11/06/2026
“पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हरिजनांना मोकळं व्हावं, म्हणून मी मरायला उभा राहिलो आहे. पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचं हृदय. महाराष्ट्राच्या जीवनाची किल्ली. पंढरपूरची कळ दाबली, तर महाराष्ट्रभर प्रकाश पडेल. या रूपानं महाराष्ट्रातील सर्व जीवनांतील अस्पृश्यता नष्ट व्हावी, दुष्ट रूढीची कुलपं गळून पडावीत. मी माझ्या प्राणांचं तेल घालण्यासाठी उभा आहे...” असे उद्गार काढून पंढरपूरच्या मंदिरात हरिजन प्रवेशसाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून लढले ते आपले प्रिय साने गुरुजी.
मंदिर प्रवेशाचा मुद्दा जनसामान्यांत पोहोचावा म्हणून महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्यातून गुरुजींनी दौरा केला. रोज ठिकठिकाणी पाच ते सहा जाहीर सभा होत. या सभांना प्रचंड गर्दी होई. हजारो स्त्री-पुरुष गुरुजींचे विचार ऐकत आणि त्यांना पाठिंबा देत. त्यांचा हा महाराष्ट्र दौरा चार महिने चालला. एकट्या पश्चिम महाराष्ट्रात गुरुजींनी तब्बल 400 सभा घेतल्या. त्यातून मंदिर प्रवेशाबद्दलची जोरदार जनजागृती झाली. साने गुरुजींच्या सोबत सेनापती बापट, क्रांतीसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी केवलानंद सहजानंद भारती, काकासाहेब बर्वे, आचार्य अत्रे या लोकनेत्यांच्या सहभागामुळं आणि संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, कुशाबा महाराज तनपुरे, दादा महाराज सातारकर आदी समाजधुरिणांसह सत्यशोधक सुधारक प्रबोधनाच्या चळवळीनं गुरुजींच्या आंदोलनाला पाठबळ दिलं.
मंदिर प्रवेशाबाबतच्या गुरुजींच्या प्रयत्नांना महाराष्ट्राच्या विविध भागांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हरिजन सेवक संघाच्या दस्तऐवजांनुसार, या सत्याग्रहादरम्यान 200 मंदिरं अस्पृश्यांसाठी खुली करण्यात आली. साने गुरुजींच्या दौऱ्याला प्रतिसाद म्हणून काही विहिरीदेखील खुल्या करण्यात आल्या. पंढरपूरमधील मंदिर खुलं व्हावं यासाठी हरिजन सेवक संघानं घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेवर 10 लाख लोकांनी सह्या केल्या. अखेर 1 मे 1947 रोजी साने गुरुजींनी पंढरपूरात प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली.
'त्यावरून कायदा होणारच आहे, मग उपोषण कशाला?' असाही प्रचार विरोधक करीत होते. गुरुजींना त्या वेळचे काँग्रेस श्रेष्ठीही तसा सल्ला देत होते. पण गुरुजींनी त्यांना नम्रपणे सांगितलं होतं, ‘असेंब्लीतल्या कायद्यापेक्षा मला हृदयाचा कायदा श्रेष्ठ वाटतो.’ 10 मे 1947 रोजी बडव्यांसोबत होणाऱ्या वाटघाटीला डोळ्यासमोर ठेवून गुरुजींनी आपलं 10 दिवसांचं उपोषण सोडलं.
मंदिर प्रवेशाच्या संघर्षाच्या दरम्यान ज्यांना हरिजनांचा मंदिर प्रवेश अमान्य होता, अशांनी विठ्ठलाचं तेज एका घागरीत कैद करून 'घागर विठोबा' प्रसिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रकार देखील केला होता! पुढं 30 ऑक्टोबरला कोर्टानं विरोधकांचे अर्ज फेटाळत मंदिर अस्पृश्यांना खुलं केलं. त्याच दिवशी पंढरपुरात जल्लोष साजरा करण्यात आला.
ज्या साने गुरुजींच्या अथक परिश्रमांच्या नंतर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले झाले, त्यांचा आज स्मृतिदिन. साने गुरुजींना विनम्र अभिवादन!