16/04/2026
कोकणातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून रत्नागिरी जिल्ह्यातील सात समुद्रकिनाऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासनाने उर्वरित ४ कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला आहे. ‘कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम’ अंतर्गत हा निधी वितरित करण्यात आला असून किनारपट्टीवरील पर्यटन सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. या निर्णयामुळे कोकणच्या नैसर्गिक सौंदर्याला जागतिक स्तरावर पोहोचवण्यास मदत होणार असून पर्यटकांच्या मूलभूत गरजांवर विशेष भर देण्यात आला आहे.
रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांवर वाढत्या पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि आधुनिक सुविधांचा अभाव जाणवत होता. ही बाब लक्षात घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राज्य सरकारकडे विशेष निधीची मागणी केली होती. शासनाने त्यास सकारात्मक प्रतिसाद देत हा निधी मंजूर केला असून या माध्यमातून एकूण 13 ‘सेल्फ क्लीनिंग इलेक्ट्रॉनिक इको-टॉयलेट विथ बायो डायजेस्टर’ आणि ‘चेंजिंग रूम’ उभारण्यात येणार आहेत. या सुविधा पर्यावरणपूरक असून पाण्याची बचत, स्वच्छता आणि विशेषतः महिला पर्यटकांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
या निधीतून गणपतीपुळे, भाट्ये, वेळणेश्वर, लाडघर, मुरुड, गणेशगुळे आणि गावखडी या सात प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर सुविधा उभारल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी 5 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती, त्यापैकी 1 कोटी रुपये आधीच वितरित झाले असून उर्वरित 4 कोटी रुपये आता जिल्हा परिषदेला देण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे केवळ पर्यटनाचा दर्जा उंचावणार नाही, तर स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार असून कोकणच्या पर्यटन विकासात हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे