शोधांची यादीच त्यांनी नवरोजींना सांगितली.

भिसोटाईपचा शोध
पण भिसेंनी लावलेला सर्वात महत्त्वाचा शोध होता प्रिटींगच्या क्षेत्रातला. त्यांनी याला नाव दिलं - भिसोटाईप (Bhisotype). या टाईपकास्टरमुळे प्रिटींग क्षेत्रात क्रांती घडणार होती. पुस्तकं आणि वर्तमानपत्रं छापण्यासाठी वापरण्यात येणारे टाईप या यंत्राच्या मदतीने वेगाने आणि स्वस्तात तयार करता येत होते. आणि इंडस्ट्रीमध्ये त्यावेळी असणाऱ्या आघाडीच्या अशा उपकरणांपेक्षा या भिसोटाईपचा वेग आणि क्षमता जास्त होती. यानंतर आता अधिक श्रीमंत गुंतवणूकदारांचा भिसेंनी शोध घ्यावा असं नवरोजींनी सुचवलं आणि त्यांना त्यांचा मित्र हेन्री हिंडमन यांच्याकडे पाठवलं. त्यांना 'फादर ऑफ ब्रिटीश सोशलिझम' म्हटलं जाई.

हिंडमन हे कार्ल मार्क्सचे शिष्य होते आणि आणि ब्रिटीशांनी भारतावर राज्य करण्याला विरोध करणाऱ्यांपैकी होते. लंडनच्या 'नफेखोर उच्चभ्रूंवर' ते टीका करत. पण गंमतीची गोष्ट अशी की भांडवलाशाहीच्या विरोधात असणारे हिंडमन स्वतः एक आघाडीचे उद्योगपती होते आणि त्यांची प्रिंटींग क्षेत्रात चांगली ओळख होती. भिसोटाईपसाठी तब्बल 15,000 पाऊंड उभे करण्याचं त्यांनी वचन दिलं. इथेच सगळ्या गोष्टी बिनसायला लागल्या. लिनोटाईप या प्रिंटींग क्षेत्रातल्या मोठ्या कंपनीची भिसोटाईप विकत घेण्याची ऑफर भिसेंनी नाकारली. हिंडमन यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवत त्यांनी या मशीनमध्ये सुधारणा करण्यात भरपूर वेळ घालवला. पण हा निधी उभा करणं शक्य नसल्याचं 1907पर्यंत हिंडमन यांच्या लक्षात आलं. पुढच्या वर्षीपर्यंत नवरोजींकडील निधीही संपला. अपेक्षाभंग झालेल्या भिसेंनी डिसेंबर 1908 मध्ये काम थांबवलं आणि बोटीने मुंबईला परत आले. तोपर्यंत त्यांनी शब्दशः 'शेवटचा पाऊंड' खर्च केलेला होता. पण इथेच त्यांना दुसरी संधी मिळाली. मुंबईला जाणाऱ्या त्यांच्या बोटीमध्ये काँग्रेसचे नेते गोपाळ कृष्ण गोखलेही होते. भिसेंनी आपल्या टाईपकास्टर बाबत गोखलेंना सांगितल्यावर ते प्रभावित झाले. मुंबईत आल्यावर गोखलेंने टाटा समूहाशी संपर्क साधला आणि त्यांच्यासोबत नवीन आणि मोठा व्यावसायिक करार करून दिला.

टाटांसोबतचा हा करार 1917मध्ये संपुष्टात आला पण यामुळे भिसेंना अमेरिकेमध्ये नवी कारकीर्द सुरू करायला मदत झाली. न्यूयॉर्कमध्ये भिसोटाईपचं मार्केटिंग करण्यात त्यांना यश आलं नाही. पण त्यांनी शोधलेल्या आयोडिन सोल्यूशनमुळे (द्राव) भिसे श्रीमंत झाले. खरंतर आरोग्याच्या दृष्टीने हा द्राव इतका प्रभावी नव्हता. पण एडगर केयस या अमेरिकन रहस्यवादी व्यक्तीने याचं खुलेपणाने समर्थन केलं. केयसचे समर्थक आजही हे सोल्यूशन वापरतात आणि त्याचा प्रचारही करतात. अखेरच्या वर्षांमध्ये भिसेंचा गूढतत्वाकडे ओढा वाढला. 'स्पिरीट टाईपरायटर' (आत्म्याचं कथन टाईप करणारा टाईपरायटर) हा त्यांनी लावलेल्या अखेरच्या शोधांपैकी एक होता. ही Ouijia board. ची सुधारित आवृत्ती होती. भिसोटाईपला आलेलं अपयश आणि त्यानंर या टाईपरायटरचं अपयश यामुळे या भारतीय एडिसन कारकीर्द गूढपणेच संपुष्टात आली. कदाचित म्हणूनच भिसेही आता विस्मरणात गेले आहेत.

