MAULI SEVA PRATISHTHAN

MAULI SEVA PRATISHTHAN Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MAULI SEVA PRATISHTHAN, Nonprofit Organization, Ahmednagar.

वयोवृद्ध आजारी शेतमजूर पती पत्नीला मिळाले माऊलीच्या मनगावी कायमचे घर  चार दिवसांपासून राहुरीच्या बस स्थानकात आपल्या सख्य...
27/03/2024

वयोवृद्ध आजारी शेतमजूर पती पत्नीला मिळाले माऊलीच्या मनगावी कायमचे घर

चार दिवसांपासून राहुरीच्या बस स्थानकात आपल्या सख्या मुलीने आणि जावयाने आणून सोडलेल्या वयोवृद्ध पती पत्नीला माऊलीच्या मनगाव प्रकल्पात कायमस्वरूपी घर मिळाले.
व्यवस्थेतील तळाचा माणूस अजूनही जगण्यासाठी धडपडतो. प्रसंगी जगण्याच्या वेदना असह्य झाल्या की त्यातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी स्वस्त झालेल मरण पत्करू लागतो. अशीच काहीशी कहाणी आहे एका शेतमजुराच्या आयुष्याची.
एका बड्या बागायतदाराच्या शेतीवर तब्बल पन्नास वर्षे दोघानीही सालाने काम केले.आपली सगळी हयात दुसऱ्याच्या वावरात राबत राबत आयुष्यभर वंचितच जगण्यात घालवली.ऐकुलता एक पोरगा कधीतरी परागंदा झाला. एक लग्न झालेली मुलगी. ती तिच्या घरी नांदते.
उमेदच्या काळात दोघांनीही शेतीचं प्रचंड काम केलं.गुर राखली,दिवसरात्र शेतीला पाणी दिलं.पेरणी केली,मशागत केली आणि आपल्या मालकाला भरघोस उत्पन्न मिळवून दिलं.
स्वतःच घर,वावर शिवार काहीच नसल्यानं जिथे आसरा आणि निवारा मिळाला तिथे मनापासून,प्रामाणिकपणे काम केलं.या राबण्याच्या आणि पोटाची खळगी भरण्याच्या नादात स्वतःच्या आयुष्यात बिघाभर जमीन घेता आली नाही की म्हातारपणी स्वतःच घर असाव म्हणून विचार करुन काही करता आलं नाही.
गावगाड्याच्या पसऱ्यात येथील आत्ममग्न समाजात कष्टाचं जगणारे हे नवरा बायको उपेक्षितच राहिले आणि तसेच जगले.
वय वाढत गेलं तस वावरा शिवारातल कष्टाचं काम पेलवेना.
कुणीतरी सुचवलं म्हणून एका वृद्धाआश्रमात राहायला गेले.तीनचार महिन्यानंतर तिथूनही बाहेर पडावं लागलं.
आपला पोरगा जरी नालायक निघाला तरी लेक सांभाळील या आशेने हे दोघं लेकीकडे गेले.
दरम्यान आजीला अतिरक्तदाबामुळे अर्धांगवायु झाला.लेक जावयानं काही दिवस बघितलं आणि त्यांचीही परिस्थिती म्हणे नाजूक होती. त्यामुळे आजी आजोबाला आणून राहुरीच्या बस स्थानकात आणुन सोडल.
