19/04/2026
भारताच्या आणि जगाच्या इतिहासातील एक महान वैचारिक क्रांती घडवणारे, लिंगायत आणि वचन चळवळीचे निर्माते महात्मा बसवण्णा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 850 वर्षांपूर्वी जगाला समता, मानवता, लोकशाही, स्त्री-पुरुष समानता आणि विवेकवादाची वाट बसवण्णांनी आपल्या वचनांतून आणि कार्यातून दाखवली.
लिंगायत समूहामार्फत बसवण्णांनी समाजातील सर्व घटकांतून लोकांना एकत्र आणले. ‘शरणांची, म्हणजे लिंगायत समुहात सामील झालेल्यांची, पूर्वीची जात नष्ट झाली. रोटी-बेटी व्यवहार सुरू झाला. माणसांमधील जातीच्या भिंती तुटल्या. जातीने लादलेले पारंपारिक व्यवसाय सोडून समाजाला उपयोगी असे सर्वांना आपल्या आवडीचे काम, म्हणजेच ‘कायक’ करण्याचे स्वातंत्र्य लिंगायत संप्रदायाने दिले. सर्व समाजोपयोगी कामांना समान दर्जा दिला, श्रमाचा विटाळ नष्ट केला, अस्पृष्यता नष्ट केली.
एका वचनात बसवण्णा म्हणतात -
"कूडलसंगा, ऐकावे जी, स्थावर सारे नाशवंत
जंगम तेचि शास्वत, हेचि सत्य"
संपत्ती ही ‘स्थावर’ म्हणजेच नाशवंत आहे. पण माणासांमधले विचार हे ‘जंगम’ म्हणजेच गतीशील आणि जीवंत आहेत. जोवर माणसे विचार पसरवत राहतील, विचारांप्रमाणे जगत राहतील, तोवर ते कधीच नष्ट होणार नाहीत. बसवण्णांचे हे पुरोगामी विचार घरोघरी पोहोचवूया आणि त्यांना आपल्या कृतीतून अभिवादन करूया.
#बसवण्णा #संतवाणी