पण तरीही त्यांच्या कारकीर्दीतली एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे. भिसेंच्या सुरुवातीच्या काळातल्या त्यांच्या गुंतवणूकदारांनी दिलेला ब्रिटीशविरोधी कानमंत्र भिसेंनी मरेपर्यंत लक्षात ठेवला. लंडनमध्ये ते नवरोजी आणि हिंडमन यांच्यासोबतत निदर्शनांमध्ये आणि बैठकींमध्ये सहभागी झाले. न्यूयॉर्कमध्ये त्यांनी गांधीजींच्या विचारांचा प्रचार केला आणि भारतीयांना स्वतःकडे ते ठेवून घेत. भारतातून ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये जाताना भिसेंनी प्रगत राजकारण आणि विज्ञानाचा मेळ घातला. अशा माणसाचं महत्त्व सांगण्यासाठी खरंतर कोणत्याही 'स्पिरीट टाईपरायटरची'ही गरज नाही.

(लेख, फोटो सौजन्य - बीबीसी मराठी आणि लेखक - या लेखाचे लेखक दिन्यार पटेल हे युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिनामध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत.)

#शंकरभिसे #चांद्रसेनीय_कायस्थ_प्रभु #सीकेपी

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातीची संगीतमय ओळख, बॉलिवूडचा सुवर्णकाळ अनुभवलेले सुप्रसिद्ध म्युझिक अरेंजर स्व. अनिल मोहिले ...
17/07/2026

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातीची संगीतमय ओळख, बॉलिवूडचा सुवर्णकाळ अनुभवलेले सुप्रसिद्ध म्युझिक अरेंजर स्व. अनिल मोहिले यांच्या कारकिर्दीवर कटाक्ष टाकणारा एका सुंदर लेख आपणा सर्वांसाठी देत आहे. या जुलै महिन्यात ८ तारखेला त्यांची जयंती पार पडली. यानिमित्ताने लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख सादर करत आहोत...

लेख व फोटो सौजन्य - लोकसत्ता वृत्तपत्र
लेखन - राहुल रानडे - [email protected]

फोटो ओळ - पहिल्या छायाचित्रात सी. रामचंद्र, लतादीदी, अनिल मोहिले आणि रामी अय्यर, दुसऱ्या छायाचित्रात अनिल-अरुण चाल तयार करताना आणि तिसऱ्या छायाचित्रात स्वतः अनिल मोहिले.

-----------------

लता दीदींचे लाडके 'अनिल मोहिले'

सचिन देव बर्मन ‘शर्मिली’ या चित्रपटाचं पार्श्वसंगीत ध्वनिमुद्रित करायच्या तयारीत होते. पण एरवी त्यांची म्युझिक अ‍ॅरेंजमेंट करणारे बासू चक्रवर्ती आणि मनोहारी सिंग हे दोघे मद्रासला आर. डी. बर्मनबरोबर दुसऱ्या रेकॉर्डिगमध्ये अडकून पडले होते. एस. डी. दादा त्यांच्या फटकळ स्वभावाकरिता प्रसिद्ध! बरीच वाट पाहून त्यांनी दुसरा पर्याय शोधायला सुरुवात केली. लतादीदींनी बर्मनदांना अनिल-अरुण या जोडीचं नाव सुचवलं. या मराठी जोडगोळीने हिंदीत अचानक मिळालेल्या या पहिल्याच संधीचं सोनं केलं. ‘शर्मिली’नंतर मोठय़ा बर्मनदांनी ‘सगीना महातो’, ‘जुगनू’, ‘प्रेमनगर’, ‘अभिमान’, ‘चुपके चुपके’ या चित्रपटांच्या अ‍ॅरेंजमेंटची जबाबदारीही अनिल-अरुण या द्वयीवर सोपवली.