इथे पार्सल ऑफिसजवळ दोघंही विमनस्क बसून होते.
आयुष्यभर मानानं,कष्टान जगलो आणि आता आपल्यावर ही वेळ का आली याचा विचार करत या आस्रप जीवांच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हत.
कुणी कुणी फोटो काढून त्यांची व्यथा बघून हळहळत होत आणि ते फोटो इतराना पाठवून त्यांनाही हळहळायला लावत होत...त्यांची स्टोरी विचारुन त्यांच्या पोराना कचकून शिव्या देत होते....इतकच..
कुणीतरी रात्री त्यांना दोन दणके देवून त्यांच्याकडचे पाच पन्नास रुपयेही काढून घेतले.
आयुष्यभर कष्टाची भाकरी खालेल्या या जीवांना पोटासाठी त्या चार दिवसात कुणा कुणापुढ हात पसरावे लागले...ते त्यांच्या जास्त जिव्हारी लागत होत.
आजोबा हबकून गेलेले.या अशा जगण्यापेक्षा मरण आलेल बर अश्या निराश मनोअवस्थेत.
त्यांना माउलीच्या मनगावी आणलं तेव्हा आजीचा रक्तदाब २०० पार झालेला होता. अर्धांगवायु वर कुठलाच उपचार झाला नसल्याने एक बाजू पूर्णपणे लुळी पडलेली.
तिच्यावर माऊलीच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू झाले.
दरम्यान आजीला छोटासा र्हुदयविकाराचा झटकही येवून गेला.परंतु त्या अतिदक्षता विभागात असल्याने तातडीने प्रोटोकॉल प्रमाणे उपचार झाले आणि आजी बरी झाली.अर्थात अर्धांगवायूने आलेले अपंगत्व इतक्यात जाणार नाही.फिजियो थेरपीने हळू हळू फरक पडेल.
आजोबा मनगावमध्येच बाहेरच्या एका खोलीत राहतात. कष्टाची सवय असल्याने इथल्या बागेत शक्य होईल ते काम करतात. झाडांना पाणी देतात. मावळतीचा कालखंड आता बरा जाईल.घर आणि मन हरवलेल्या माणसांच्या गावी “मनगावी” ते आलेत ही जमेची बाजू.
या जगात खूप माणस अशी आहेत की त्यांच्या घरा वावरा शिवाराच्या गोष्टींच्या दंतकथा झाल्या.कुणी चार माणस असणाऱ्या कुटुंबाला पन्नास खोल्याच्या हवेल्या बांधल्या,कुणाच्या वावरांची शेकडो एकर जमीन अशीच पडून आहे.
बदलत्या समाजात माणस खूप पशेवाली श्रीमंत झाली.पण सामान्य कष्टकरी अजूनही टाचा घासून घासून कधी मरण येईल याची वाट बघतो आहे.
कोर्ट या मराठी चित्रपटातील कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी असणारा शाहीर (दिवंगत वीरा साथीदार) म्हणतो,
कठीण आला काळ
मातीशी तुटे नाळ,
युगाचा अंध खेळ,
डोळेच केले गहाळ.

