03/12/2024
रारंग ढांग : जीवन व मृत्यूच्या सीमारेषेवर झालेल्या युद्धावर थरारक भाष्य!
यूनिव्हर्सिटीत गोल्ड मेडल, इंजिनीअरिंगमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण, अत्यंत हुशार असा तरुण, नाव -विश्वनाथ मेहंदळे. एक दिवशी अचानक,अनेकांची स्वप्ननगरी मुंबईमधील युनायटेड कन्स्ट्रक्शन या मोठ्या कंपनीतील सुखाची नोकरी सोडून सैन्यातील नोकरीत रुजू होण्याचा निर्णय घेतो. नोकरीची नवीन जागा थेट हिमालयातील नऊ हजार फूट उंच पर्वतावर असते. हिमालयातील अतिउंच, दणकट महाकाय पर्वतरांगांमध्ये आपल्या आर्मीचे तळ असतात.शत्रूंशी निकराने लढा देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे येथील रस्ते.आपले जवानच हे रस्ते बांधत असतात. तीन वर्षांचा करार करून सिव्हिल अधिकारी विश्वनाथरस्ते बांधण्यासाठी रारंग ढांगात हजर होतो. धो धो वाहणाऱ्या सतलज नदीच्या दोन्ही बाजूंना उंच आकाशाला भिडलेले नितळ पहाड! अशा कड्यांना ह्या भागात ढांग म्हणतात.विश्वनाथ ज्या ठिकाणी रस्ता बांधणार असतो, तो असतो रारंग ढांग!
आणि मग, सुरू होते एक जबरदस्त संघर्षाची कहाणी. ऑर्डर ह्या पाळण्यासाठीच दिल्या जातात हे तत्व असणाऱ्या आर्मीच्या कडक शिस्तीचे तऱ्हेवाईक लेफ्टनंट कर्नल राइट, मेजर बंबा,कॅप्टन नायर, कॅप्टन बहल,अनेक जवान....सिव्हीलीयन अधिकारी लेफ्टनंट विश्वनाथ, गुरखे, लोकल लेबर, आणि समोर ज्याच्या उंचीसमोर माणसे ही मुंग्यासारखी भासतात,तो हिमालय, तो रारंग ढांग, माणसांना आणि यंत्रांना थकवणारी उंची, विरळ ऑक्सिजन, लहरी निसर्ग, विलक्षण थंडी, हिवाळ्यात सत्तरऐंशी फूट बर्फ, केव्हाही होणारे लॅन्डस्लाईड, आणि ह्या सर्वांचा मानवी मनावर होणारा परिणाम...
आर्मीतील अधिकाऱ्यांचा सिव्हिलीयन अधिकाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तितकासा चांगला नसतो. आर्मीच्या या वातावरणात लेफ्टनंट विश्वनाथ रुळतो काय? हे प्रचंड जोखमीचं, अवघड काम तो पूर्ण करतो काय?नोकरीला रुजू होण्यापूर्वी केवळ एकदाच भेट झालेली उमा व विश्वनाथमध्ये केवळ पत्रातूनच प्रेमाचं नातं कसं बहरत जातं?
विश्वनाथसारख्या पोरामध्ये एव्हढे धैर्य, सहनशक्ती,निर्णय घेण्याची क्षमता कुठून आली?विश्वनाथचे वडील पत्रातून त्याच्याशी काय संवाद साधतात?आणि सरतेशेवटी या पुस्तकातच विचारलेला एक प्रश्न आहे-"जब आदमी मर जात है ,तो उसका क्या रह जात है? उभा सर्व प्रश्नांचा धांडोळा या पुस्तकात अशाप्रकारे घेतला आहे की जणू आपण एखादा चित्रपट पाहत आहोत.
एकदाच मिळालेले हे अनमोल आयुष्य नेमके जगायचे तरी कसे? यशस्वी जीवन म्हणजे काय असते?आपल्या तत्वाशी प्रामाणिक राहणे म्हणजे काय?आयुष्यात आपल्याला नेमके काय पाहिजे असते?आपल्या नोकरीवर किंवा कामावर प्रेम असणे म्हणजे काय? ह्या जीवनापासून माझी काय अपेक्षा आहे?आणि त्यापलीकडे असे काय आहे की, ज्याकरता मी नोकरी, ही प्रतिष्ठा, फार काय हे जीवनदेखील झुगारून देईन??? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न अतिशय थरारक, उत्कंठावर्धकरित्या या पुस्तकात केला आहे.
जन्म व मृत्यू यांच्या सीमारेषेवरील युध्दात सहभागी होऊन प्राणपणाने झुंज देऊन जिंकायचे कसे असते...नकळतपणे हे पुस्तक आपल्याला शिकवून जाते.
-पिनेश जाधव.
रारंग ढांग
मौज प्रकाशन
किंमत-120 रुपये.