कल्याणजी-आनंदजी यांच्याकडेही अशीच काहीशी अडचण निर्माण झाली आणि त्यांचं अ‍ॅरेंजमेंटचं कामही आयत्या वेळी अनिल-अरुण यांना मिळालं. पुढे अनिल-अरुण या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत संयोजक म्हणून भरपूर काम केलं आणि नावही कमावलं.

अगदी लहान वयातच लता मंगेशकरांचा आशीर्वाद घेऊन अनिल मोहिले संगीत क्षेत्रातल्या सफरीवर निघाले होते. (अगदी मोजक्याच लोकांच्या नशिबी हे भाग्य आलं आहे बरं!) भाईंची ही सफर सिंदबादच्या सफरीहून अधिक चित्तथरारक आणि अधिक रोमांचक होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही! या सफरीत भाईंना अरुण पौडवाल यांच्यासारखा सख्खा साथीदार भेटला. सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन, श्रीनिवास खळेंसारखी गुरुतुल्य माणसं भेटली. मनापासून प्रेम करणारे अनेक गायक-वादक भेटले. आणि दीदीरूपी दीपस्तंभ होताच कायम मार्ग दाखवायला. भाई व्हायोलिनवादक म्हणून हिंदी फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत झाले, तेही दीदींमुळेच.

थोडंसं मागे वळून पाहू या. साल १९७०. दहा वर्ष व्हायोलिनवादक म्हणून इमानेइतबारे केलेली आकाशवाणीची सरकारी नोकरी सोडून चंदेरी दुनियेच्या मायानगरीत प्रवेश करावा की नाही, या द्विधा मन:स्थितीत भाई होते. दोनाचे चार हात होण्याची घटिकाही समीप आली होती. त्यामुळे भाई अधिकच भ्रमात पडले. त्यांनी घाबरत घाबरत लतादीदींच्या कानावर ही गोष्ट घातली. दीदींनी मोहिलेंना घरी बोलावून घेतलं आणि काही लोकांना फोन केले. ‘अनिल अच्छा लडका है, व्हायोलिन अच्छा बजा लेता है. वो आकाशवाणी की नौकरी छोडम् रहा है, कभी भी रेकॉर्डिग के लिए मिल सकता हैं..’ असे फोन आर. डी. बर्मन आणि कल्याणजी-आनंदजी यांसारख्या तेव्हाच्या टॉपच्या संगीतकारांना गेले. स्वरसम्राज्ञीशी पंगा घेणं म्हणजे करिअरला अलविदा करणं, असं समीकरणच होतं त्याकाळी! त्यामुळे ‘मिल सकता है’ म्हणजे ‘याला बोलावत जा’ अशी आज्ञाच आहे, हे सुज्ञ संगीतकार समजून घेत! दीदींचा शब्द शिरसावंद्य मानून या ‘लडक्या’ला अनेकांनी व्हायोलिन वाजवायला बोलावलं. अर्थात अनिल मोहिले अत्यंत प्रतिभावान आणि मेहनती असल्यामुळे त्यांनी दीदींनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला.

‘शर्मिली’नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत वाद्यवृंद संयोजकाच्या भूमिकेत या व्हायोलिन वाजवणाऱ्या ‘लडक्या’ची कारकीर्द भरास येऊ लागली. कामाचा ओघ वाढू लागला. एका वर्षांतच अनिल मोहिले बिझी अ‍ॅरेंजर झाले. १९७१ साली कलकत्त्याचा तरुण, हरहुन्नरी बंगाली संगीतकार बप्पी लाहिरी मुंबईच्या चित्रसृष्टीत आपलं नशीब आजमावायला येऊन दाखल झाला. खारला एका छोटय़ाशा खोलीत वास्तव्य करणाऱ्या या तरुण संगीतकाराला काम तर मिळालं; पण त्याच्या पदार्पणाच्या चित्रपटासाठी (‘नन्हा शिकारी’) अ‍ॅरेंजर मिळेना. सगळेच नामांकित अ‍ॅरेंजर्स व्यस्त होते. बप्पीदा होतकरूकलाकार फिरतात तसे विविध रेकॉर्डिग स्टुडिओत जाऊन अ‍ॅरेंजर्सना भेटू लागले. भाई तेव्हा ‘प्रेमनगर’ चित्रपटाच्या पाश्र्वसंगीताचं रेकॉर्डिग बांद्र य़ाच्या मेहबूब स्टुडिओत करत होते. तिथे जाऊन बप्पीदा त्यांना भेटले आणि आपल्या चित्रपटाची अ‍ॅरेंजमेंट करण्याची विनंती केली. पण भाई एस. डी. बर्मन आणि कल्याणजी-आनंदजी यांचं काम करण्यात कमालीचे व्यस्त असल्यामुळे त्यांनी या बंगाली बाबूला नम्र नकार दिला.

बप्पीदा हिरमुसले आणि त्यांनी सरळ धाव घेतली ती अख्ख्या संगीतसृष्टीवर राज्य करणाऱ्या लतादीदींकडे. दीदींनी मोहिलेंना स्टुडिओतच फोन केला आणि बप्पीला नकार दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मग काय? साक्षात् वरून फर्मान निघाल्यावर भाईंना बप्पीदांचं काम करावंच लागलं. (इतक्या सुकुमार, कोमल आवाजाची, तरीही एवढी दहशत असलेली लतादीदी ही जगातील एकमेव व्यक्ती असावी!) पुढे बप्पी लाहिरी आणि अनिल-अरुण या त्रिकुटानं ‘चलते चलते’, ‘हिम्मतवाला’, ‘शराबी’, ‘नमकहलाल’ यांसारख्या हिट चित्रपटांमधून अनेक सुपरहिट गाणी दिली.

निष्णात व्हायोलिनवादकअनिल मोहिले आणि कसलेले अ‍ॅकॉर्डियनवादक अरुण पौडवाल यांची सांगीतिक मनं एवढी जुळली होती, की हृदयनाथ मंगेशकरांच्या सूचनेनुसार अ‍ॅरेंजमेंटबरोबरच या दोघांनी एकत्र संगीत दिग्दर्शनही करायचं ठरवलं. या जोडीच्या नावावरचं पहिलं गाणं कवी शांताराम नांदगावकर यांचं, उषा मंगेशकर यांनी गायलेलं- ‘धुंदित गंधित होऊनी सजणा’ आजही लोकप्रिय आहे. अनिल-अरुण हे सुपरहिट अ‍ॅरेंजर्स तर होतेच, पण या जोडीने संगीत दिग्दर्शक म्हणूनही अप्रतिम गाणी दिली.

‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा’, ‘रूपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’, ‘शोधू मी कुठे कशी प्रिया तुला’ अशी अनेक श्रवणीय गाणी या जोडीने रचली. संगीतकार म्हणून अनिल-अरुण यांच्या नावावर जवळपास ८० चित्रपट आहेत. दोघांनाही अ‍ॅरेंजमेंटचा अफलातून सेन्स असल्यामुळे त्यांनी स्वत: संगीतबद्ध केलेल्या गाण्यांची अ‍ॅरेंजमेंटही कल्पक असायची. त्यांच्या बऱ्याच गाण्यांमध्ये सॅक्सोफोनचा वापर मोठय़ा खुबीनं केल्याचं दिसून येतं. तज्ज्ञ अ‍ॅरेंजरनी लिहून काढलेला पीस वाजवणारा वादकपण तज्ज्ञच हवा. इथे मला मुद्दाम अशा एका वादकाचा उल्लेख करावा लागेल, ज्यांनी सॅक्सोफोनवादक म्हणून अनेक वर्षे अनिल-अरुण यांच्याबरोबर काम केलं.. सुरेश यादव.

सुरेश यादव यांची आणि माझी भेट मी दिग्दर्शित केलेल्या झी मराठी सारेगमपच्या ‘सूर नव्या युगाचा’ या सत्रात झाली. ग्रँड फिनालेला पाहुणे वादक म्हणून सुरेशजींना आम्ही आमंत्रित केलं होतं. वयाच्या ६८ व्या वर्षीदेखील सुरेशजींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. आणि सॅक्सचा टोन तरुणांना लाजवेल असा! अनिल-अरुण या जोडीची साथ सुरेशजींनी अगदी ‘धुंदित गंधित’पासून दिली. त्यांच्या बहुतांश गाण्यांमध्ये सुरेशजींनीच सॅक्स वाजवला आहे. सुरेशजी भाईंना ‘कॉम्प्युटर’ म्हणत. कारण कुठलंही सुराचं वाद्य (पेटी, पियानो, व्हायोलिन) न घेता हा माणूस स्टुडिओच्या एका कोपऱ्यात बसून बॅकग्राऊंड स्कोअरचं नोटेशन लिहीत असायचा. असं नोटेशन लिहिणं म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून कॅनव्हासवर हुबेहूब शिवाजी महाराजांचं चित्र काढण्याइतकंच अवघड आहे!

मी भाईंना एकदा हळूच विचारलं होतं- ‘माझ्यासाठी गाणं अ‍ॅरेंज कराल?’ ते नेहमीसारखं गडगडाटी हसले आणि म्हणाले, ‘ऑफ कोर्स. करेन ना. नक्की करेन. तुझं काम मला आवडतं. वेगळं काहीतरी करत असतोस.’ मी सुखावलो आणि अनिल मोहिलेंनी अ‍ॅरेंज करण्यायोग्य गाणं माझ्याकडे यायची वाट बघू लागलो. एक दिवस ‘तू बुद्धी दे’ हे ‘प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटातलं गाणं नानांनी माझ्या ओंजळीत टाकलं! मी मनात म्हटलं- हेच ते भाईंचं गाणं! पण तोपर्यंत विश्वनियंत्याने आपल्या मेगा प्रॉडक्शनचं म्युझिक करण्यासाठी भाईंच्या पुढच्या सगळ्या डेट्स ब्लॉक करून ठेवल्या होत्या! आता ही जबाबदारी कोणावर द्यावी? माझ्या डोळ्यांसमोर एकच नाव आलं. खळेकाका आणि मोहिलेंचाच शिष्य असलेल्या कमलेश भडकमकरचं! मला अनेक लोक म्हणतात, ‘‘तू बुद्धी दे’ ऐकताना ‘गगन सदन’ची आठवण होते.’ साहजिक आहे.

दोन्ही स्त्रीच्या आवाजातल्या, सोपे शब्द असलेल्या प्रार्थना आहेत. एक गाणं अनिल मोहिलेंनी अ‍ॅरेंज केलंय आणि दुसरं त्यांच्या शिष्याने. लाइव्ह व्हायोलिन्ससाठी भाई लिहायचे तसा सुंदर स्कोअर लिहिण्याची कुवत आमच्या पिढीतल्या कमलेशकडे आहे असं मी मानतो. हे गाणं बनवत असताना भाईंचा प्रेमळ हात माझ्या डोक्यावर नक्कीच असला पाहिजे. संगीतातल्या या महान, प्रतिभावान, सज्जन ‘भाई’ला माझा साष्टांग दंडवत.

लेख व फोटो सौजन्य - लोकसत्ता वृत्तपत्र
लेखन - राहुल रानडे – [email protected]

#चांद्रसेनीय_कायस्थ_प्रभु #सीकेपी

ॐ नमोस्तुते ध्वजाय !लेखन आणि ध्वज फोटो सौजन : संजीव सुळे, ज्ञाती इतिहास अभ्यासक, पुणे मानवी इतिहासात "ध्वज" ह्या संकल्पन...
15/07/2026

ॐ नमोस्तुते ध्वजाय !

लेखन आणि ध्वज फोटो सौजन : संजीव सुळे, ज्ञाती इतिहास अभ्यासक, पुणे

मानवी इतिहासात "ध्वज" ह्या संकल्पनेचा उगम नेमका कधी झाला ह्याबद्दल माहिती उपलब्ध नसली तरी प्राचीन काळापासून अस्मितेचे आणि अस्तित्वाचे प्रतीक म्हणून ध्वजाचा वापर होत आला आहे. त्या त्या राजवटीची किंवा समुदायाची वैशिष्ठ्ये अंकित असलेल्या ध्वजाला सर्वोच्च प्रतिष्ठेचे स्थान दिले जाते. साहजिकच ह्या ध्वजासंबंधी काही एक संहिता निश्चित केलेली असते. तो एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे. ज्या ज्या संस्था, समाज किंवा राष्ट्रांचे असे स्वतंत्र ध्वज आहेत त्यांच्यासाठी तो एक सर्वोच्च मानबिंदू असतो.