सावात दिसे चोर,
घुबडात दिसे मोर,
लहानात दिसे थोर,
थोरात दिसे पोर.

मनगावी घर आणि मन हरवलेल्या माणसाला जगण्यासाठी हव ते सगळं आहे.शेवटी शांतपणे समाधानाने जगण्यासाठी काय हव असतं? प्रेम आणि माया...
दिवसेंदिवस मनगावची लोकसंख्या वाढतेच आहे.सध्या आता ४७७ माता भगिनी आणि आमची ४० मुलांचे गोकुळ नांदते आहे.

डॉ. राजेंद्र धामणे

पहाटेचे साडेतीन झालेत. मनगावी कोंबडे आरवतात. रात्री झोप आलीच नाही. अचानक वाटले .. काय वाटत होते पण समजले नाही. रात्रीच्य...
01/03/2024

पहाटेचे साडेतीन झालेत.
मनगावी कोंबडे आरवतात.
रात्री झोप आलीच नाही. अचानक वाटले .. काय वाटत होते पण समजले नाही. रात्रीच्या एक वाजता आय सी यू मध्ये जावे. तिथे काही प्रॉब्लम असावा. तसाच गेलो. बायी नावाच्या पेशंटला भयंकर ताप येवून कॅनव्हलजन आले होते.
बीपी खाली पल्स खूप वाढलेली. ऑक्सिजन कमी झालेला.
साडेतीन वाजेपर्यंत लढत होतो
तिकडून डॉ. किरणही मला काही गोष्टी सांगत होता. बायी जरा सेटल झाली. म्हणून परत घरी आलो.
बायीला कुपोषणामुळे रक्तक्षय झालेला. रक्ताच्या दोन बॅग दिल्या. शरीरात प्रोटीन नसल्यात जमा. खाण्यासाठी रस्त्यावर काहीच मिळाले नव्हते. सहज फेसबुक उघडले तर अंबानी फॅमिलीच्या जागतिक प्रिवेडिंग आणि पंतप्रधान यांच्या यवतमाळ दौऱ्याची माहिती वाचनात आली.
हजारो कोटी रुपयांच्या प्रिवेडिंग मध्ये अडीच हजार प्रकारचे पदार्थ … ज्यांच खावून झालंय असे मोठे मोठे सेलिब्रटी … नेते आणि त्या दुनियेतील मोठी ? माणसे आमंत्रित. किती गोरगरीबना वैद्यकीय सेवा मिळाली असती. किती कुटुंब सावरले असते ?
परवाच्या पंप्र च्या दौऱ्यात म्हणे साडे तेरा कोटी रुपयांचा मंडप टाकला होता. …
असो. मी काही कुणी कुठल्या राजकीय व्यवस्थेचा समर्थक किंवा विरोधक नाही.
प्रामाणिक मत व्यक्त करावे अशीही सध्या परिस्थिती नाही.
आपला हा ऐकला चलो चा मार्ग बरा ..
तसा अंधार तर दाटून आलाच आहे.
आपण त्याला उजेड म्हणत .. त्यातच समाधान मानत जगायचं.

ज्यांच्या नशिबी अंधार आलाय त्याना उजेडाची कधीतरी आस लागते. पण तो तेजस्वी सूर्य आता आमच्या सामन्यांच्या जीवनात प्रकाश कधी देणार हा सनातन प्रश्न आहेच.

डॉ. राजेंद्र धामणे.

मेरे घर आई एक  …. परी आज गुरुपुष्यमृत योग. कसल्याही योगायोगावर खरं तर विश्वास न ठेवणारा माणूस मी. पण आज एक वेगळीच घटना घ...
25/01/2024

मेरे घर आई एक …. परी

आज गुरुपुष्यमृत योग. कसल्याही योगायोगावर खरं तर विश्वास न ठेवणारा माणूस मी.
पण आज एक वेगळीच घटना घडली.
खूप लोक मुहूर्तावर आपत्यप्राप्ती व्हावी म्हणून धडपडत असतात.
त्यासाठी नाही नाही ते उपाय करतात.

ती पोरकी.
महाराष्ट्राच्या कुण्या कोपऱ्यामधुन आलेली.
बरेच हौशी कार्यकर्ते हल्ली या विषयात काम करतात पण ते प्रसिद्धी पेक्षा फार थोडे असते !
अशाच कुणा कार्यकर्त्याने वाजतगाजत , फोटो व्हिडीओ काढत तिला आणले आणि तिची अकंदर अवस्था बघून आणि तिचे गर्भारपण बघून तिला माऊलीच्या मनगावी आणून सोडले.
तिला बिचारीला कुठलं घर की दार ?
आभाळ पांघरूण जगणं.
कुणीतरी या तिच्या परिस्थितीचा फायदा घेतला आणि ती गर्भार्षी राहिली. तिच्यासाठी कोण घर बांधणार ? तिला कोण जवळ करणार ?
माउलीच्या घरात ती आली. समजत उमजत काहीच नव्हत.
ती बेडशीट फाडून त्याचे धागे चगळायची. काहीही खायची….
आणि ती वेळ आली.
वेदना सुरू झाल्या. …
पण डायलेटेशन होत नव्हत. सीपीडी.
म्हणजे कंट्रॅक्टेड पेल्विस होत.
कोणत्याही परिस्थितीत सिझिरिन करणे गरजेचे होते. नेहमोप्रमाणे आमचे प्रसिद्ध स्रीरोग तज्ञ डॉ. गणेश बडे आणि छायाताई बडे मदतीला धावले सायझेरियन झाल.
मुलगी झाली. ही आमची “ पूर्णिमा “
आमच धामणे माऊली कुटुंबाचं हे ४१ व मुल.

डॉ. राजेंद्र धामणे

जमुना किनारे मेरो गांव तिचं नाव जमुनाबाई संन्याशी. तिच्या पेहरावरून आणि गळ्यातील मोठ्या मण्याच्या तुळशीच्या माळांवरून ती...
12/12/2023

जमुना किनारे मेरो गांव

तिचं नाव जमुनाबाई संन्याशी.
तिच्या पेहरावरून आणि गळ्यातील मोठ्या मण्याच्या तुळशीच्या माळांवरून ती खरच संन्यासीन असावी असं वाटतं होत. आणि ती होतीच.
अंगावर चिंध्या झालेली कापड आणि सतत उन्हातान्हात फिरून फिरुन गेलेली चेहऱ्यावरची रया… पण चेहरा शांत. खोल खोल डोहासारखे भासणारे आणि कुठल्याश्या अज्ञात नियतीच्या शोधातील डोळे.
जमुनाबाई आली ती सिव्हिलच्या मोठ्या रुग्णवाहिकेतून. एकटीच बसलेली. ड्रायव्हर सोबत आलेला आणि विनाकारण आपल्याला या घाणेरड्या बाईला घेवून यावं लागतंय पण शेवटी आपली नोकरी आहे. त्यामुळे इलाज नाही असं त्रासिक वाटणारा कर्मचारी .
जमुनाबाईला उतरवून घेतल तेव्हा भयंकर दुर्गंधी सुटलेली.
सारखे जुलाब होत असल्याने ती गलितगात्र झालेली. धड बसताही येत नव्हत आणि झोपतही येत नव्हत .
स्टेचरवरून तील सरळ मनगावच्या अतिदक्षता विभागात घेतलं.
स्वच्छ केलं. युरीनसाठी कॅथेटर टाकल सोबत डायपर लावल.
सिव्हिल् कर्मचाऱ्यांकडून तिचं पाठवणीबाबतच पत्र घेतलं. सोबत काही तपासण्या करून पाठवल्यात का म्हणून विचारलं , तर तस काही नाही. आणि अशा वनगळ वानाच्या बाईच्या काय तपासण्या करणार शिवाय ती तशी जरा मेंटल. अस काहीस उत्तर आलं.
तिची हिस्ट्री समजून घेतली तेव्हा समजलं की जमुनाबाई तशी जात्याच सन्याशी .फिरत फिरत साई दर्शनाला आली. तिथच आजारी पडली. कुणीतरी तिला तिथल्या मोठ्या रुग्णालयात दाखल केलं. त्यानी तिथून तिला सरकारी रुग्णालयात भरती केलं.
सरकारी रुग्णालयात आल्यावर नियमाप्रमाणे !! तिची रवानगी बेवारस रुग्णासाठीच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये झाली.
या सगळ्या प्रवासात तिच्या कुणी सध्या सध्या तपासण्याही केल्या नाहीत.
तिचे भयंकर घाणेरड्या वासाचे जुलाब थांबवणं आणि तीचं हायड्रेशन ठिक करण आधी महत्वाचं होतं.
तातडीने तिचे रक्त तपासणीस पाठवले.
अथक प्रयत्नानंतर तिचे जुलाब थांबले आणि थोडी बरी वाटू लागली.
पोट तपासले तर भयंकर फुगलेले.
पोटात पाणी साचले होते. असाईटीस होता. त्यामुळे तिला प्रचंड वेदना आणि असह्य त्रास होत होता.
डॉ. किरण ही सगळी केस बघत होता. त्याने तातडीने टॅपिंग करुन तिच्या पोटातले पाणी काढले.
तिला जरा बर वाटू लागलं. दरम्यान तिचे सगळे रिपोर्ट आले.
रक्त २.५ % इतकेच. …
लिव्हर किडनी आणि इतर सगळ्या तपासण्या अतिशय नकारात्मक.
प्रचंड डी हायड्रेशन झाल्याने शरीर मल्टी ऑर्गन फेल्यूरकडे चाललेले.
तातडीने तिला रक्ताच्या चार बॅग दिल्या.
तिच्या प्लेटलेट अगदी धोक्याच्या पातळीवर सरलकलेल्या.
शेवटी प्लेटलेटही द्याव्या लागल्या.
जर बरी वाटू लागली. पुन्हा एकदा टॉपिंग करुन पोटातलं पाणी काढलं. त्याचाही रिपोर्ट गंभीरच आला.
जमुनाबाईच्या तोंडामधून आणी इतर अवयवांमधून रक्तस्राव होवू लागला.
प्रोटीन तपासणीत तीच्या शरीरात प्रोटीनच प्रमाण इतक कमी झाल होत की सेल वॉलला बांधून ठेवणारा घटकच उरला नसल्याने रक्तवाहिन्या लिकेज होवून रक्तरस्राव होत होता.
त्यासाठी तिला ह्यूमन अल्बमीनचे सुमारे सात हजार रुपयाचे एक अशी दहा इंजेक्शन दिली.
त्याने थोडी बरी होतेय असे वाटू लागले. किरण चोवीस तास तिच्यावर लक्ष ठेवून होता. आयसीयू प्रोटोकॉल प्रमाणे सगळे सुरळीत सुरु होते.
इतक्या वाईट अवस्थेत काहीतरी बदल होईल असे वाटायचे पण मधूनच तीच थकलेलं . थकवलेलं शरीर बंड करायचं. मग पुनः उपाय करत त्याला जागेवर आणायच. जमुनाबाई कोण होती आमची ?
कुठून उत्तर भरतातल्या कुठल्यातरी क्षेत्रामधून आलेली सर्वसंगपरित्याग केलेली संन्याशी.
पण माणूस म्हणून ती आमच्या सगळ्यांच्या खूप जवळची.
खूप प्रयत्न केले. अनेक तपासण्या झाल्या . खूप महागडी आणि महत्वाची औषधे वापरली. सतत महिनाभर सगळ्यांनी तिला प्रेमन जोजवल
पण एका टप्यावर पुढे काहीच जात नव्हत. आणि ती गेली. .
खूप वाईट वाटलं. इतके प्रयत्न करूनही कुणी वाचलं नाही की जीव कासावीस होतो.
सुरुवातच्या टप्प्यावर दोन्ही पैकी कुठल्याही रुग्णालयाने तिची साधी सीबीसी ही रक्त तपासणी केली असती तर तिचा अनिमिया (रक्तशय ) पटकन लक्षात आला असता. तातडीने त्याचवेळी रक्त देता आले असते तर तिला पुढच्या इतक्या भयंकर वेदना झाल्या नसत्या. ती कदाचित वाचू शकली असती.
शक्यतांचा विचार करण्यात तसा काही अर्थ नसतो.
अशा किती माय बहिणी .. पण जमुनाबाईच खूप खूप वाईट वाटलं. तिची ती टपोऱ्या मण्याची तुळशीची माळ मी जपून ठेवलीय.
न थकतां सतत उपचार करत राहणार आमचा डॉ. किरण , सोबत सतत नर्सिंग आणि सगळीच काळजी घेणारी निलम
ही माणसे ही अद्भुत.
तिला अग्नी दिला आणि सहजच पंडित कुमार गंधर्वानी गायलेले ठुमरी भजन मनात रुंजी घालू लागले ..

जमुना किनारे मेरो गाँव
साँवरे आ जइयो
जमुना किनारे मेरो गाँव
सावरे आ जइयो

जमुनाबाई संन्याशी जमुनकिनारी शांत अथांग निघून गेली. एक आठवण ठेवून. अर्थात अशा कितीतरी कासावीस करणाऱ्या आणि आयुष्याला अर्थ देणाऱ्या आठवणी .चांगल्या ,वाईट , छळवणाऱ्या , छोट्या सामान्य माणसांच्या मोठेपणाच्या आणि मोठे समजले गेलेल्या अतिछोट्या कोत्या माणसांच्याही.
तितकच अनुभव विश्व समृद्ध होत जातं.

डॉ. राजेंद्र धामणे

Address

Ahmednagar
414111

Telephone

9860847954

Alerts

Be the first to know and let us send you an email when MAULI SEVA PRATISHTHAN posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MAULI SEVA PRATISHTHAN:

Share