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचा इतिहास अभ्यासताना हैहय वंश, कायस्थ शब्दाची व्युत्पत्ती, हिंगलाज माता मंदिर, क्षीरभवानी मंदिर, कल्हणप्रभु, चित्रगुप्त कायस्थ, कार्तवीर्य सहस्त्रार्जुन, नागवंशाशी असलेली सोयरीक, श्रीनगर, अयोध्या, ताल भोपाळ, उज्जैन, मांडवगड ते महाराष्ट्र असा झालेला प्रवास ह्या सगळ्यांचा आढावा घेताना लक्षात आलं की कायस्थ समाजाचा संपूर्ण इतिहास दुर्दैवाने आज उपलब्ध नाही. अनेक अर्धवट दुवे एकमेकांना जोडत जोडत पुढे जावे लागते. मात्र असे असले तरी जेवढा म्हणून पौराणिक व लिखित इतिहास ज्ञात आहे त्यावरून कायस्थ समाजाची दैदीप्यमान परंपरा नक्कीच लक्षात येते.

आणि काहीशा वैचारिक गोंधळात अडकलेल्या वर्तमानाकडून उज्वल भवितव्याकडे जर आम्हाला वाटचाल करायची असेल तर आपल्या ह्या जाज्वल्य इतिहासाला सतत डोळ्यासमोर ठेवायला हवं ! ह्याच विचारातून आपल्या ज्ञातीच्या ध्वजाची संकल्पना पुढे आली. भगव्या ध्वजाकडे बघितल्यावर सनातन धर्माचा अभिमान जागृत होतो, राष्ट्रध्वजाकडे बघितल्यावर देशाविषयी राष्ट्रभावना जागृत होतात, तद्वत, ज्ञातीच्या ध्वजाकडे बघितल्यावर तो कायस्थ बाणा जागृत व्हावा यासाठीच ज्ञातीध्वज आवश्यक आहे ! आजवर चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाच्या विविध ज्ञातीसंस्थांची स्वतःची स्वतंत्र "बोधचिन्हे" असली तरी संपूर्ण ज्ञातीचा एकच एक असा ध्वज माझ्या माहितीप्रमाणे कुठेही नाही. आणि म्हणूनच मी ह्या संकल्पनेवर अभ्यास करायला सुरुवात केली.

ध्वज म्हणजे जर संपूर्ण ज्ञातीचे मानचिन्ह असायला हवे असेल तर त्यात केवळ सन १३०५ नंतरचाच, म्हणजे मांडवगड येथून महाराष्ट्रात आल्यानंतरचाच इतिहास विचारात घेऊन चालणार नव्हते, तर वर उल्लेख केलेला ज्ञाती इतिहासाचा संपूर्ण प्रवास समजून घेणे आवश्यक होते. त्यादृष्टीने विचार करताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या, त्या अशा :
ज्ञाती अभ्यासकांपैकी अनेक जण परशुराम - चंद्रसेन कथा नाकारतात. त्या ऐवजी आजच्या चिनाब नदीच्या खोऱ्यातील चंद्रा नदीच्या काठावरील म्हणून चांद्रश्रेणीय अशीच व्युत्पत्ती मांडतात. प्रबोधनकारही हाच विचार मांडतात. मात्र तरीही, प्रचलित परशुराम कथा जरी मान्य केली तरी प्रत्यक्ष परशुरामाला जेरीस आणणाऱ्या कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाचे क्षात्रतेज अभिमानास्पद वाटते. ह्याच सहस्त्रार्जुनाचा पुत्र चंद्रसेन, त्याचा पुत्र सोमराज ह्यांची ही प्रजा आज सहस्त्रार्जुनाचा पराक्रम विसरते आहे.

मध्यप्रदेश येथील महेश्वर येथे ह्या महापराक्रमी सहस्त्रार्जुनाचे मंदिर आहे. मूर्तीसोबतच तेथे एक अखंड ज्वाला पूजली जाते, जी त्या प्रखर क्षात्रतेजाचे स्मरण करून देते. ह्याच ज्वालेला आपल्या ज्ञातीध्वजावर केंद्रस्थानी ठेवले आहे.
असीजीवी - मसीजीवी असलेला कायस्थ समाज मूलतः शक्तीपूजक आहे. शक्तीसाठी आवश्यक ऊर्जेचा उद्गाता सूर्याची उपासना प्रथमपासूनच प्रचलित आहे. महाराष्ट्रात स्थिर होईपर्यंत "कुलदेवता" पद्धत आपल्यात नव्हती. एका अर्थी सूर्य हीच आपली आद्य कुलदेवता असल्याने ध्वजावर सूर्यदेवतेला स्थान दिलेले आहे. आजही अनेक कायस्थांची कुलदेवता म्हणून सूर्याचीच उपासना केली जाते.
शौर्यगुणाच्या जोरावर कधीकाळी संपूर्ण भारतावर साम्राज्य करणाऱ्या कायस्थ हातातील तलवार ध्वजावर येणं अनिवार्य आहे. मात्र ध्वजावर असलेली तलवार ही शिवकालीन वक्र तलवार नसून परमार कालीन सरळ तलवार आहे. तलवारीसोबतच जे महत्त्वाचे शस्त्र वापरण्यासाठी कायस्थ प्रसिद्ध होते ते म्हणजे लेखणी ! चित्रगुप्तांपासून ते बाळाजी आवजींपर्यंत गाजलेली लेखणी म्हणजे तर कायस्थांची महत्वाची ओळख. चित्रांश कायस्थ आजही यमद्वितीयेला कलम-दवात पूजन न चुकता करतात. ही दौत आणि लेखणी ध्वजावर नसती तरच नवल.
कायस्थ समाजाने एकूण १४ ग्रामण्ये सोसली ती त्यांना असलेल्या वेदोक्ताच्या अधिकारासाठीच. ही वेदोक्ताची पार्श्वभूमी स्पष्ट करणारा केशरी रंगच मी ध्वजासाठी वापरलेला आहे.

ध्वजाचा आकार हा धर्मध्वजाप्रमाणेच घेतला त्यालाही तसेच कारण आहे. कोणतीही संस्था असो वा राष्ट्र असो, उद्दिष्टांच्या अथवा भौगोलिक सीमांनी बद्ध असल्यामुळे त्यांचा ध्वजही ठराविक सीमांनी (त्रिकोण, चौकोन, आयत, इ.) बद्ध असाच असतो. परंतु सनातन धर्म असो वा कायस्थांची प्रज्ञा, ह्यांना सीमा नाहीत. पंचमहाभूतांच्या प्रांतात विहार करणारी ही पंचकोनी ध्वजा होय !
ज्ञातीध्वज रेखांकित करताना असा सर्वांगीण अभ्यास करूनच तो आपल्यासमोर मी जरी आणला असला तरी अल्पावधीतच त्यावर लोकमान्यतेची मोहोर उमटवणारा माझा चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाज हाच मुख्यतः अभिनंदनास पात्र आहे. हजारो वर्षांची उज्वल परंपरा असलेल्या आपल्या ज्ञातीचा जसा कोणीही "सर्वाधिकारी" नाही, तसा ह्या ध्वजाचाही ! ह्या ध्वजावर सर्वस्वी अधिकार फक्त माझ्या ज्ञातीचा, माझ्या समाजबांधवांचा. मी केवळ निमित्तमात्र !

लेखन आणि ध्वज फोटो सौजन : संजीव सुळे, ज्ञाती इतिहास अभ्यासक, पुणे.

(हा लेख अत्यंत अभ्यासपूर्ण असून यातील लेखकाचा दृष्टीकोन ज्ञातीसाठी असला तरी तो वैयक्तिक आहे.)

#चांद्रसेनीय_कायस्थ_प्रभू #सीकेपी

Address

Thane
400 601, 400 602, 400 603, 400 604, 400 605, 400 606, 400 607, 400 615

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when चांद्रसेनीय कायस्थ प्रभु : इतिहास आणि जीवनशैली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share